Friday, 5 December 2025

कुठून कुठंपर्यन्त

 

 

 

फेसबुक पाहत होतो. केंद्रीय मंत्री किरण रिजूजीची एक पोस्ट आहे. त्यात धुंध  चित्रपटातील संगीतकार रवि , गीतकार साहिर लुधियानवी यांची “इक धुँद से आना है इक धुँद में जाना है “  ही  गजल म्हटली आहे. (जिंदगिका सफर ए कैसा सफर) याची आठवण करून देणारी.

ही संपूर्ण ग़ज़ल मानवाच्या अस्तित्वातील अनिश्चितता, क्षणिकता आणि जीवनाच्या तात्त्विक रहस्यांवर भाष्य करते.
  

संसार की हर शय का इतना ही फ़साना है
इक धुँद से आना है इक धुँद में जाना है


ये राह कहाँ से है ये राह कहाँ तक है
ये राज़ कोई राही समझा है न जाना है                                                                                           
 
इक पल की पलक पर है ठहरी हुई ये दुनिया
इक पल के झपकने तक हर खेल सुहाना है

 क्या जाने कोई किस पर किस मोड़ पे क्या बीते

इस राह में ऐ राही हर मोड़ बहाना है

 हम लोग खिलौना हैं इक ऐसे खिलाड़ी का

जिस को अभी सदियों तक ये खेल रचाना है

 

या जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव — याचं इतकंच सार आहे,
अस्पष्ट धूसरतेतून (अज्ञानातून) जन्म घेणं, आणि परत त्याच धूसरतेत (अनिश्चिततेत) विलीन होणं.
ही  वाट नेमकी कुठून सुरू होते, कुठपर्यन्त  संपते,
हे आजवर कोणत्याही प्रवाशाला समजले नाही, कळलेले नाही.

ही संपूर्ण दुनिया एका क्षणाच्या पापणीवर थांबलेली आहे,
पापणी मिटेपर्यंत या जगातील प्रत्येक खेळ, आनंददायी आहे.

या जीवनाच्या वळणांवर कोणावर काय संकट, काय घटना ओढवेल, हे कुणालाही माहीत नाही.
प्रत्येक वळण एक नवीन बहाणा, एक नवीन चाचणी घेऊन उभं राहतं.

आपण सारे फक्त खेळणं आहोत,एका अशा मोठ्या "खेळाडू"च्या हाती (नियती, काळ, परमेश्वर),
ज्याला अजून शतकानुशतके हा खेळ, सृष्टीचा,
जीवनाचा — चालू ठेवायचा आहे.

     https://youtu.be/s_5QU8YouSs?si=9AbGL5z6WAvmN31B



    

Wednesday, 26 November 2025

पराभव : खलील जिब्रान

 

 

तत्त्वज्ञ कवी, खलील जिब्रान (1883–1931) हे लेबनीज-अमेरिकन कवी, तत्त्वज्ञ, कलाकार आणि विचारवंत. जगभरातील वाचकांमध्ये ते त्यांच्या अध्यात्मपूर्ण, तत्त्वचिंतनात्मक लिखाणासाठी  प्रसिद्ध आहेत. त्यांची पराभव ही कविता, अंतर्मुख करते आपल्याला.

पराभव : खलील जिब्रान

पराभवा, माझ्या पराभवा — माझा एकांत आणि माझी अलिप्तता;
तू मला हजार विजया पेक्षा अधिक प्रिय आहेस;
आणि जगातील सर्व कीर्तिपेक्षा माझ्या हृदयाला अधिक प्रिय  आहेस.

 

पराभवा, माझ्या पराभवा — माझे आत्मज्ञान आणि माझा विरोधा भास ;
तुझ्यामुळे मला कळते की मी अजूनही तरुण आहे आणि चपळ आहे;
आणि  क्षणिक गौरवात अडकून पडण्यासाठी नाही.
आणि तुझ्यात मला मी सापडला आहे;
आणि तुच्छ  आणि टाळले जाण्यातील आनंदही.  

 

पराभवा, माझ्या पराभवा — माझी तळपणारी तलवार आणि ढाल;
तुझ्या डोळ्यांत मी जाणले आहे —
की मानसन्मान म्हणजे गुलामी आहे;
आणि समजून घेणे म्हणजे समान पातळीवर खाली आणणे;
आणि आकलन होणे म्हणजे केवळ परिपक्व होणे.
आणि पक्व  फळाप्रमाणे पडून खाल्ले जाणे.

 

पराभवा, माझ्या पराभवा — माझा धाडसी सोबती;
तू माझे गाणे, माझे रडणे आणि माझे  मौन  — हे सर्व ऐकशील;
आणि फक्त तूच मला सांगशील
पंखांची फडफड, समुद्राची गाज,
आणि रात्री पर्वतांवर लागणाऱ्या वणव्याची  भाषा;
आणि तूच घेशील माझ्या अंतर्मुख, खोल आत्म्याचा शोध.
 
पराभवा, माझ्या पराभवा — माझे अमर धैर्य;
तू आणि मी वादळाशी हसत सामना करू;
आणि आपल्यात जे काही मरते त्यासाठी आपण दोघे मिळून थडगी खणू;
आणि आपल्यात जे काही मरते त्यासाठी आपण दोघे मिळून थडगी खणू;
आणि आपण सूर्यप्रकाशात इच्छाशक्ती घेऊन उभे राहू,
आणि आपण धोकादायक (परिवर्तन करण्याइतके सामर्थ्यवान) होऊ.
 

 

 

 

Defeat

by Kahlil Gibran

Defeat, my Defeat, my solitude and my aloofness;
You are dearer to me than a thousand triumphs,
And sweeter to my heart than all world-glory.

Defeat, my Defeat, my self-knowledge and my defiance,
Through you I know that I am yet young and swift of foot
And not to be trapped by withering laurels.
And in you I have found aloneness
And the joy of being shunned and scorned.

Defeat, my Defeat, my shining sword and shield,
In your eyes I have read
That to be enthroned is to be enslaved,
And to be understood is to be leveled down,
And to be grasped is but to reach one’s fullness
And like a ripe fruit to fall and be consumed.

Defeat, my Defeat, my bold companion,
You shall hear my songs and my cries and my silences,
And none but you shall speak to me of the beating of wings,
And urging of seas,
And of mountains that burn in the night,
And you alone shall climb my steep and rocky soul.

Defeat, my Defeat, my deathless courage,
You and I shall laugh together with the storm,
And together we shall dig graves for all that die in us,
And we shall stand in the sun with a will,
And we shall be dangerous


Friday, 21 November 2025

Prompt Engineering.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेला (AI)  भावना कळत नाहीत. आपण बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला तर म्हणतो भावना पोहचल्या. AI किंवा ChatGPT ला योग्य आणि नेमका प्रश्न विचारला नाही तर चुकीचे, अयोग्य उत्तर मिळेल.  भावना समजून ते उत्तर देणार नाही.

AI (ChatGPT) ला योग्य, नेमके, स्पष्ट आणि परिणामकारक उत्तर मिळावे म्हणून विचारलेला प्रश्न किंवा करायची सूचना (prompt) प्रभावीपणे तयार करणे म्हणजेच Prompt Engineering.  

AI ला प्रश्न विचारणे ही फक्त प्रश्न विचारण्याची गोष्ट नसून, ती खूप नेमकी, तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण पद्धत आहे. एक “डिझाइन” करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे याला Engineering (अभियांत्रिकी) असे म्हटले जाते. Prompt Engineering  

 AI कश्या प्रकारे विचार करते हे समजून प्रश्न विचारावे लागतात. प्रश्नाच्या बाबतीत अनेक गोष्टी स्पष्टपणे नमूद कराव्या  लागतात, संदर्भ, मर्यादा, उत्तर कश्या प्रकारे हवं आहे, अपेक्षित काय आहे, विचार साखळी इत्यादि. ही प्रक्रिया इंजिनियरीग सारखी आहे.

प्रश्न पडणे, प्रश्न विचारणे ही ज्ञान प्राप्तीची सुरवात आहे.

नेमका, योग्य आणि फलदायी प्रश्न कसा विचारावा” याबद्दल भारतीय तत्त्वज्ञानात स्पष्ट मार्गदर्शन आढळते.  विशेषतः न्यायशास्त्र, उपनिषदं, आणि भगवद्गीता यांत याचे सुंदर सूत्रे आहेत.

तैत्तिरीय उपनिषद म्हणते  आचार्यं प्रश्नान् पृच्छेत्”।   ज्ञान प्राप्त करण्यासाठी आचार्यांना नीट, विनम्रतेने आणि योग्य प्रश्न विचार.

न्यायसूत्रातील प्रश्नशास्त्र (न्याय दर्शन)-   प्रश्न विचारण्याची स्पष्ट पद्धत सांगते.   न्यायानुसार योग्य प्रश्नात पाच गोष्टी असाव्यात:

प्रश्नः स्पष्टःप्रश्न स्पष्ट हवा

अर्थवतःअर्थपूर्ण, मुद्देसूद हवा

अनवगाढःअतिशय गुंतागुंतीचा नसावा

अप्रमत्तःमन एकाग्र असावे

संशयपूर्वकःजिथे खरी  शंका असते तिथेच प्रश्न करावा.

 

भगवद गीता चवथ्या अध्यायात सांगते.  ज्ञानासारखे पवित्र काही नाही, आणि ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न हा मुख्य मार्ग.

 

भारतीय तत्वज्ञानात योग्य प्रश्न” कसा असावा याची सूत्ररूप व्याख्या दिली आहे.  स्पष्टो, सुविचारितो, हेतुसंबद्धः प्रश्नः हितकरः” म्हणजेच  स्पष्ट, विचारपूर्वक, आणि हेतुसूचक प्रश्नच हितकारक असतो.

 

 

ह्याच प्रक्रियेला आजच्या भाषेत  Prompt Engineering म्हणतात.

 

अथातो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे सर्वोच्च, निराकार, सर्वव्यापी सत्य जाणून घ्यायची जिज्ञासा, इच्छा .

Wednesday, 12 November 2025

शोध प्रकाशयात्रेचा

 शोध प्रकाशयात्रेचा

काष्ठं, संगमरवर, तार शिल्पंकृतींचे प्रदर्शन, नुकतंच संपन्न झालं.

जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई
४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वसई, वाघोली येथील प्रसिद्ध शिल्पकार श्री सचिन चौधरी यांच जहांगीर आर्ट गॅलरीतलं सहावं एकल प्रदर्शन.
शोध प्रकाशयात्रेचा , प्रवास कलेचा, कृतज्ञतेचे भावनेने केलाला अंतरीच्या दिव्याचा शोध , शोध आत्मप्रकाशचा. परम पूजनीय पांडुरंगशास्त्रीजिंच्या शिकवणीचा प्रभाव दर्शविणार प्रदर्शन. त्यांनी आपल्या सर्जनशील प्रवासाला प्रेरणा देणा-या काही श्लोकाचा उल्लेख केला आहे. त्याचा भावार्थ,
ईश्वर पूर्ण आहे विश्व पूर्ण आहे त्यातून निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट पूर्ण आहे,
भारत भूमीत मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे,
मनुष्याच्या बांधनाचे आणि मुक्तीचे कारण मन आहे,
जन्म,मृत्यू, जरा व्याधी याचे सतत चिंतन कर,
मन, बुध्दी आपले मित्र आणि शत्रू आहेत, विवेक बुध्दीने स्वत:चा उद्धार करा,
भगवान आपल्या हृदयात वास करीत आहे,
तुम्ही अमृताचे पुत्र आहात.
मुग्धपणे दर्शकाला प्रकाशित करणा-या कलाकृती.






सर्जनशील शिल्पविष्कारा मागील शिल्पकार सचिन चौधरी यांनी नमूद केलेले विचार आणि प्रेरणा

 ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


हे (ईश्वर) पूर्ण आहे
, ते (विश्व) सुद्धा पूर्ण आहे. त्या पूर्णातून हे पूर्ण प्रकट झाले. त्या पूर्णातून पूर्ण काढले तरी उरते तेही पूर्णच राहते."

जन्तूनां नरजन्म दुर्लभमिदं तत्रापि पुंसत्त्वं ततः विप्रत्वं तस्माद्वेदपाठश्रुतमहो धर्मोऽपि तस्मात्परः ।

आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटिजन्मसुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥  (विवेकचूडामणि २–३)

सर्व जंतूंपैकी (जीवांत) मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आहे. त्या मनुष्यजन्मातही —पुरुषत्व,त्याहूनही ब्राह्मणत्व,त्याहूनही वेदाध्ययन आणि धर्माचरण,आणि त्याहून सर्वोच्च म्हणजे आत्म–अनात्म विवेक, स्वानुभव, आणि ब्रह्मात्‍मभावात स्थिती ही सर्व मिळविणे शतकोटी जन्मांच्या पुण्यकर्मांशिवाय अशक्य आहे.

दुर्लभं भारतजन्मं, तस्माद्विप्रत्वं, तस्माद्वेदज्ञानम्। तस्मादात्मानुभूतीः, तस्मान्मोक्षः॥

भारतभूमीत जन्म मिळणेहे अत्यंत दुर्लभ आहे, कारण ही धर्म, योग, तप, ज्ञान आणि मुक्तीची भूमी आहे. त्यात ब्राह्मणत्व (सत्कर्म, सद्विवेक, सदाचार युक्त जीवन) मिळणे त्याहून श्रेष्ठ. त्याहूनही उच्च म्हणजे वेदज्ञान आणि आत्मानुभव प्राप्त करणे. आणि अखेरीस त्या ज्ञानातून मोक्ष (मुक्ती) मिळविणे — हेच अंतिम ध्येय.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर् ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥

मी (भगवान) सर्वांच्या हृदयात वास करणारा आहे. माझ्याकडूनच स्मरण (स्मृती), ज्ञान, आणि विस्मरण (अपोहन) हे सर्व उत्पन्न होते. सर्व वेदांद्वारे मीच जाणण्यास पात्र आहे; मीच वेदांचा कर्ता आणि जाणणारा (वेदविद्) आहे.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥ (भगवद्गीता ६.५)

मनुष्याने स्वतःच्या आत्म्याने (बुद्धी, विवेकशक्तीने  स्वतःचाच उद्धार करावा; स्वतःचं पतन (खाली ओढणे) करू नये. कारण स्वतःच आत्मा (मन, बुद्धी) हा स्वतःचाच मित्र देखील आहे, आणि स्वतःचाच शत्रू सुद्धा आहे.

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ (भगवद्गीता ४.११)

हे पार्था (अर्जुना),जे जसे माझ्या शरण येतात, त्यांना मी तसाच प्रतिसाद देतो. सर्व प्रकारचे मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥

जन्म, मृत्यू, जरा (वृद्धापकाळ) आणि व्याधी (रोग) यांमधील दुःखरूप दोषांचे सतत चिंतन करणे, म्हणजेच या दुःखांच्या स्वरूपाचे ज्ञान ठेवणे ही देखील ज्ञानाची (आध्यात्मिक विवेकाची) एक लक्षण आहे.

श्रुण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः ।   (श्वेताश्वतर उपनिषद् – अध्याय २, मंत्र ५)

हे सर्व अमृताचे पुत्रांनो, हे विश्वातील जीवांनो — ऐका!” तुम्ही मर्त्य नाही, तुम्ही अमृतस्वरूप (अविनाशी आत्मा) आहात.

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः। बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्॥

मनुष्यांच्या बंधन आणि मुक्तीचे कारण मनच आहे. जेव्हा मन विषयांमध्ये (इंद्रियसुखात) आसक्त होते, तेव्हा ते बंधनाचे कारण बनते; आणि जेव्हा ते विषयांपासून विरक्त होते, तेव्हा ते मुक्तीचे कारण बनते.

 







Tuesday, 11 November 2025

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास

 

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास — अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. (शोध प्रकाशाचा प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा घेतलेले पुस्तक)

यूव्हाल नोआ हरारी (Yuval Noah Harari) इस्त्रायली (Israeli) इतिहासकार, लेखक, विचारवंत, हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम प्राध्यापक म्हणून काम, मानवजातीचा इतिहास, लष्करी तंत्रज्ञान, माहिती आणि चेतना हे अभ्यास आणि संशोधना चे विषय. त्यांची अनेक पुस्तक जगभर प्रसिध्द आहेत  त्यातील काही महत्वाची पुस्तकं

  • सेपियन्स मानवजातीचा संक्षिप्त इतिहास
  •  भविष्यातील मानवजातीचा प्रवास 
  • २१व्या शतकातील २१ धडे   
  • नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास — अश्मयुगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत.

नेक्सस : माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास  हे त्यांच नवं पुस्तक या पुस्तकात ते काही प्रश्न उपस्थित करतात.

मानव जातीला होमो सेपियन्स  (Home Sapiens) म्हणजे शहाणी मानवजात म्हटलं जाते. ते विचारतात आपण या प्रमाणे वागतो का?

पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते काही प्रश्न आपल्या पुढे ठेवतात.

 

आपण इतके बुद्धिमान आहोत, तरीही इतके आत्मघाती का आहोत?”
आपण विज्ञान, औद्योगिक क्रांती, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अद्भुत गोष्टी निर्माण केल्या; तरीही आपण पर्यावरण नष्ट करतो, युद्धे करतो, तंत्रज्ञानाचा गैरवापर करतो — हे का?

आपल्याकडे इतकी माहिती असूनही आपण इतके गोंधळलेले का आहोत?”
इंटरनेट युगात माहिती विपुल आहे, पण सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता हरवते आहे.  माहितीचा अतिरेक हा ज्ञान नव्हे, तर भ्रम निर्माण करतो. गोंधळवून टाकतो.

आपण इतके जोडले गेलो आहोत, तरीही इतके एकाकी का आहोत?”
सोशल नेटवर्क्स, डिजिटल संपर्क असूनही मानवी मन भावनिकदृष्ट्या अधिक एकटे पडले आहे. म्हणजेच “connection” वाढली, पण “understanding” कमी झाली.

आपण जगावर इतके नियंत्रण ठेवतो, तरीही स्वतःवर नियंत्रण का ठेवू शकत नाही?”
मानवाने अणुशक्ती, जैवतंत्रज्ञान, AI यांवर प्रभुत्व मिळवले.  पण राग, लोभ, मत्सर, स्वार्थ या मानसिक शक्तींवर विजय मिळवू शकला नाही.

 

त्यांनी उत्पन्न केलेले प्रश्न भिडतात ना ! त्यांच्या इतर पुस्तकाविषयी पुन्हाकधीतरी.

 

 

 

Monday, 15 September 2025

सुंदर, देखणे असे!

 व्याख्यात्या आदरणीय धनश्री लेले यांनी एका व्याख्यानाचा शेवट करताना कवी भा.ब. बोरकरांच्या एका कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या.

 व्याख्यानाच्या विषयाला पूरक कविता. विषय होता “ विवेकें विचारें अंतर श्रुंगारीजे”.

कविता किती अर्थवाही आहे हे अनुभवा. खरे देखणेपण कश्यात आहे हे ही जाणा.

 

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा

वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

 

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

 

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती

वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती

देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

 

प्रांजळ चेहरा असणे हे खरं देखणेपण गोरा आहे की सावळा याला मोल नाही.

सुंदर डोळे जे जगाचं दु:ख पाहून कारुण्याने दाटून येतात,. जशी आकाशात चंद्रप्रभा पसरते.

सुंदर ओठ तेच जे गोड मधुर बोलतात, त्याच्या मृदू भाषेमुळे सत्य कटू वाटेनाशी होते.

देखणे हात जे नवं मंगल घडवतात.

देखणी पाऊले जी ध्येय पथावर चालतात, जीवन पथावर आपला ठसा ठसा उमटवतात.

देखणे खांद्ये जे प्राणीमात्राच्या हितासाठी स्वेच्छेने सूळ वाहून नेतात.  

सुंदर जीवन तेच ज्यात सुख, समाधान, पावित्र्य फाकते, जसा चांदण्यातून शुभ्र प्रकाश पसरतो.

सुंदर मृत्यू तोच आहे, जो सूर्यास्तासारखा तेजस्वी असतो , अंधारात तेजस्वी वारसा सोडून जातो.  

Friday, 12 September 2025

संशय का मनी आला?

 

 

एका बाजूला क्षत्रियधर्म दुस-या बाजूला आप्तस्वकीय यामुळे   अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. संशय का निर्माण होतो?  कसा मनाला घेरतो याचं वर्णन माउलीने खालील ओव्यात केलं आहे आणि उपाय सांगितला आहे. फक्त ज्ञानाने संशयावर विजय मिळविता येतो. आजच्या भाषेत अभ्यासाने डाउट दूर करता येतो.

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं । तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥१९६॥
एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्या बद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. ॥१९६॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे । तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥१९७॥
अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळेला स्वभावत:च येते, त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. ॥१९७॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे । तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥१९८॥
त्याप्रमाणे जो विषयसुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही. ॥१९८॥

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला । तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९॥
जो संशयात पडला त्याचा नि:संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला मुकला. ॥१९९॥

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे । आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥२००॥
ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो ॥२००॥

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें । सशयीं तो नोळखे । हिताहित ॥२०१॥
त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित, ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ॥२०१॥

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०२॥
जन्मांध माणसाला  रात्र-दिवस ज्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. ॥२०२॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०३॥
म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥२०३॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥२०४॥

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे । म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा संशय मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. ॥२०५॥

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०६॥
हा फक्त हृदयालाच व्यापून रहातो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ॥२०६॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे । जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०७॥
एवढ जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल ॥२०७॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०८॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ नि:शेष नाहीसा होतो. ॥२०८॥

याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०९॥
एवढ्याकरता अर्जुना, अंत:करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू, ॥२०९॥

  

Tuesday, 9 September 2025

सुख-दु:ख कशी निर्माण होतात?

आपलं सुख म्हणजे इंद्रियाचे सुख. इंद्रियांच्या मागणीला शेवट नसतो. मना सारखे घडले कि सुख नाही तर दु:ख.

ज्ञानेश्वर माऊली  ज्ञानेश्वरीच्या दुस-या अध्यायात सांगतात.

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्‍लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात.

जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥

ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांच्या ठिकाणी काही दु:ख व थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते).

देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

निंदा व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात.  

मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥

मृदु व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दु:खाला कारण होतात.  

भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥

भेसूर व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न करतात.  

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥

सुगंध व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख उत्पन्न करतात.  

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

त्याचप्रमाणे (कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे.  

देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

जेव्हा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.

या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्‍नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

हे विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासमय असतो.

देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

तसे हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस.

इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

इंद्रिये जे म्हणतील, ते तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या नादाने जे वागतात, ते विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे. 

तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली आहे असे समज.