Monday, 15 September 2025

सुंदर, देखणे असे!

 व्याख्यात्या आदरणीय धनश्री लेले यांनी एका व्याख्यानाचा शेवट करताना कवी भा.ब. बोरकरांच्या एका कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या.

 व्याख्यानाच्या विषयाला पूरक कविता. विषय होता “ विवेकें विचारें अंतर श्रुंगारीजे”.

कविता किती अर्थवाही आहे हे अनुभवा. खरे देखणेपण कश्यात आहे हे ही जाणा.

 

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा

वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

 

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

 

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती

वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

 

प्रांजळ चेहरा असणे हे खरं देखणेपण गोरा आहे की सावळा याला मोल नाही.

सुंदर डोळे जे जगाचं दु:ख पाहून कारुण्याने दाटून येतात,. जशी आकाशात चंद्रप्रभा पसरते.

सुंदर ओठ तेच जे गोड मधुर बोलतात, त्याच्या मृदू भाषेमुळे सत्य कटू वाटेनाशी होते.

देखणे हात जे नवं मंगल घडवतात.

देखणी पाऊले जी ध्येय पथावर चालतात, जीवन पथावर आपला ठसा ठसा उमटवतात.

देखणे खांद्ये जे प्राणीमात्राच्या हितासाठी स्वेच्छेने सूळ वाहून नेतात.  

सुंदर जीवन तेच ज्यात सुख, समाधान, पावित्र्य फाकते, जसा चांदण्यातून शुभ्र प्रकाश पसरतो.

सुंदर मृत्यू तोच आहे, जो सूर्यास्तासारखा तेजस्वी असतो , अंधारात तेजस्वी वारसा सोडून जातो.  

Friday, 12 September 2025

संशय का मनी आला?

 

 

एका बाजूला क्षत्रियधर्म दुस-या बाजूला आप्तस्वकीय यामुळे   अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. संशय का निर्माण होतो?  कसा मनाला घेरतो याचं वर्णन माउलीने खालील ओव्यात केलं आहे आणि उपाय सांगितला आहे. फक्त ज्ञानाने संशयावर विजय मिळविता येतो. आजच्या भाषेत अभ्यासाने डाउट दूर करता येतो.

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥१९६॥
एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्या बद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. ॥१९६॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥१९७॥
अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळेला स्वभावत:च येते, त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. ॥१९७॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥१९८॥
त्याप्रमाणे जो विषयसुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही. ॥१९८॥

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९॥
जो संशयात पडला त्याचा नि:संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला मुकला. ॥१९९॥

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥२००॥
ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो ॥२००॥

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । सशयीं तो नोळखे । हिताहित ॥२०१॥
त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित, ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ॥२०१॥

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०२॥
जन्मांध माणसाला  रात्र-दिवस ज्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. ॥२०२॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०३॥
म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥२०३॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥२०४॥

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा संशय मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. ॥२०५॥

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०६॥
हा फक्त हृदयालाच व्यापून रहातो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ॥२०६॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०७॥
एवढ जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल ॥२०७॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०८॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ नि:शेष नाहीसा होतो. ॥२०८॥

याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०९॥
एवढ्याकरता अर्जुना, अंत:करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू, ॥२०९॥

  

Tuesday, 9 September 2025

सुख-दु:ख कशी निर्माण होतात?

आपलं सुख म्हणजे इंद्रियाचे सुख. इंद्रियांच्या मागणीला शेवट नसतो. मना सारखे घडले कि सुख नाही तर दु:ख.

ज्ञानेश्वर माऊली  ज्ञानेश्वरीच्या दुस-या अध्यायात सांगतात.

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात.

जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥

ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दु:ख व थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते).

देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात.  

मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥

मृदु व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दु:खाला कारण होतात.  

भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥

भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात.  

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥

सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात.  

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.  

देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.

या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो.

देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस.

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

इंद्रिये जे म्हणतील, ते तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या नादाने जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. 

तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज.

  

Wednesday, 3 September 2025

कण-क्षण

 

आचार्य अत्रेंचं एक खूप प्रसिध्द  नाटक आहे. “ब्रह्मचारी”.  नवीन संचात ही हे नाटक आलं होतं आजचा आघाडीचा कलाकार श्री प्रशांत दामले यांनी काम केल्याचं आठवत त्यात मूळ समर्थ रामदासांच्या रचनेवर आधारित एक गीत होते. शब्द होते.

घटिका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा;
आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना ॥

एक प्रहर दोन प्रहर, तीन प्रहर गेले;
चौथा प्रहर संसारात, चावटीने नेले ॥

रात्र काही झोप काही, स्त्रीसंगे गेली;
ऐशी आठ प्रहरांची, वासलात झाली ॥

दास म्हणे तास वाजे, सकळां स्मरण देतो;
वेळोवेळी राम म्हणा, म्हणोनी झणकारितो ॥

 

यात म्हटलंय , वेळ, काळ झटपट निघून चालला आहे. आयुष्य हातातून निसटून चाललाय. या काळाचा उपयोग करून जीवनात चांगलं काही मिळावा. समर्थाच्या वेळी जीवनात राम असणे ही सर्वोच्च  प्राप्ती होती. राम मिळवा त्याच्या सद्गुणाचा आठव करून आपल्या जीवनात ते गुण उतरवा. गुण कालातीत आहेत. घड्याळाची टिकटिक दर्शविते कि आयुष्यातील एक एक क्षण कमी होतो आहे. वेळेचा सदुपयोग करा.

भारतीय संस्कृतीत कण आणि क्षण ही मोजमापाची एकक आहेत. कण म्हणजे वस्तूचा सूक्ष्म भाग. क्षण म्हणचे काळाचा अल्प भाग. अंदाजे ४-६ सेकंद. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे.

क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् । क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥

विद्या आणि धन मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक छोट्या संधीचा उपयोग करावा. जर एक क्षण वाया गेला तर विद्या  मिळणार नाही आणि कण वाया गेला तर धन. आपल्यात एक म्हण आहे, एक गेली वेळा वरचे गेले सोळा.

काळाचा महिमा अपरंपार आहे. TIME IS MONEY असं म्हटलं जाते. याचा अर्थ जीवनात वेळेचे नियोजन योग्य प्रमाणे करा. वेळ मौल्यवान आहे.

क्षणाचा उपयोग करून विद्या मिळावा व कणा कणाने धन धान्य कमवा .