Friday, 8 May 2026

संजीवनी परिवार व्याख्यानमाला २०२६ पुष्प १ले.

 “असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे ”   प्रा. डॉ.  मृदुला दाढे. 




“असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे, फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत” ह्या कवयित्री शांता शेळकेंच्या कवितेवरुन आजच्या कार्यक्रमाचे शीर्षक दिलं आहे.  प्रा. मृदूलाताई  संजीवनी परिवार आयोजित संजीवनी व्याख्यानमाला २०२६ च्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलत होत्या.  पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक सौ. रीमा नाईक यांनी केले. आजचे व्याख्यान महान गायिका स्व. आशाताईंना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी  संगीत शिक्षिका सौ. मनीषा आपटे मॅडम होत्या. ईशस्तवन श्री. अरविंद पाटील, कौस्तुभ पाटील, सौ. सुविधा नाईक व सौ. मंगला नाईक यांनी सादर केले.




 डॉ . मृदूलाताईंनी प्रतिभावंत गीतकार, संगीतकार, गायक आणि वादक यांनी अनेक गीते अजरामर केल्याचं त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरण करुन सोदाहरण समजावून सांगितलं. आशताईंच्या "ही वाट दूर जाते"  ने  सुरवात करुन या गाण्यातील सौदर्यस्थळे उलगडून दाखवताना, तुमचं गाव ही गोवा, कोकणाची आठवण करुन देत असल्याचं म्हणाल्या. शब्द आणि भावना अर्थवाही करत पं. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिल्या. संगीतकारांची प्रतिभा, वैशिष्ट्ये दाखवताना बाबूजींचे  "का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला"  "जीवलगा कधी रे येशील तू"  या गाण्यातील शब्दाचे वजन, उकारातील मुलायमपणा  अर्थाप्रमाणे येणारे आरोह अवरोह गाऊन दाखवले. गाण्याचा ताल कसा जपला जातो हे त्यांनी "ज्योतीकलश छलके"   या बाबूजींच्या अजरामर गीतामधून दाखवून दिले. या गाण्याची संगीतकार अनिल विश्वास केलेल्या  थोरवीची कथा सांगितली. श्रीनिवास खळे यांचे वैशिष्ट्य नोंदवताना  "सुंदर ते ध्यान"  या अभंगाचा उल्लेख करून ‘ध्यान’ हा शब्द कसा उच्चारला आहे हे बघण्याचे आवाहन केले. इतक्या कमी वेळेत यासर्व मंडळीच्या कामाला न्याय देणे कठीण आहे. त्याच्या प्रतिभेला नमन असे म्हणत त्यांनी हिंदीमधील मदनमोहन यांच्या “ लग जा गले कि फिर ये हसीन रात हो ना हो”  या गीताचे सादरीकरण सर्वांची मने जिंकून गेले.  मदनमोहन शिवाय हिंदी सिनेमा संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी हिंदीतील सलिल दाच्या न जाने क्यु , यस दी बर्मन यांच्या सोच के ये गगन झूमे अभी चाँद निकल आयेगा या गीताचा, आर डी बर्मन यांच्या मेरा कुछ समान आणि शेवट त्यांनी "नैना लागे रे, नैना लागे रे"  या गीतानी करून अधिक लक्ष देऊन या गीतांचा, संगीताचा आस्वाद घ्या असे आवाहन केले. कार्यक्रम संपूच नये असंच वाटत होतं श्रोते मंत्रमुग्ध, तल्लीन झाले होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ईशिका पाटील हिने सुरेखरित्या  केलं.

 

No comments:

Post a Comment