Wednesday 25 July 2018

वृक्षवाढदिवस आणि विद्यार्थी कौतुक मेळावा

" फक्त गुणपत्रिका  म्हणजे सर्व काही नाही"  - सौ सुरभी नाईक. प्रसिद्ध समुपदेशक 

विद्यार्थी मित्रांनो गुणांना महत्त्व आहेच परंतु गुणपत्रिका म्हणजे सर्वं काही नाही. शिक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्व विकास व्हावा. आपल्या वक्तिमत्वातील दोष कमी करणे आणि व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण जोपासणे म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास ही सततची प्रक्रिया असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध समुपदेशक सौ सुरभी नाईक यांनी वसईतील संजीवनी परिवार आयोजित वृक्षवाढदिवस व विद्यार्थी कौतुक मेळाव्यात केलं. 
प्रा. सायनेकर सरांच्या प्रेरणेने २००५ साली सुरु झालेल्या  " संजीवनी वनराई " या वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्पाचा तेरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी समाजमित्र पत्रकार मयुरेश वाघ यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आलं. सौ सुरभी नाईक  , श्री बबनशेठ नाईक , श्री राजन नाईक , श्री यशवंत पाटील , व विद्यार्थी मित्राच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. आज रुद्राक्ष, कदंब , पंगारा ,अशोक वृक्षाचं रोपण करण्यात आलं. 



स्वच्छता ,वृक्षजगत ,पर्यावरण या विषयाशी आपले विद्यार्थी मंडळी जोडली जावी म्हणून विद्यार्थी कौतुक व वृक्षवाढदिवस एकत्र साजरा केला जातो. दहावी बारावीचे निकाल नुकतेच लागलेले असतात. वर्षभर अभ्यासाचा तणाव असतो. यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना  एकत्र बोलवून एखादं गुलाबपुष्प देऊन ,,पेढा देऊन कौतुक करावं असं साधं स्वरूप या कौतुक मेळाव्याचे आहे असं प्रास्ताविकात नरेश जोशींनी सांगितलं. सुनील म्हात्रेंनी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमाला श्री द. ग नाईक, श्री यशवंत पाटील, श्री राजन नाईक , श्री बबनशेठ नाईक  श्री चिंतामण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

आषाढी एकादशी - बोलावा विठ्ठल



आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंचम निषाद गेली तेरा वर्ष बोलावा विठ्ठल या अभंगवाणीचे आयोजन करत आहे. 
कालचा कार्यक्रम बहारदार झाला, ज्ञानेश्वराला वंदन करून जय जय रामकृष्ण हरी गजराने सुरु झालेली अभंगवाणी टाळचिपळ्या च्या संगतीने आलेला श्रोत्याला  वारकरी करून नादवून गेली. 
सर्वच कलाकार , ते गायक असुदे की वादक सर्वच शिखरस्थ ( श्री शशी व्यासाचा शब्द) कलाकार. प्रत्येकाचा सादरीकरण उत्तम झालं त्यांच्या गायकीने सूरमय विठ्ठल साकारला. कलकत्त्याच्या कौशिकी चक्रवर्तींनी सर्वांची मन जिंकली. त्यांनी गायलेले अभंग उत्कृष्ठ होते की त्यांचं निवेदन. खूप मजा आली. मराठी न येणारी  कौशिकी फक्त अभंग सादर करण्यासाठी आलेली एकमेव गायिका असावी. त्यांच्या बोलण्यातून आपल्या गुरुविषयी असलेला आदर , सहकलाकारा कडून शिकणं , त्यांना गुरुस्थानी मानणं, त्यांना नमन करून अभंगाला सुरवात करणं, भाषा आणि उच्चार शास्राचे महत्त्व अधोरेखित करणं, काही शब्द , उच्चार नवीन असल्याचं सांगून आपल्या मर्यादा ची जाणीव करून देणे. त्याच बरोबर या मर्यादांवर मात करून उत्कृष्ठता  प्रकट करणे. नेमक्या शब्दात पंडित भीमसेन जोशी , सुश्री किशोरीताईंची महती मांडणे, अभंगातून श्रद्धासुमन अर्पण करणे. हिंदी आणि मराठी तील अभंगातील साम्यस्थळं शोधून भक्तीतील , अध्यात्मातील अद्वैतता दाखवणे. सगळंच लाजबाब. सुंदर ध्यान पासून सुरवात करून  किशोरीताईंनी शब्दबद्ध  केलेल्या ज्ञानेश्वरीच्या  अंतरीच्या प्रवास उलगडून दाखवणा-या ओव्यांनी समेवर येणे , सर्वच अविस्मरणीय. निर्भेळ आनंद देणारं.    
 जयतीर्थ मेवुंडी   अभंगवाणीत वेगळा रंग भरणारे गायक,या वेळी नेहमी प्रमाणे रंग भरले. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल , गुरु विठ्ठल , गुरुपूजा .........  गुरु च्या आगळ्या वेगळ्या पैलूचं दर्शन त्यांच्या आणि एस आकाशाच्या सादरीकरणाच्या वेळी झालं. शिष्याला संधी , वाव , स्पेस देणे इतकंच नव्हे तर आपल्या गाण्यात सामावून घेऊन शिखरावर जाण्यासाठी मार्ग करून देणे. आणि आकाश ने तितक्याच ताकतीने पेलणं. विशी बाविसाच्या उंबरठ्यावर असलेल्या आकाशाचा व्यासपीठावरील वावर आश्वासक वाटला. 
राहुल देशपांडे अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करणारा कलाकार. आलापी , गायकी , अभंग तेच असले तरी प्रत्येक वेळी नव्या जागा शोधण्याचा प्रयत्न, विठ्ठलाचा शोध घेण्याचा ध्यास , कधीतरी अवचित पणे  त्याचं प्रकटणे , संगीत साधना  आणि साधक  वैष्णवाच्या जथ्याचं आणि स्वतःचा प्रवास  उलगडून दाखवणारं गायन. 
आनंद भाटे गेल्या तीस पस्तीस वर्षात गंधर्व पदवी मिळवणारा कलाकार, पंडितजींचा शिष्य. पंडितजींचे अभंग सादर केले. आपण ठेवणीतील जोहर मायबाप होतंच. 

वादक कलाकार , अजय जोगळेकर , आदित्य ओक, तबल्यावर , पाध्ये , तळवळकर , बँकर , पखवाज सुखद मुंडे, सूर्यकांत सुर्वे , बासरी वर एस आकाश. 
प्रसिद्ध सुलेखक अच्युत पालव  अक्षरातून विठ्ठलाचे देखणे चित्ररूप व्यासपीठावर  गेली अनेक वर्ष साकारत असतात. 
कार्येक्रम संपल्यावर एस आकाशची भेट झाली. त्याला विचारलं एस म्हणजे काय? सतीश आकाश. श्री  एम एन सतीशकुमार व श्रीमती वाणी सतीश चा मुलगा. 

शेवट राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंच्या टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगे .... 
पुढची आषाढी १२ जुलै १०१९.