Tuesday, 21 July 2026

आंतरिक ऊर्जा : सजगता= उत्साह, अपव्यय= निराशा !

सध्याच्या परिस्थितीत आपण ऊर्जेच्या वापरा विषयी खूपच जागरूक झालो आहोत. ऊर्जा वाचवण्यावर खूप भर दिला जात आहे. योग्यच आहे.  आपण आपल्या आंतरिक ऊर्जा, उत्साहा विषयी सतर्क आहोत का?

आपल्याला दिवस संपता संपता, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो का?  जाणवत असेल तर समस्या शारीरिक श्रमात नसून, शारीरिक स्थतीवर नसून,  मानसिक स्थितीवर अवलंबून  आहे. म्हणूनच म्हणत असतो कामाने माणूस थकत नाही, तर विचाराने, ताणाने माणूस थकून जातो.

या विषयी नुकताच श्री बावा दिनेश यांचा Feeling Tired All The Time? Fix it now हा विडिओ पहाण्यात आला.

या व्हिडिओमध्ये आपल्या मेंदूची शक्ती, एकाग्रता आणि मानसिक शांतता हळूहळू कमी करणाऱ्या दैनंदिन जीवनातील पाच महत्त्वाच्या सवयी टाळायची सूचना केली आहे आणि आपली एकाग्रता, कार्यक्षमता (Productivity) व मनःशांती  कशी सांभाळावी याचे सोपे आणि प्रभावी उपायही सांगितले आहेत. रोजच्या आयुष्यातील काही साध्या सवयी—उदाहरणार्थ महत्त्वाचे निर्णय सतत पुढे ढकलणे किंवा मोबाईलवरील सूचना (Notifications) वारंवार तपासणे—मेंदूवर प्रचंड मानसिक ताण निर्माण करतात. आपला मेंदू आधीच शरीरातील एकूण रक्तपुरवठ्यापैकी २०% पेक्षा अधिक रक्त वापरत असतो. अशा परिस्थितीत जर आपण सतत मल्टिटास्किंग करण्याचा प्रयत्न केला किंवा मनात त्याच त्याच भावनिक प्रसंगांची पुनरावृत्ती (Emotional Replays) करत राहिलो, तर आपण आपल्या मौल्यवान मानसिक ऊर्जेचा अनेक पटींनी अधिक वेगाने अपव्यय करतो.

१ निर्णय घेण्याचे टाळणे अनेक गोष्टी आपण पुढे, उद्या वर ढकलत राहतो, नंतर करेन इत्यादि. अशा प्रकारे मनात अनेक गोष्टी ओपन ठेवत असतो. संपवून (क्लोज) टाकत नाही. यात मेंदूची ऊर्जा खर्च होत असते.  निर्णय घेताना खलील गोष्टी उपयुक्त ठरतील.

जे खरोखर करायचेच नाही ते पूर्णपणे सोडून द्या. जर करायचे असेल तर तारीख आणि वेळ निश्चित करा. आत्ता नाही पण भविष्यात करायचे आहे.

२. उत्पादकतेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे एकाचवेळी अनेक गोष्टी करणे (Multitasking)  आपल्याला वाटते आपण अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकतो. मेंदूची रचना एका वेळी एकाच कामासाठी आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींना न्याय् देणे अवघड होते. दर्जा, गुणवत्ते वर परिणाम होत असतो.

३. मनातील काल्पनिक संवाद,  आपण मनात सतत कल्पना करत असतो. मनोरथ वेगाने दवडत असतो. त्यात  मन अकारण व्यग्र होते, उत्साहावर, उर्जेवर विपरीत परिणाम होत असतो.

४. सर्वांना "हो" म्हणण्याचा सापळा: लोकं  नाराज होऊ  नयेत  म्हणून आपण हो ला हो म्हणत असतो. पण प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाविरुद्ध वागलो की स्वतःबद्दलचा आदर कमी होतो. मनात दव्द्व निर्माण  होते. प्रेम, आदर  म्हणजे अंध आज्ञाधारकपणा नाही.  गरज असेल तिथे ठामपणे "नाही" म्हणता आले पाहिजे.

५. माहितीचा अतिरेक (Information Overload) आज आपल्यावर माहितीचा अक्षरशः मारा होत असतो. माहिती म्हणजे ज्ञान हा गैरसमज पसरत आहे. नको असलेली माहिती ताण, चिंता, अस्वस्थता निर्माण करते, उत्साह हरवून बसतो. 

 

 दिवसाच्या शेवटी जाणवणारा थकवा हा अनेकदा शारीरिक श्रमामुळे नसून मानसिक ऊर्जा अयोग्य ठिकाणी वापरल्यामुळे  जाणवत असतो.  हे आपल्या लक्षात येईल. योग्य काळजी घेऊन, साध्या साध्या सवयी स्वीकारून विचाराची स्पष्टता, एकाग्रता आणि उत्साह उत्तमरित्या वाढवू शकतो. उदा. चालढकल न करता वेळच्या वेळी कामाची सवय, एकाच वेळी एकच कामावर लक्ष केंद्रित करणे, सोशल मीडिया चा अतिरेक टाळणे. नम्रपणे नाही सांगता येणे. इत्यादि सवयी स्वत:ला लावून घेणे म्हणजेच अनावश्यक उर्जेचा, वेळेच्या अपव्यय टाळणे.

ऊर्जा न  ओसांडता, निराशा टाळू या. उर्जेचा योग वापर करून रोजच्या जीवनातील उत्साह वाढवू या !

जिज्ञासूनी यूट्यूब वरील विडिओ अवश्य पहावा.

No comments:

Post a Comment