यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥
हे भारता(भरतवंशी
अर्जुना),
जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.
परित्राणाय
साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥
सज्जनांच्या
उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि
धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.
न मां कर्माणि
लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा । इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥
कर्मांच्या फळांची मला
स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा
प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत
नाही.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं
बोद्धव्यं च विकर्मणः । अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥
कर्माचे स्वरूपही जाणले
पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले
पाहिजे. कारण कर्मांचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे.
कर्मण्यकर्म यः
पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ ४-१८
॥
जो माणूस कर्मामध्ये
अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो
मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे.
यस्य सर्वे समारम्भाः
कामसङ्कल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥
ज्याची सर्व
शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच
ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या
महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात.
यदृच्छालाभसन्तुष्टो
द्वन्द्वातीतो विमत्सरः । समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥
जो इच्छेशिवाय आपोआप
मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर
मुळीच वाटत नाही, जो सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या
पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव
ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही.
यथैधांसि
समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा
॥ ४-३७ ॥
कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच
ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो.
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥
या जगात ज्ञानासारखे
पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने
अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो.
श्रद्धावाँल्लभते
ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९
॥
जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर
तो तत्काळ भगवत्प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो.
अज्ञश्चाश्रद्दधानश्च
संशयात्मा विनश्यति । नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥
अविवेकी आणि श्रद्धा
नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख.
योगसंन्यस्तकर्माणं
ज्ञानसञ्छिन्नसंशयम् । आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥
हे धनंजया(अर्जुना), ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि
ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण
स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत.
तस्मादज्ञानसम्भूतं
हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥
म्हणून हे भरतवंशी
अर्जुना,
तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा,
विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला
उभा राहा.
No comments:
Post a Comment