Saturday 16 February 2019

कोण आपण भीष्म की जटायू ?


एकाच परिस्थितीला दोन माणसं सारखा प्रतिसाद देत नसतात. त्याच पुराणातील एक उदाहरण, दोघानाही समान परिस्थितीला सामोरं जावं लागलं परंतु दोघांचा प्रतिसाद मात्र भिन्न होता. हिंदूंनी एकाला उच्चं स्थान दिलं दुस-याचा आदर केला. 
भीष्म आणि जटायु यांच्यातील हा  तुलनात्मक अभ्यास आहे.  महिलेच्या चारित्र्य हनन करणा-या प्रसंगाला दोघांना सामोरे जावे लागले.   एकाने , असाह्य व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावली तर दुसरीने गुन्हा घडत असताना मुकदर्शक होणं, निष्क्रिय राहणं  पसंत केलं. त्यांच्यासमोर असलेल्या परिस्थितीच्या समानतेकडे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. 
शक्तिशाली की निर्बळ : 
भीष्म एक शक्तिशाली आणि सक्षम योद्धा होता आणि  त्यांनी ठरवलं असतं तर  द्रौपदी ची विटंबना थांबवता आली असती. परंतु ते  या घटनेचे निष्क्रिय साक्षीदार झाले.   जटायु वयोवृद्ध होता, रावण शक्तिमान होता , मृत्यू अटळ होता तरी सर्वशक्ती एकवटून प्रतिकार केला ,सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला.  भीष्म पराक्रमी  होते  तरीही निर्बल होते,  जटायू वयोवृद्ध , विकलांग   होते तरीपण ते सामर्थ्यवान ठरले.  "वास्तविक सामर्थ्य  शारीरिक क्षमतेवर  नव्हे तर जीवनमूल्य जपण्यासाठी घेतल्याला निर्णयावर असते. 
अमर  की   मृत :
भीष्मांना इच्छामरण होतं परंतु विवेकबुद्धीच्या टोचणी मुळे दररोज मरण यातना भोगीत होते.   तर जटायू एकदाच  मरण पावला परंतु आपल्या विवेकपूर्ण कृती मुळे अमर झाला. .  विवेकाची प्रतारणा करू नका. तोच आपला खरा साथीदार आहे. 

कीर्ती की अपकीर्ती : 
भरदरबारात भीष्माच्या समोर झालेल्या द्रौपदीच्या विटंबने मुळे भीष्मांच्या नावाला कलंक लागला. परंतु सीतेच्या रक्षणाकरता मरण पत्करलेला जटायू अमर झाला. आज नाही तर उद्या आपल्याला ही मृत्यू ठरलेला आहे.  चांगल्या गोष्टीशी जोडलं जावं की वाईट, निवड आपल्यालाच करायची आहे. मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
सुसंस्कृत  की असंस्कृत :
भीष्म  कुलीन उच्चं सुसंस्कृत होते परंतु या प्रसंगी त्यांचं वागणं असंस्कृत होतं. त्याच वेळी पक्षी गणातील जटायूनी मानवी मूल्य जगत सुसंकृत पणाचा दाखला दिला. कोणाला मनुष्य म्हणावं  , भीष्माला की जटायूला!    माणसाच्या पोटी जन्मला येऊन मनुष्य बनत नसतो. मानवी मूल्य जपून मनुष्य बनतो.
भाषा शब्दाची , अंतरीची  :
द्रौपदी जाणून होती की या प्रसंगातून कोण वाचवू शकतील तर ते होते भीष्म  म्हणून तिने पितामहां कडे  याचना केली तरीही भीष्म निष्क्रिय राहिले. सीतेची जटायू कडून संरक्षणाची अपॆक्षा केली नव्हती, आपल्या अपहरणाची बातमी रामाला कळवावी अशी इच्छा होती. कारण तीला माहित होतं की जटायू रावणाचा प्रतिकार करू शकणार नाही. तरीही त्यांनी झुंज दिली. भीष्मांना द्रौपदीची याचना उमगली नाही तर पक्षिकुलातील जटायूला सीतेच्या अंतरीची भाषा समजली. शब्दांपेक्षा  हृदयाची भाषा अधिक परिणामकारक.
स्पष्टता की संभ्रमावस्था :
राजकर्तव्या मध्ये भीष्म गोंधळून   गेले  आणि नैतिक कर्तव्याचा विसर पडला. तर जटायू मनात नैतिक कर्तव्या विषयी जरापण किंतु नव्हता.जेव्हा पेचप्रसंगात सापडतो. तेव्हा आतील आवाज योग्य दिशा दर्शन करतो.कारण त्याला सत्याची जाण असते.  
चांगले की  वाईट उदाहरण : 
पिढ्यांकरिता  वाईट उदाहरण ठेवलं , तर जटायुंनी पुढच्या पिढीसाठी  आदर्श उदाहरण सादर केलं.  "जर आपण एक चांगले उदाहरण होऊ शकत नसलो तरी किमान आपण वाईट  उदाहरण होऊ नये. 
नातलग की तिर्‍हाईत :
भीष्म द्रौपदी चे  पितामह होते परंतु कौरवांच्या दरबारात तिर्‍हाईता सारखे वागले. तर जटायू तिर्‍हाईत  असून रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचे ठरले. खरे नातेसंबंध जीवनमूल्यावर आधारित असतात. 
सुसंगत की कुसंगत  :
माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की क्षणात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात.  असे  निर्णय ,तुमच्या चित्तावर झालेल्या  संस्कारा वर  अवलंबून असतात.  पितामह भीष्म आणि जटायू यांच्या आयुष्यात असे प्रसंग आले. भीष्म कौरवांच्या सानिध्यात होते तर जटायूवर रामलक्ष्मणाचा प्रभाव होता. त्यामुळे एकाचा निर्णयाने जीवनाला कलंक लागला   तर दुस-याचा निर्णय त्याच्या जीवनाला अर्थ  देऊन गेला.
स्वीकारार्ह की उपेक्षित :
कौरवसभेत शिष्टाई साठी आलेल्या श्रीकृष्णांनी भीष्माकडे दुर्लक्ष केलं., उपेक्षा केली. तर प्रभू रामचंद्राने जटायूचे अंतिम संस्कार केले , जे भाग्य दशरथाच्या वाट्याला आले नाही ते जटायूला लाभलं. भीष्मांनी नाराज केलं तर जटायूनी भगवंताला प्रसन्न केलं. 

पितामह भीष्म महान योद्धा होते एक वचनी होत परंतु वस्रहरणाच्या वेळेची निष्क्रियते मुळे ते कलंकित झाले. तात्पर्य असं की जो निर्णय तुम्ही घेता त्यावर तुमची इतिहासात नोंद घेतली जाते. तुमच्या समोर एखादा प्रश्न किंवा अन्याय घडत असताना , सोडवण्यासाठी  तुमच्या पुढे दोन पर्याय असतात एक दुर्लक्ष करा किंवा काहीतरी करा . याच कृतीवरून तुम्ही भीष्म किंवा जटायू ठराल.   


 (एका इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर , मर्यादा भाषांतरकाराच्या )