Saturday, 5 April 2025

अध्याय अठरावा मोक्षसंन्यासयोगः निवडक श्लोक

 




अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥ १८-१४ ॥

कर्मफळ पाच घटकांवर अवलंबून असते: १.अधिष्ठान, २.कर्ता, ३.कर्त्याला उपलब्ध असणारी साधने, ४.कर्त्याने केलेले प्रयत्न, ५.दैव .

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्‌ । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्‌ ॥ १८-३७ ॥

 जे आरंभी जरी विषाप्रमाणे वाटले, तरी परिणामी अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्त्विक म्हटले गेले आहे.

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्‌ । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्‌ ॥ १८-३८ ॥

जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे.  

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १८-३९ ॥

जे सुख भोगकाळी आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप, आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे.

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्‌ ॥ १८-४२ ॥

अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे, ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.

बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ १८-५१ ॥

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ १८-५२ ॥

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्‌ । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १८-५३ ॥

विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमीत भोजन घेणारा; शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. 

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥

हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।  तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥ १८-६२ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल.

अध्याय अठरावा : ७८ मोक्षसंन्यासयोग (गीतेचा नित्कर्ष- त्यागाची पूर्णता)

 

 


अर्जुन म्हणाला, मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे.

भौतिक इच्छा, कामना त्यागून केलेल्या कर्माला संन्यास म्हणतात.

सर्व फळ सोडून केलेल्या कर्माला त्याग म्हणतात. 

सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु काही विचारवंत म्हणतात यज्ञ, दान, तप अशा कर्माचा त्याग कधीच करू नये. शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागाचे वर्णन केले आहे. यज्ञ, दान, तप ही कर्मे महात्म्यानाही पवित्र करतात.  आसक्ती आणि फळांच्या अपेक्षेशिवाय कर्म केली पाहिजेत. कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. नियत कर्माचा त्याग कधीच करू नये. प्रभावाखाली येऊन नियत कर्माचा त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हणतात. नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा क्लेश देतील या भीतीने कर्माचा त्याग करतो. त्याने रजोगुणाचा त्याग केला अस म्हटलं जाते, त्याने उन्नती साधत नाही. ज्या वेळी मनुष्य नियत कर्म कर्तव्य म्हणून करतो सर्व फलांची आसक्ती सोडून देतो, त्याला सात्त्विक त्याग म्हणतात. सत्त्वगुणात स्थित असलेला , अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही, शुभ कर्मात आसक्त राहत नाही. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे शक्य नाही, परतू कर्मफलांचा त्याग शक्य आहे.

वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे आहेत. अधिष्ठान, कर्ता, साधनं, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा (दैव).  शरीराने, वाणीने, मानाने जी काही कर्म मनुष्य करतो ती या पाच कारणामुळे घडत असतात. या पाच कारणांशिवाय मी काही करू शकतो हे मानतो तो मूर्ख आहे.

ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही कर्माला प्रेरणा देणारी तीन कारणं आहेत. इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता याचे तीन प्रकार आहेत. सर्व जीवांमध्ये एकच भाव  म्हणजेच परमात्मा, ब्रह्म पाहतो या ज्ञानाला तू सात्त्विक समज.  विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते राजस ज्ञान जाण. मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, ज्याला सत्याचे ज्ञान राहत नाही, अश्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात.

नेमलेले कर्म, आसक्तीशिवाय , रागद्वेष न ठेवता, फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते ते सात्त्विक कर्म होय. 

फळांची इच्छा धरून मोठ्या प्रयासाने आणि खोट्या अंहकाराने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. 

जे कर्म मोहाने, शास्त्राची अवहेलना करून, हिंसा अथवा इतरांना क्लेश देण्यासाठी केले जाते ते तामसिक कर्म होय.

नि:संग, निरहंकारी, उत्साही, निश्चयी आणि यशापयशाने विचलित न होता आपले कर्म करतो तो सात्त्विक कर्ता.

जो  कर्ता आसक्त, लोभी, इर्षाळू, अपवित्र, सुख दु:खाने  विचलित होणारा असतो तो रजोगुणी कर्ता होय. 

शास्त्राविरुध्द कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, आळशी, सदैव खिन्न आणि कामात चालढकल करणारा असतो तो तमोगुणी कर्ता होय.

ज्या बुद्धीद्वारे  मनुष्य कार्य आणि अकार्य , प्रवृत्ती आणि निवृत्ती, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्त्विक बुद्धी होय.

जी बुद्धी, धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय.

भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते, सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती तामसिक बुद्धी होय.

जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे केलेला आहे, जो मन, प्राण आणि इंद्रियांना संयमित करतो तो सात्त्विक निश्चय होय.  ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त तो निश्चय राजसिक होय. स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जी बुद्धी जाऊ शकत नाही ती तामसी धृती होय,

जे आरंभी कडू विख शेवटी अमृततुल्य असते आणि स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्त्विक सुख म्हटले जाते.

इंद्रियांचा विषयाशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख, जे प्रारंभी अमृतासारखे वाटते आणि शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते.

जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही. जे आरंभापासून शेवटापर्यंत मोहमयी असते, जे निद्रा,आळस, प्रमाद या पासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हणतात.

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्गीकरण प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. 

शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.

कृषी, गोरक्षा, आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे.

श्रम आणि इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.

आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. सर्व जीवांचा उगम आणि सर्वव्यापी असणा-या भगवंताची पूजा करून मनुष्य स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. मनुष्याला त्याच्या स्वभावानुसार सांगण्यात आलेले कर्म कधीच पाप असू शकत नाही. स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. जो आत्मसंयमी, अनासक्त आहे, सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था, ब्रह्मवस्था कश्या पध्दतीने प्राप्त करतो हे जाणून घे.

आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुध्द होऊन, निश्चयाने मनोनिग्रह करून, इंद्रीयतृप्तीच्या विषयांचा त्याग करून, आसक्ती द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांतस्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया, वाचा, मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टी पासून मुक्त असतो,

ममत्वरहित आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत  निश्चितच प्रगत होतो. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेला मनुष्य सदैव प्रसन्न असतो, कसलाच शोक करत नाही, कशाचीही आकांक्षा करीत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. त्याला विशुध्द भक्तीची प्राप्ती होते. भक्तीनेच मला तत्वता जाणून, पूर्णता जाणून माझ्याशी एकरूप होता येते.

स्वधर्माने प्राप्त झालेली सर्व कर्मे करीत, मा‍झ्या कृपेने मुक्तीची , मोक्षाची प्राप्ती होते.  चित्त  मझ्यात ठेवून, समत्व ढळू न देता सर्व कर्मे मला समर्पित कर. मग तू सर्व संकटे, भय पार करशील जर अहंभावाने हे तू एकले नाहीस तर विनाशाला प्राप्त होशील.

जर तू युध्द केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावाच युद्धाला प्रवृत्त करेल. परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे, आभासी जगात जीव कर्म करीत आहेत.  त्याला पूर्णपणे शरण जा, त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल.

तुला गूढ ज्ञान सांगितलं, याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर.

तू मला प्रिय आहे म्हणून सांगतो. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, नमस्कार कर म्हणजे मला प्राप्त होशील हे तुला प्रतिज्ञेने सांगतो. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, घाबरू नकोस.  जे तप करीत नाहीत, जो भक्त नाही, जो माझा द्वेष करतो यांना हे ज्ञान सांगू नये. भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. याहून जगात मला कोणीही प्रिय नाही. या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. जो श्रद्धेने व द्वेष न करता श्रावण करतो तो पापांतून मुक्त होतो आणि शुभ लोकांची प्राप्ती होते.  हे धनंजया तू एकाग्र चित्ताने श्रावण केलेस का?  तुझा मोह आणि अज्ञान नष्ट झाले का?  अर्जुन म्हणाला, हे कृष्ण! माझा मोह नष्ट झाला आहे. मी दृढ आणि संशयमुक्त  झालो आहे. तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे.

संजय म्हणाला या प्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा अद्भुत, रोमांचकारी संवाद ऐकला. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असता साक्षात  त्यांच्याकडून ऐकले.  हा संवादाचे स्मरण होताच मी आनंदी होत आहे. श्रीकृष्ण भगवंताचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिक विस्मयकारी होत आहे.

जेथे योगेश्वर कृष्ण, जेथे महान धनुर्धारी अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे असे माझे मत आहे.

Friday, 4 April 2025

अध्याय सतरावा श्रद्धात्रयविभागयोगः निवडक श्लोक.

 

 


सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत । श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते).

 आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः । रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या

 आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ १७-८ ॥

आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्त्विक पुरुषांना प्रिय असतात.  

 कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा

 दुःखशोकामयप्रदाः ॥ १७-९ ॥

कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात.

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ । उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ॥ १७-१० ॥

जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. 

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌ । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १७-१५ ॥

जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते. ॥ १७-१५ ॥

मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः । भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १७-१६ ॥

मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवच्चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता, हे मनाचे तप म्हटले जाते.

 

अध्याय सतरावा २८ ; श्रद्धात्रयविभागयोग श्रद्धेचे तीन प्रकार !

  

 


अर्जुन विचारतो , जे शास्त्रविधीचे  पालन न करता स्वत:च्या धारणे नुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते सत्त्वगुणी, रजोगुणी, की तमोगुणी असतात.

श्री भगवान म्हणाले , प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा तीन प्रकारची असू शकते, सात्त्विकी, राजसी, तामसी.  जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. सात्त्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक राक्षसांचे तर तामसिक भूतप्रेतांचे पूजन करतात. जे दंभ आणि अहंकाराने , शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्ती ने झपाटलेले असतात. देहाला आणि अंतर्यामी परमात्म्याला कष्ट देतात त्यांना असुर म्हणाले जाते. मूळ त्रैगुण्य  त्यातून स्वभाव, स्वभावानुसार श्रद्धा, श्रद्धेनुसार क्रिया;

आता आहाराचे तीन प्रकार.  सात्त्विक आहार , स्निग्ध, रसाळ, मधुर, पौष्टीक  असतो. चित्तशुद्धि, बळ , आयुष्य वाढवणारा  असतो.  राजस आहार, खारे, रुक्ष, कडू, तिखट, दाहक असा असतो. दु:ख , शोक, रोग वाढवितो. रसहीन, शिळे, दुर्गंध-युक्त , निषिध्द मानलेले, उष्टे अन्न म्हणजे तामसी आहार.

फलाची अभिलाषा सोडून, कर्तव्य समजून विधियुक्त , मन लावून यज्ञ केला जातो त्याला सात्त्विक यज्ञ म्हणतात. फळाची इच्छा ठेवून, दंभाने लोकांत मिरवून केला जातो तो राजस यज्ञ होय.  विधी नाही, मंत्र नाही, निष्पत्ति नाही, श्रद्धा नाही, त्याग नाही अशाला तामस यज्ञ म्हणतात.

भगवंत, ब्राह्मण, पूज्य व्यक्ती, गुरु यांचे पूजन पावित्र्य, ब्रह्मचर्य  अहिंसा यांना शारीरक तप म्हटले जाते.

सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्षुब्ध न करणारे बोलणे नियमित पणे स्वाध्याय करणे यांना वाचिक तप म्हणतात.

प्रसन्न-वृत्ति, संयम, समाधान, आत्म-संयम भावशुद्धी हे मानसिक तप.  या शारीरिक, वाचिक, मानसिक त्रिविधी तपाला सात्त्विक तप म्हणतात.

सत्कार, मानसन्मान मिळावा म्हणून दंभाने जे तप केले जाते त्याला राजसिक तप म्हटले जाते. ते क्षणिक आणि अस्थिर असतात. दुराग्रहाने अंतरात्म्याला पीडून किंवा इतरांना व्यस्थित करणारे तप तामसिक होय.

कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला, योग्य ठिकाणी, योग्य वेळी, काळी, परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलेल्या दानाला सात्त्विक दान म्हणाले जाते. परंतु जे परतफेडीची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून, संकुचित वृतीने दिले जाते त्याला राजसिक दान म्हटले जाते. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलानापुर्वक दिल्या जाणा-या दानाला तपासिक दान म्हणतात.

ब्रह्म एकच पण  ॐ तत सत या  त्रिविध नामातून ते प्रकट झाले. या त्रिविध मंत्रातून सृष्टी उत्पन्न झाली.  ॐ कार उच्चारून उपासक यज्ञ, दान, तप याचे अनुष्ठान करतात.  फळाची वासना टाकून, तत काराचे स्मरण करून मोक्षप्राप्ती वर लक्ष ठवून यज्ञ, दान, तप इत्यादी विविध क्रिया कराव्यात.

परम सत्य हे भक्तिमय यज्ञा चे उद्दिष्ट आहे ते सत ने निर्देशले जाते. यज्ञ, तप, आणि दान आदी कर्मा ना सत म्हणतात.

यज्ञ, दान, तपे कर्मे अश्रद्धेने केली तर दोन्ही लोकांत निष्फळ आणि खोटी ठरतात.

Thursday, 3 April 2025

अध्याय सोळावा दैवासुरसम्पद्विभागयोगः निवडक श्लोक.

 

 








त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‌ ॥ १६-२१ ॥

काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. 

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ १६-२३ ॥

जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही.

 

 

अध्याय सोळावा २४ दैवासुरसंपदविभागयोग, दैवी आणि आसुरी स्वभाव.

 

 


 

श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्त्वशुद्धी, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, दयाभाव, लोभाविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्त हे सर्व दैवी गुण दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात.

हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान, आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. दैवी संपत्ति मोक्षाला पोहचविणारी आहे आणि आसुरी संपत्ति बंधनात घालणारी आहे. माणसाचे हृदय दैवी संपत्तीने भरलेलं आहे आसुरी संपत्ति प्रवाहाने येते. जगात दैवी आणि आसुरी  असे दोन प्रकारचे जीव आहेत. वर दैवी गुण बघितले  आता आसुरी गुणांचे विवरण ऐक.

आसुरी प्रवृतीचे लोक काय करावे काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार, तसेच सत्य त्यांच्यामध्ये आढळत नाही. ते म्हणतात कि, हे जग असत्य, निराधार आहे, परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करत नाही. केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे जग निर्माण झाले, कामा खेरीज अन्य कोणतेही कारण नाही. अश्या विचारामुळे स्वत:चा आणि जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्म करतात. कधीही तृप्त न होणा-या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदा मध्ये डुंबत, मोहित झालेले आसुरी लोक, अनित्य गोष्टींकडे आकर्षित होऊन सदैव अशुचीर्भूत कर्म करण्यासाठी व्रतस्थ झालेले असतात. अपार  चिंतेनी ग्रासलेले , इंद्रिय तृप्ती हेच एकमेव उद्दिष्ट मानून काम भोगात अडकलेले. आशेत गुरफटलेले, काम-क्रोधात तत्पर. अधर्माने धन संचय करतात.

असुरांचे मनोरथ संपत्ती , सत्ता आणि संस्कृती. मीच धनवान , मीच स्वामी , मीच भोक्ता मी कुलीन असा संकृतीचा अभिमान. आपल्याला श्रेष्ठ मानणारे, सदैव उद्धट असणारे, धन, खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक शास्त्र न पाळता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. अहंकार, बल, गर्व, काम यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या आणि इतरांच्या देहा मध्ये असणा-या भगवंताचा द्वेष करतात, ख-या धर्माची निंदा करतात. जे द्वेषी, क्रूर, नराधम आहेत त्यांना मी चीरकालासाठी आसुरी योनीत टाकीत असतो. आसुरी योनीत वारंवार जन्म प्राप्त झालेले अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात.

 

काम, क्रोध आणि लोभ ही नरकात जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. या तिन्हीमुळे आत्माच्या नाश होतो.

म्हणून शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य योग्य-अयोग्य यामधील भेद जाणून मनुष्याने कर्म करावे जेणे करून क्रमश: उन्नती होईल.

थोडक्यात आसुरी संपत्ति दूर करून दैवी संपत्ति जवळ करावी.

 

Wednesday, 2 April 2025

अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग, परम पुरुषाचा योग: निवडक श्लोक

 

 


निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।  द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्‌ ॥ १५-५ ॥

ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत, ते सुख-दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात.

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ १५-६ ॥

ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी; तेच माझे परमधाम आहे.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ॥ १५-१५ ॥

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच

 स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य

 आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे. 

अध्याय पंधरावा २० - पुरुषोत्तम योग, परम पुरुषाचा योग.

 

 


 

श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे, ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो

या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत.  याच्या डहाळया म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खाली पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत.

या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत  नाही. याचा आदि, अंत, आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राव्दारे छाटून टाकली पाहिजेत.

त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की, ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परम पुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परम पुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे.

जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासानेतून मुक्त झाले आहेत तसेच सुख दु:खाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना या शाश्वत धामाची प्राप्ती होते.

त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र, अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत.

बध्द जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बध्द जीवनामुळे हे मना सहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत.

ज्या प्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील  जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुस-या देहात घेऊन जातो. अशा रीतीने, तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो.

अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो.

जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत; परतू ज्यांना ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. 

प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात; परंतु ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत.

अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्निचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते.

मी प्रत्येक ग्रह गोलात प्रवेश करतो आणि मा‍झ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो.

सर्व प्राणिमात्रांच्या देहामधील जठराग्नि मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो.

मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाता ही मीच आहे.

च्युत (क्षर) आणि अच्युत (अक्षर) असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि अध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते.

या दोहों व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत, जे स्वत: अव्ययी भगवंत आहेत आणि तोच त्रीलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहे.

मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे, जगता मध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिध्द आहे.

जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता! तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो.

हे निष्पाप अर्जुना ! हा वैदिक शास्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो.

 

विनोबा म्हणतात पंधराव्या अध्यायात सर्व विचाराची परिपूर्णता झालेली आहे. गीते मध्ये आता पर्यंत जीवनाचे जे शास्त्र, जे सिद्धांत सांगितले त्यांची पूर्णता या अध्यायात केली आहे. परमार्थाचे भान मनुष्याला करून देणे हेच वेदांचे काम ते या अध्यायात आहे.

सृष्टी, जीव परमात्मा याचे गूढ या अध्यायात वर्णन केले आहे. हे सर्व जाणून अभ्यासतो तो सर्वज्ञ होय ..   आणि तोच पुरुषोत्तम.

Tuesday, 1 April 2025

अध्याय चौदावा गुणत्रयविभागयोगः निवडक श्लोक

 

 

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १४-१८ ॥

सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्यलोकातच राहातात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशू इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. 

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ १४-२५ ॥

जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात मी कर्ता असा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.


अध्याय चौदावा २७ गुणत्रयविभागयोग (त्रीगुणमयी माया):

  


भगवान म्हणाले , सर्व ज्ञानामधील थोर ज्ञान मी पुन्हा सांगतो. ते जाणून सर्व मुनी मुक्त झाले.  ह्या ज्ञानाच्या बळाने ते मा‍झ्या सारखेच दिव्य होतील. ते सृष्टी निर्मितीच्या वेळी जन्म घेत नाहीत, प्रलयाच्या वेळी मृत्यू पावत नाहीत.

ब्रह्म नामक तत्त्व हे प्राकृत सृष्टीच्या जन्माचे स्रोत आहे. या ब्रह्माला मी प्रेरित करत असतो, त्यातून जीवांचा जन्म होतो. भौतिक प्रकृती मध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात, मी बीज प्रदान करणारा पिता आहे.

भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बध्द होतो. अर्जुना ! सत्त्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे. जे सत्त्वगुणा मध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बध्द होतात. असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे जीव सकाम कर्मांशी बांधला जातो. अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस, आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत.

हे भारता! सत्त्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो. रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण मूर्खपणाशी बांधतो.  मनुष्य म्हणजे तीन गुणांचं मिश्रण आहे. कधी सत्त्वगुणाचा , कधी रजोगुणाचा  तर कधी तमोगुणाचा प्रभाव जाणवत असतो. जेव्हा देहाची सर्व द्वारे प्रकाशित होतात तेव्हा सत्त्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो. जेव्हा बुद्धी रजोगुणाच्या आहारी जाते तेव्हा आसक्ती, सकाम कर्म आणि लालसा ही लक्षणं दिसतात. जेव्हा तमोगुणाची  वृद्धी होते तेव्हा अंध:कार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतो.  मनुष्याचा सत्त्वगुणात मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. रजोगुणात  मृत्यू होतो तेव्हा सकाम कर्मामध्ये संलग्न असलेल्या मनुष्य लोकात जन्म घेतो. जेव्हा तमोगुणात मृत्यू होतो तेव्हा पशुयोनीत जन्म घेतो.

सत्त्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह, अज्ञान उत्पन्न होते. सत्त्वगुणी मनुष्य क्रमश: उच्चतर लोकामध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात. तमोगुणी लोकांचे नरकलोकात अध:पतन होते. मनुष्या जाणतो  प्राकृतिक गुणामुळेच कर्म घडत असतात, अन्य कोणी कर्ता नाही. त्याला  गुणा पलीकडे असणा-या परम पुरुषाची जाणीव होते, त्याच्याशी एकरूप होतो. जेव्हा जीव त्रिगुणांच्या पलीकडे जातो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा यांचं दु:ख सोडून, मुक्ती प्राप्त करतो. अर्जुन विचारतो , जो त्रिगुणातीत आहे, त्याचे लक्षण काय? त्याची वागणूक कशी असते? आणि तो गुण कसा तरून जातो?  

जो प्रकाश, आसक्ती, आणि मोह यांची उपस्थिती असताना द्वेष करत नाही किंवा नाहीसे झाले तरी आकांक्षा करीत नाही. निर्सर्गाने प्राप्त झालेली कर्मे करतो. त्याचाच खेळ आहे हे जाणून निश्चल राहतो. जो आत्म्यामध्ये रममाण आहे. सुखदु:खाला सारखेच मानतो, दगड,सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय गोष्टीत समभाव राखतो, स्तुती, निंदा, मान, अपमान या कडे समदृष्टीने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो. जो धैर्यवान आहे. ज्याने भौतिक कर्माचा त्याग केला आहे त्याला गुणातीत म्हटले पाहिजे. जो एकनिष्ठ भक्तीने अखंड सेवा करतो तो त्रीगुणापलीकडे जाऊन गुणातीत होऊन ब्रह्माचा अनुभव घेतो. ब्रह्मज्ञान, मोक्ष, अविचल नीतिधर्म, आत्यंतिक सुख या सर्वांना मीच आधार.

 

परमेश्वराची उपासना भक्ती म्हणजेच प्रयत्नवाद आणि परमेश्वराची कृपा.

 

Monday, 31 March 2025

अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः निवडक श्लोक

 

 


श्रीभगवानुवाच

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-१ ॥

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक, क्षेत्रज्ञ असे म्हणतात.  

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत । क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ १३-२ ॥

हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्‌ । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ १३-७ ॥

मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादीं बाबत सरळपणा, श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह.

कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ १३-२० ॥

कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो.  

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्‌ । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ १३-२७ ॥

जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो.

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ १३-३२ ॥

ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्याकारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

 

 

Sunday, 30 March 2025

अध्याय तेरावा ३५ क्षेत्राक्षेत्रज्ञविभाग योग (प्रकृती, पुरुष आणि चेतना):

 


 

अर्जुन विचारतो , हे केशव! मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान, ज्ञेय बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे.

भगवान म्हणाले , हे कौतेया! या शरीराला क्षेत्र म्हटलं जाते आणि जो या शरीराला जाणतो तो क्षेत्रज्ञ होय.

सर्वात वसणारा क्षेत्रज्ञ मीच आहे हे जाण. क्षेत्र- क्षेत्रज्ञ मधील  भेद जाणणे म्हणजे ज्ञान होय.

क्षेत्र कोण कसे त्याचे विकार कोणते. क्षेत्रज्ञ कसा  कोण हे थोडक्यात सांगतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान विविध ऋषिनी विविध ग्रंथात सांगीतले आहे. हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सुत्रा मध्ये आले आहे.

पंचमहाभूते, अंहकार, बुद्धी, अव्यक्त, दहा  इंद्रिये, मन पाच इंद्रिय विषय इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित थोडक्यात क्षेत्र म्हटलं जाते.

नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, अध्यात्मिक गुरूला शरण जाणे, पावित्र्य,स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, अंहकार रहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी मधील दु;ख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासाची उत्कट इच्छा, परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो या व्यतिरेक जे आहे ते अज्ञानच आहे.

ज्ञेय म्हणजे जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. माझ्या आधीन असणारे ब्रह्म जगताच्या कार्य-कारणांच्या पलीकडे आहे. सर्वत्र त्याचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ आहे तरीही तो इंद्रीयरहित आहे. तो सर्व जीवांचा पालन कर्ता असून अनासक्त आहे. प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे आणि सर्व प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे.

परमसत्य हे चराचर प्राणिमात्रांच्या आत आणि बाहेर आहे. सूक्ष्म असल्यामुळे पाहता आणि जाणता येत नाही. दूर असले तरी जवळ आहे. परमात्मा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो विभक्त नसतो. तो एकमेव आहे. तो पालनकर्ता आणि संहारकर्ता असल्याचे जाणले पाहिजे. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो अंधकाराच्या अतीत आहे. तो अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे. आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात आहे. क्षेत्र, ज्ञान ज्ञेय याचे थोडक्यात वर्णन केले आहे. हे जाणून मला प्राप्त होऊ शकतो. 

भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे त्रिगुण आणि विकार भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात.  प्रकृती सर्व भौतिक कार्य-कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटलं जाते तर जीव संसारातील विविध सुख दु:खाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. याप्रमाणे  जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा,अनुमती देणारा तो परमात्मा म्हणून जाणला जातो.  जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार यातील तत्त्व जाणतो त्याला मोक्षप्राप्ती होते.

परमात्म्याची अनुभती अंतरातील ध्यानाद्वारे, ज्ञानाच्या अनुशिलनाद्वारे, आणि निष्काम कर्माद्वारे करता येते. प्रमाणित व्यक्तींकडून परमपुरुषासंबंधी  ऐकून उपासना करून जन्म-मृत्यूचा मार्ग पार करतात. चर आणि अचर असे जे काही पाहत आहेस, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगा पासून निर्माण होते. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणा-या परमात्म्याला पाहतो आणि जाणतो, नश्वर देहातील आत्म्याचा आणि परमात्म्याचा विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो, जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने पाहतो तो मनामुळे स्वत:ची अधोगती होऊ देत नाही, तो परमगतीला प्राप्त होतो. जो पाहतो कि शरीर सर्व कर्मे करते आणि आत्मा अकर्ता आहे, तो सत्य पाहतो. विवेकी मनुष्य भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवून जीवांचा कसा विस्तार झाला हे जाणतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते.

अनादित्व, निर्गुणत्व, अव्ययत्व, अकर्तुत्व हे दिव्य आत्म्याचे गुण आहेत. आकाश सर्वव्यापी असून ते कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. देहात भरलेला आत्माही लिप्त होत नाही.

एकमेव सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो त्याच प्रमाणे शरीरात असलेला आत्मा क्षेत्रज्ञ  शरीराला, क्षेत्राला प्रकाशित करतो. ज्ञान दृष्टीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक जाणतात ते भौतिक प्रकृती पार करून ब्रह्मपदी पोहोचतात.