Friday, 28 February 2025

गीतेचा मूलभूत सिद्धांत

 

श्रीमत्-भगवत्-गीतेपासून  प्रेरणा घेणाऱ्या व्यक्तींची कार्यक्षेत्रे पाहिली तर त्यात विलक्षण विविधता आढळते. जी गीता लोकमान्य टिळकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देते, तीच गीता क्रांतिकारक असलेल्या अरविंदबाबूना स्वातंत्र्याचा लढा सोडून देऊन योगसाधना करण्याला  प्रवृत्त करते. आठव्या शतकात गीतेवर भाष्य लिहिणारे  आदिशंकराचार्य सर्वसंगपरित्याग करतात, तर पाचशे वर्षांनी त्याच ग्रंथावर भावार्थदीपिका लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज भक्तिमार्गाचा पाया रचतात. लोकमान्यांना गीतेत  कर्मयोग दिसतो तर महात्माजींना अनासक्तियोग. गीतेपासून प्रेरणा घेणाऱ्यात जसे विद्ध्वंसक अस्त्रांचा शोध लावणारे वैज्ञानिक आहेत तसेच अखिल मानवजातीच्या भल्याची चिंता वाहणारे मानवतावादी आहेत. निरनिरळ्या काळात, निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या कार्यासाठी लागणारी वैचारिक बैठक  गीता पुरवते याचे कारण गीता  सिद्धांत सांगतेज्ञान देते.  धर्माज्ञा  देत नाही.  

ज्ञानाची सुरुवात गृहीतकापासून होते. गीतेचे पहिले  मूलभूत गृहीतक  पुढील श्लोकात  आहे: 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि  ।। (गी.२.४७) 

या श्लोकाचा शब्दश: अर्थ असा:

कर्मावरच तुझा अधिकार आहे. फळावर तू कधीही अधिकार सांगू नकोसफळाच्या हेतूने काम करू नकोस, कर्म करणे टाळूही नकोस.  

गीतेतील हा सर्वात प्रसिद्ध श्लोक आहे. याच्या अर्थावर विस्तृत भाष्ये लिहिली आहेत. यातील पहिल्या अर्ध्या ओळीत गृहीतक आहे, उरलेला भाग उपदेशात्मक आहे. 

कर्मावर अधिकार आहे याचा अर्थ विशिष्ट कर्म करायचे की नाही, कशाप्रकारे करायचे इत्यादी ठरविण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला आहे. मग  कर्म करण्याचाच अधिकार आहे असे कृष्ण का म्हणतो? या ‘च’चा अर्थ काय? याचे उत्तर मनुष्य स्वभावात आहे. सामान्य माणूस कोणतीही कृती फळाच्या आशेने करतो. उद्देश्यहीन काम तो करत नसतो.  त्यामुळे  कर्त्याचा कर्मावरच अधिकार आहे याचा अर्थ कर्मफळावर अधिकार नाही, हे कृष्णाला ‘च’ने सांगायचे आहे.  

फळाचा अधिकार नसण्याला  आणखीही एक कारण आहे. अधिकार वापरलाच पाहिजे अशी सक्ती नसते. अधिकाराचा वापर टाळता येतो. पण वापरलेल्या अधिकाराचे  फलित  टाळता  येत नाही. अग्नीला स्पर्श करायचा की नाही हे ठरविण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण स्पर्श केल्यावर हात भाजण्याचा परिणाम तुम्ही नाकारू शकत नाही.  

कर्म करणे टाळताही येत नसते. कारण कर्म न करणेही एक कर्मच असते. (गी.३.४) नदीला महापूर आला आहे  आणि माझे घर चारी बाजूनी पाण्यानी वेढले आहे. पाणी वाढतच चालले आहे. मी कोणतीही कृती करण्याचे नाकारले आणि स्वस्थ बसलो, म्हणून येणारे अरिष्ट टळत नसते. कारण निर्णय न घेणे हाही एक निर्णयच असतो. कर्म न करणेही कर्मच असते. त्याचे फळही असते. ते स्वीकारावेही लागते. त्यामुळे, गीता म्हणते फळाचा  हेतू मनात धरून कर्म करू नकोस, कारण फळावर तुझा अधिकार नाही. तसेच कर्म टाळण्याचा  प्रयत्न करू नकोस, कारण ते टाळणे तुला अशक्य आहे. 

 

गीतेचे दुसरे गृहीतक कर्मफळावर कर्त्याचा अधिकार  का नाही याचे कारण सांगते.  

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।

अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ (गी. ३.२७) 

जे घडते तो परिस्थितीचा परिपाक असतो.  ‘मी कर्ता आहे’ असे कोणी मानत असेल तर तो त्याचा अहंकारातून निर्माण झालेला भ्रम असतो. 

येथेही श्लोकाच्या पहिल्या भागात गृहीतक आहे. त्यात कर्मावर कर्त्याचा का अधिकार नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱ्या भागात श्रीकृष्णाचे निरीक्षण आहे. 

 पानिपतात मराठ्यांचा पराभव का झाला याची अनेक कारणे दिली जातात. त्यात एक कारण असे सांगितले जाते की, अब्दालीला अनपेक्षित रित्या यमुनेला एके ठिकाणी उतार मिळाला. सदाशिवरावाने पंधरा वर्षांचे रेकॉर्ड पाहून व्यूहरचना केली होती. पण त्यावर्षी अकल्पित घडले. 

कर्मफळ परिस्थितीचा परिपाक का असते याचे कारण गीतेच्या शेवटच्या अध्यायात सांगितले आहे. गीता म्हणते, कर्मफळ पाच घटकांवर अवलंबून असते: १.अधिष्ठान, २.कर्ता, ३.कर्त्याला उपलब्ध असणारी साधने, ४.कर्त्याने केलेले प्रयत्न, ५.दैव  (गी.१८. १४)

यातील अधिष्ठानाला गीता  प्रथम क्रमांक देते, याचे कारण अधिष्ठान  दूरगामी परिणाम करते. ते गुणात्मक दृष्ट्याही अन्य घटकापासून भिन्न आहे. इतर कारणे सर्व पशूंना लागू आहेत. अधिष्ठान मनुष्येतर प्राण्यांना लागू नाही. उरलेल्या चार घटकांपैकी, कर्ता, साधने, आणि प्रयत्न, यांचे महत्त्व सर्वमान्यच  आहे. पण दैव इहवाद्याना अमान्य होण्याची शक्यता आहे. परंतु दैवाला समाधानकारक इहवादी अर्थ देता येतो. आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणेआपल्याला  जे समजून घ्यायचे असते त्याचा अनंत आपण समजू शकत असलेल्या गोष्टींच्या अनंतापेक्षा दोन पायऱ्या पुढे असतो. त्यामुळे नेहमीच काही घटक आपल्याला अज्ञात राहणार असतात किंवा आपल्या नियंत्रणात नसतात.   अशा घटकांना दैव म्हणता येईल. 

या श्लोकावर भाष्य करताना गीता-रहस्यात शेतीचे उदाहरण घेतले आहे. शेतीतून  मिळणाऱ्या फळासाठी कर्ता म्हणजे शेतकरी जाणकार असणे महत्त्वाचा आहेच. पण केवळ जाणकार असणे पुरेसे नाही, त्याने श्रमही करावे  लागतात. साधनामध्ये जमीनीचा पोत, बी, खत, बैल, ट्रॅक्टर, वीज, मजूर यांचा समावेश आहे. पण येव्हढ्याने भागत नाही. पाऊस योग्य वेळी योग्य प्रमाणात पडावा लागतो. आणि ते शेतकऱ्याच्या हातात नसते. ऐन वेळी पाऊस ओढ खातो अथवा जरुरीपेक्षा अधिक होतो आणि श्रम वाया जातात. त्याला दैव म्हणणे भाग आहे. 

 

 ______________________________________

 डॉ. ह. वि. कुंभोजकर

४०३, पूर्वरंग अपार्टमेन्ट, राजारामपुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर , ४१६ ००८  

Mobile: 9834336547, e-mail: hvk_maths@yahoo.co.in

 

Sunday, 16 February 2025

प्रयागराज महाकुंभ २०२५

 

प्रयागराज महाकुंभची चर्चा जोर शोर मध्ये सुरू होती. भारतीय संस्कृतीत, अध्यात्मात कुंभ, कुंभमेळा हि परंपरा काय आहे, इतिहास काय आहे.

भारतीय संस्कृतीत कुंभ/ कलश  ला पवित्र मानतात. कुंभ चा एक संदर्भ “अमृतकुंभ”.  सूर- असुर, देव- दानव यांच्यात समुद्र मंथन झालं त्यात चौदा रत्न प्राप्त झाली. त्यातील एक रत्न “अमृत”. अमृताविषयी एक धारणा अशी की अमृत प्राशन केल्याने अमर होतो. अमृत जर दानवाच्या हाती लागलं तर दानव,असुर अमर होतील म्हणून देवांनी अमृतकुंभ पळवला. दानवांनी पाठलाग केला. त्या दरम्यान भरतखंडात चार ठिकाणी अमृत थेंब पडले. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक- त्र्यंबकेश्वर.

नदी, पाणी म्हणजे जीवन. या चार नगरातील  

प्रयाग – गंगा, यमुना व अदृष्य स्वरुपात असलेल्या सरस्वती या नदयांचा त्रिवेणी संगम.

हरिद्वार – गंगा तीरी   

उज्जैन – क्षिप्रा तीरावर  

नाशिक – त्र्यंबकेश्वर   गोदावरी नदीकाठी. 

नदीच्या किनारी संस्कृती फुलली बहरली. विशिष्ट अक्षांशावर नद्यांच्या संगमावर स्नान करण्याचं शास्त्र  विकसित झालं.

शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे जीवन आणि आपल्या भोवतालाच्या शक्ती   कश्या कार्य करतात आणि आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो याच्या निरीक्षणातून, खगोलशास्त्रीय अभ्यासातून नक्षत्र,सूर्य , चंद्र, गुरु  ग्रहस्थिती वर मुहूर्त ठरले गेले.

कुंभमेळे विशिष्ट ग्रहस्थितीला अनुसरून भरत असतात. खगोलशास्त्रीय दृष्ट्‍या अवकाशात भ्रमण करणारे ग्रहतारे यांची  विशिष्ट युती होत असते. वेंदा मध्ये सुर्याला आत्मारुपी अथवा जिवनदायी मानले जाते चंद्रला मनाचा राजा मानले आहे. गुरु/बहस्पती ग्रहाला देवांचा गुरु मानले जाते. अवकाशात भ्रमण करण्याचा प्रत्येक ग्रहाचा ठराविक काळ लागतो.  गुरु ग्रहाला बारा राशीमध्ये भ्रमण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. कुंभमेळा  गुरु ग्रहाच्या विविध राशीमधील प्रवेशा नुसार चार ठिकाणी दर 12 वर्षांनी संपन्न होतो.

प्रयाग कुंभ

जेव्हा गुरु मेष वर्तुळात असतो आणि सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात तेव्हा प्रयाग येथे चंद्र संयोगाच्या दिवशी (अमावस्या) कुंभमेळा भरतो.

हरिद्वार कुंभ

चैत्र (मार्च-एप्रिल) महिन्यात जेव्हा गुरु कुंभ राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा साजरा केला जातो.

उज्जैन कुंभ

जेव्हा बृहस्पति (गुरू) सिंह राशीत असतो आणि सूर्य वृश्चिक (वृश्चिक राशीत) असतो किंवा तिन्ही वैशाख (एप्रिल-मे) महिन्यात तूळ राशीत असतो तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा साजरा केला जातो.

नाशिक कुंभ

भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर) महिन्यात जेव्हा गुरु (गुरु) आणि सूर्य सिंह राशीत असतात तेव्हा त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे कुंभमेळा साजरा केला जातो.

 

कुंभमेळा नेमका कधी सुरू झाला हे सांगणे कठीण आहे. कृतयुगात जेव्हा दुधाच्या सागराचे मंथन झाले तेव्हा कुंभमेळा सुरू झाला असे मानले जाते.

काही विद्वानांच्या मते, मेळा ईसापूर्व ३४६४ मध्ये सुरू झाला, म्हणजे हडप्पा आणि मोहेंजो-दारो संस्कृतीच्या १००० वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे.

काहीच्या मते  2382 ईसापूर्व, विश्वामित्र (दुसरे) यांनी 'माघ पौर्णिमेला' पवित्र स्नान करण्याचे महत्त्व सांगितले. तर  इ.स.पूर्व १३०२ मध्ये, महर्षी ज्योतिषांनी 'माघ पौर्णिमेला' पवित्र स्नानाचे महत्त्व लोकांवर बिंबवले.

डी. चिनी प्रवासी ह्युएन त्सांग यांनीही आपल्या पुस्तकात 'कुंभ-मेळ्या'चे वर्णन केले आहे. इ.स.पूर्व ६२९ मध्ये त्यांनी काढलेल्या प्रवासाचे वर्णन 'भारतयात्रा' असे त्यांच्या पुस्तकात आहे, ज्यामध्ये सम्राट हर्षवर्धनच्या राज्यात प्रयाग येथे हिंदूंच्या जत्रेचा उल्लेख आहे.

कुंभमेळा प्रकार

मेळा

कधी

स्थळ

माघ मेळा

दर वर्षी

प्रयागराज

अर्ध कुंभमेळा

सहा वर्षात एकदा

हरिद्वार , प्रयागराज

कुंभमेळा 

बारा वर्षात

हरिद्वार , प्रयागराज,  नाशिक, उज्जैन

महाकुंभ मेळा

१४४ वर्षानंतर

प्रयागराज

 

 

 

 

 



या वेळेचा फक्त  कुंभ नव्हता तर महाकुंभ होता. १४४ वर्षानंतर येणारा कुंभ.  “पौष अमावस्या”  चं शाही स्नान संपन्न झालं. महाकुंभ मधील विशेष महत्त्वाचं शाही स्नान. या दिवसापासून साधक मंडळी मौन धारण करून कुंभाच्या अखेर पर्यंत म्हणजे महाशिवरात्री पर्यंत  साधना करतात. म्हणून मौनी अमावस्या म्हणतात. भाविकांचा महासागर अमावस्येचा मुहूर्त साधण्यासाठी त्रिवेणी संगमावर लोटला होता. सर्वांना संगमाच्या मुख्य घाटावर स्नान करायचे होतं अप्रिय घटना घडली, सतर्कतेमुळे  मोठी दुर्घटना टळली. या सर्व धांदलीत कुंभ स्नानाची संधी हुकते कि काय अशी स्थिती. शेवटी माघ पौर्णिमेचा मुहूर्त साधायाचं ठरलं. रविवारी ९ फेब्रुवारी सकाळी  साडेसातला वाघोली येथून प्रस्थान केलं. पौर्णिमा बारा तारखेला परंतु स्थानिक व्यवस्थापनानी दहा तारखेलाच पोहचायला सांगीतलं.    


          








प्रवास खुपचं लांबचा, वसई ते प्रयागराज  १५०० किलोमीटर अंतर, वेळेत पोहोचायचं उद्दिष्ट ठेवून इगतपुरी- समृद्धी महामार्गावरून नागपूर- जबलपूर -रीवा – प्रयागराज  (सरस्वती हायटेक सिटी पार्किंग ) असे टप्पे पार करत सोमवारी संध्याकाळी ६ वाजता मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. श्रद्धेचं स्नान, आस्था कि डुबकी लावायची तीव्र इच्छा यामुळेच सलग ३०-३२ तासाचा प्रवास करून ही समान ठेवून लगेचच घाटावर स्नानासाठी गेलो. 


























    

मंगळवारी सकाळीच सरस्वती घाटावर पोहचलो. कमी गर्दी पाहून अंघोळी केल्या. लोकल भाषेत आस्थाकी डुबकी लेह  ली.  एकंदरीत परिसरातील नियोजन आणि व्यवस्था चांगली होती.  पाणी स्वच्छ रोमांचकारी आणि स्पर्श चैतन्यदायी होता. घाटावर मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं. तीन पिढ्याचं तर्पण करायचं अशी मान्यता आहे. तीन पिढ्याच्या आठवणीने मन सद्गतीत झालं, त्यांच्या आठवणी मनाला स्पर्शून गेल्या. कृतज्ञता दाटून आली.















डोईवर पांढरी शुभ्र टोपी, पांढरा पायजमा , पांढरा कुर्ता एरवीचा  सामवेदी पेहराव, परंतु त्रिवेणी संगमावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होतं. अनेकांच्या नजरा वळत होत्या. संगमावर प्रथमोपचार सुविधा देणा-या टीमच्या श्री चौधरी साहेबांनी आवर्जून सर्वांबरोबर फोटो घेतला. अनेक जण आमच्याबरोबर फोटो घेत होते, आम्ही जाणत होतो ते पांढ-या शुभ्र पेहरावाच्या प्रेमात पडले होते.



एकाच मेळ्यात तीन मेळ्याचा योग  साधला गेला.

 माघ मेळा: दर वर्षी माघ पोर्णिमेस प्रयागराज येथे मेळा भरतो.

 कुंभमेळा: दर बारा वर्षानी गुरू मेष राशीत, सुर्य,चंद्र मकर राशीत असतात तेव्हा प्रयागराज, त्रिवेणी संगम येथे कुंभ. या वेळी ही दशा पौष पोर्णिमा ते महाशिवरात्र. (13जानेवरी ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत)

महाकुंभ: जेव्हा 12 वर्षाच्या कुंभमेळ्याचे चक्र 12 वेळा येते तेव्हा 12 व्या कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणतात. या वर्षी हा योग आहे.

असे हे तीन योग साधले गेले.

त्रिवेणी संगम- त्रिवेणी योग.

महाकुंभ स्नान, सुफळ संपूर्ण.

 

पवित्र,पूजनीय गंगा मैया,जमुना मैया और सरस्वती मैया की जय हो.



परतीच्या प्रवासात जबलपूर येथील ग्वरीघाट येथे नर्मदामैयाच्या आरतीत सहभागी होता आले.



 

 

नर्मदे हर हर!