Saturday, 22 March 2025

अध्याय नववा ३४ राजगुह्ययोग (परमगोपनीय ज्ञान ) समर्पण योग

 

 


या अध्यायातील मुख्य गोष्ट “सर्व गोष्टी परमेश्वराला अपर्ण कराव्यात ही सांगितली आहे म्हणून समर्पण योग.

राज-विद्या – विद्यांचा राजा, सर्व विद्यांत श्रेष्ठ विद्या “सर्वोत्तम  ज्ञान-दृष्टी.” ज्ञानापेक्षा ज्ञान-दृष्टी महत्त्वाची. तिला शं‍कराचार्यांनी ब्रह्मविद्या म्हटले आहे. हे ज्ञान अशुभातून सोडविणारे आहे.

व्यक्त विश्व हे अव्यक्ताचाच आविर्भाव आहे. व्यक्तातील अव्यक्त ओळखण्याची गरज असल्यामुळे गुह्य, गुपित म्हटलं आहे.

गीतेतील महाव्याक्य  व्यक्त= अव्यक्त = परमेश्वर तिन्हीमध्ये भेदच नाही हे व्यक्त मी अव्यक्त रूपाने व्यापिलं आहे.

कल्पांत : ब्रह्मदेवाच्या दिवसाचा अंत, काल्पनिक प्रलय.

कल्पारंभ : ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ,काल्पनिक सुष्ट्यारंभ.

इच्छाशक्ती, क्रियाशक्ति, ज्ञानशक्ती  या जीवनातील तीन समर्थ शक्ती.

विशाल आत्मा , महान हृदय , महान बुद्धी – महात्मा.

स्वावलंबन  म्हणजे स्वाश्रय वृत्ती, आत्माधारण शक्ती. स्वत:च्या आधाराने राहणे. मूळ संकृत शब्द स्वधा म्हणजे शरीराचा आधार शरीरच. समाजावर भाररुप न होणे. शरीराचे पोषण शरीरश्रमाने करणे.

संन्यास म्हणजे तोडणे, योग म्हणजे जोडणे.

भक्तीने उध्दार होऊ शकतो. भक्ती असेल तर आचरण बदलू शकते. मोक्षापयोगी ज्ञान लाभू शकते. वेदापेक्षाही हा अध्याय श्रेष्ठ आहे असे ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव नववा अध्याय गात समाधिस्थ झाले अशी कहाणी आहे.

 

भगवंत सांगतात , अर्जुना! तू निर्मळ आहेस. तुला विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले, अनेकांनी अनुभवलेले  ज्ञान सांगतो. हे ज्ञान दु:खातून, अशुभातून सोडवणारे आहे.  हे अत्यंत पवित्र ज्ञान असून आत्मज्ञानाची प्रचीती देणारे, अविनाशी आहे. आणि आचरण करण्यास सुखकारक आहे. अर्जुना ! ज्याची या भक्तीमार्गावर श्रद्धा नाही, त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही.  ते जन्म मृत्यूच्या फे-यात अडकतात.

मी अव्यक्त रुपात सर्व जग व्यापले असून सर्व जीव मा‍झ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. मा‍झ्यात भुते नाहीत, मी भुतात नाही. आकाशात बलशाली वायू असतो त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्या मध्ये असतात हे जाण. कल्पाच्या अंती सर्व भौतिक सृष्टी माझ्या प्रकृतीत लय पावते आणि कल्पाच्या आरंभी माझ्या शक्ती द्वारे पुन्हा निर्माण होते. सर्व सृष्टी माझ्या आधीन असून माझ्या इच्छेनेच तिची पुन: पुन्हा निर्मिती,लय होत असतो. ही सर्व कर्मे मला बध्द करू शकत नाहीत. मी तटस्थपणे या कर्मापासून अनासक्त असतो. मी विश्वारंभ आहे, हे ओळखून दैवी संपत्तीचे महात्मे  किर्तन, वंदन करीत उपासना करतात. इतर ज्ञान रूप यज्ञ करतात. मी संकल्प, मीच यज्ञ, मी अग्नि, हव्य, आहुती आणि दिव्य मंत्र.

मी या जगताचा पिता, माता, आधार, पितामह आहे. तीन वेद मी आहे. मी ज्ञेय, शुध्दिकर्ता, कार आहे. मीच ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, आश्रयस्थान,आणि अत्यंत जिवलग मित्र. उत्पत्ति आणि प्रलय  सर्वांचा आधार आणि अविनाशी बीज मीच आहे. हे अर्जुना! मी उष्णता देतो, मीच पाऊस पडतो, थांबवितो. मी अमृत तत्त्व आहे, आणि मृत्यूही मीच आहे. सत, असत दोन्ही माझ्या मध्ये स्थित आहे. वेदाध्ययन करणारे, सोमपान म्हणजे स्वच्छ, शुध्द, सात्त्विक आहार करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करत देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. स्वर्ग लोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर मृत्युलोकात परत येतात. त्यांना पुन: पुन्हा जन्म-मृत्युच्या चक्रात पडावे लागते.  जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत उपासना करतात त्याच्या क्षेम कुशलाची मी काळजी घेतो. यज्ञाचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे.  इतर देवतांचे भक्त माझेच पूजन करतात. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपसना करतात त्यांना भूतयोनीत जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात.

जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फुल, फळ, अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस, हवन करतोस, दान देतोस, तप करतो ते सर्व तू मला अर्पण कर. या प्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर मन स्थिर केल्यास तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. माझ्या ठायी स्थित आहे त्याचा मी सुध्दा मित्र आहे.  दुराचार झाला, पण नंतर भक्तीचा उदय झाला आणि ईश्वराला अनन्य भावाने भजू लागला तर त्याला साधू मानवा कारण त्याचा निश्चय झाला आहे. तो लवकरच धर्मात्मा होतो. त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. निश्चितपणे जाण कि, माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही.

 हे पार्था! जे माझा आश्रय घेतात, त्यांना परमगती प्राप्त होते. या अनित्य दु:ख मय जगता मध्ये माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न व्हा. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो. माझे पूजन कर मला नमस्कार कर. माझ्या मध्ये   रममाण झाल्याने तू मला प्राप्त होशील.

No comments:

Post a Comment