Saturday 18 December 2021

सृष्टीधर्म

 श्री कमलाकर साधले याचं सृष्टीधर्म हे एक सुंदर पुस्तक. शरीर, मन,  बुद्धी आणि परिसर यांची एक सूक्ष्म संरचना आहे.  त्यातून  सृष्टी  एक दिव्य जीवनसंगीत  प्रसवत असते.त्यातील शाश्वत आनंद अनुभवण्यासाठी "सृष्टीधर्म" प्रत्येकाने जाणून घेऊन पाळायला हवा. या पुस्तकाला डॉ अभय बंग यांची छोटीसी सुरेख प्रस्तावना आहे. ते म्हणतात   

"जो समाजाला धारण करतो तो धर्म ! म्हणजेच समाज टिकवण्याचा आधार असलेली सामाजिक कर्तव्य व नैतिक नियम म्हणजे धर्म. धर्म हा मूलतः नैतिक व कर्तव्यरूप आहे. सृष्टीधर्म म्हणजे सृष्टीला पवित्र मानून तिच्याप्रती आपली कर्तव्य उपासना भावनेने करणे. सृष्टीला पवित्र मानण्याचासाठी आधार प्रत्यक्ष ईशावास्योपनिषदात आहे " ईशावास्यम इदम सार्वम "सर्व सृष्टी ईश्वरमय आहे. मग सृष्टीच्या प्रति पवित्र भाव आलाच व तिच्या संरक्षणाचे कर्तव्यही आले हा आधुनिक धर्म सृष्टीधर्म !! म्हणूनच या पुस्तकाला वैज्ञानिक धर्मग्रंथ म्हणालो". 

सृष्टीच्या निर्मितीचे कारण सांगताना लेखक म्हणतात 
जडपदार्थ , मन , बुद्धी यातील कोणतेच सृष्टीच्या निर्मितीचे कारण नसून निर्भेळ आनंद हेच सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण होय, 
आत्म्याचा उत्कर्षाचा क्रम ही हेच दर्शवतो. 
आत्म्याच्या पंचकोषाचा क्रम असा आहे. अन्नमय कोष , प्राणमय कोष , विज्ञानमय कोष , मनोमय कोष  आणि आनंदमय कोष. एक एक कोष उलगडत शेवटी आनंदमय कोषापर्यंत पोहोचणे म्हणजे इहलोकीच्या जीवनाचे सार्थक होय. आनंदगर्भ हेच सृष्टीचे अस्सल रूप. 
आपल्या सृष्टितील, जीवनातील , पंचमहाभूताचे महत्व खुप मोठे आहे, त्याशिवाय जीवसृष्टीचं अस्तित्व अशक्य आहे. 
श्वास :   आपण सृष्टीतून सर्वप्रथम काय घेत असू तर श्वास आणि आयुष्य संपते तेव्हा शेवटचा श्वास घेतो. श्वासामार्गे प्राणवायू फुफ्फुसात प्रवेश करतो आणि रक्ताचा भाग भाग बनतो. शरीरातील सर्व घटकाला कार्य प्रवण करतो, आपल्या विचाराचा, सृजनात्मक कल्पनांना चालना देतो. अशी प्रचंड किमया श्वास सतत करत असतो. फुफ्फुसे शुद्ध नैसर्गिक हवेतच चांगलं काम करू शकतात. आज आपण हवा प्रदूषित करण्यात कोणतीच कसर सोडत नाही.   परिणामाला सामोरे जावं लागेल. 
 पाणी , आप :
आपोवा इदं सर्व विश्व भूतान्य आप:।
प्राणवा आप: पशव आपो अन्न आपो अमृत आप:।।
पाण्यामुळेच सर्व जीवसृष्टी भूतमात्रा आहे. पाणी , प्राण , अन्न , जीवन , अमृत आहे. 
शीतकाले उष्मच , उष्मकालेतु शीतलम !
जीवनात पाण्याचं खूप महत्व आहे.   जलस्रोतांची किती काळजी घेतो., नदी नाल्याची डबकी बनत चालली आहेत. जागे होणार आहोत का ? देवस्थानाला तीन गोष्टी महत्वाच्या बिंब म्हणजे मूर्ती , तीर्थ म्हणजे पाण्याचा शाश्वत स्रोत. आणि वृक्ष . आज आपल्या गंगा ,यमुना , गोदावरी नर्मदा , सिंधू कावेरी इत्यादी नद्यांच्या काय स्थिती आहे. 
अन्न :
अथो अन्नेनैव जीवन्ति !
अन्न भूतांना श्रेष्ठम !
येन ब्रह्मोपासते !!
अन्नाला  पुर्णब्रह्म म्हटलं आहे. 
अन्न न निद्यात । तदव्रतम ।
प्राणो वा अन्नम ।
शरीरमन्नादम ।
अन्न बहू कुर्वीत । तदव्रतम
अन्नाला नावं ठेवू नयेत. प्राण अन्नामुळे टिकून आहेत शरीर अन्नापासून बनलेले आहे. भरपूर अन्न पिकवण्याचे व्रत अंगिकारा. 
अन्न जशी शारीरिक गरज आहे तशीच भावनिकही.  खाणे हा एक सुखानुभव आहे. अन्न हेच औषध असं आयुर्वेद सांगते. पेरणी , कापणी व मळणी मोठे उत्सव असतात. 
काळाचं गणित, 
काळ आणि गती यांचा घनिष्ट संबंध आहे. काळ -काम-वेग याचा एक वेगळा आकृतिबंध जपण्याची गरज आहे. काळ म्हणजे बदल , सृष्टीतील शरीरातील बदल हे  सृष्टीच्या गतीनेच होणार. आपल्याला सृष्टीने दिनचर म्हणून बनविले आहे. पहाट ही लोभस चैतन्यमय वाटावी ही सृष्टीची योजना आहे. लवकर निजे, लवकर उठे त्यासि आरोग्य,ज्ञान,संपत्ती भेटे ही उक्ति आरोग्याच्या निकषावर खरी ठरते. सृष्टीचं कालचक्र असतं त्याला बायोलॉजिकल टाइम स्केल म्हणजे जैविक कालचौकट म्हणता येईल. त्याची दखल न घेतल्यास दुष्परिणाम भोगावे लागतात. अवेळी पाऊस , तापमानातील बदल इत्यादी त्याची उदाहरणं. 
शरीरधर्म 
शरीर, स्वयंचलित रचना आहे. देहाच्या किती गोष्टी आपल्या तंत्रानुसार चालतात? या शरीरावर आपली किती सत्ता चालते.  प्राणायाम, ध्यान, व्यायाम,आहार,आणि विहार याचं सृष्टीधर्माप्रमाणे पालन केल्यास शरीर, मन, बुद्धी संतुलित होऊ शकते. 
छोट्यास्या बीजात मोठा वटवृक्ष सामावलेला असतो ही जुनुकातील जादू , रचना, बीज एक चमत्कार आहे.  त्यात तपशीलवार जीवनसंहिता लिहली असते  
आपण जगण्यात इतके व्यग्र  झालो आहोत की सृष्टीच्या संवादयंत्रणेचे भानच हरपून गेलो आहोत. सृष्टीची एक संवादयंत्रणा आहे. सृष्टिघटकात   व्यक्त अव्यक्त रूपात , ध्वनी , रंग , रूप ,वास स्पर्श अश्या अनेक माध्यमातून सतत संवाद सुरु असतो. फळ, फणस  पक्व झाल्यावर सुगंध दरवळतो. रंग बदलतो यातून संवाद साधला जातो. हे एक उदाहरण.    
सृष्टीधर्म पाळायचा म्हणजे नक्की काय करायला हवं ?
सृष्टीतील घटकांची काही वैशिष्ट्य आहेत. त्यात आंतरसंबंध आहेत. त्या व्यवस्थेचा अविनाशी उपयोग करून आपल्या भौतिक आणि भावनिक गरजा भागवू शकू अशी नीती आणि  आचारसंहिता म्हणजे सृष्टीधर्म. 
आनंद हाच सृष्टीचा स्थायीभाव आहे.  त्यामुळे आनंदानुभव हाच जीवनाचा हेतू ठरतो. आनंदसाधकाच्या अस्तित्वासाठी हवा, अन्न , पाणी,ऊर्जा आणि अधिवास या भौतिक गरजा त्याच बरोबर प्रेमसंबंध, जीवनरस , ज्ञान-सृजन-आत्मानुभव याची भावोत्कटता अनुभवण्यासाठी युक्त आणि मुक्त अशा सुरक्षित अवकाशाची गरज आहे  . सृष्टीतील सर्व घटकांचा एकात्मिक विचार हा सृष्टीचा निजिध्यास आहे.

 सृष्टीधर्म हा एक धर्म आहे . धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे आपण कसे वागले पाहिजे हे सांगणारी आचारसंहिता. आपण जीवन कशा प्रकारे घालविले असता स्वतःच्या व इतरांच्या योगक्षेमाला धक्का लागणार नाही अशी जीवनसंहिता. 
व्यक्तीच्या विकासाची सुरवात आंतरिक चैतन्यकेंद्रातूनच होईल. आत्मिक शक्तीची जाणीव या चैतन्यकेंद्राच्या तेजाकडे घेऊन जाईल. आत्मविश्वास दृढ होईल आणि व्यक्ती सर्वशक्तिमान बनेल. शरीर,मन बुद्धी,कौशल्य हे व्यक्तिमत्वाचे चतुष्कोन आहेत. जगाला सुधारायला निघण्याआधी स्वतःमधील न्यूने, वाईटपणा, गैरसवयी निपटून काढल्या पाहिजेत. निसर्गाने जो दिनक्रम बनविलेला आहे त्यानुसार लवकर झोपणे, लवकर उठणे, व्यायामाच्या, खाण्यापिण्याच्या वेळा हे शरीर आणि दिनक्रम यांची लय साधणारी असते. शरीरपोषणासाठी योग्य आहार, अन्ननिर्मिती. वस्तूची विचारपूर्वक खरेदी , नीट वापरण्याची जागेवर ठेवण्याची, टापटिपीची सवय ,नासाडी टाळण्याची गरज ,स्वच्छतेची , काटकसरीची ,निरीक्षणाची या सर्व सवयी व्यक्तिमत्वाची मजबूत बांधणी करतात. 
अश्या सवयी आत्मसात केलेल्या आत्मनिर्भर व्यक्तीला आपले  कुटुंब स्वावलंबी व्यवस्थेत आणता येईल.. 
स्वावलंबी व आत्मनिर्भर व्यक्ती , कुटुंब व समाजासाठी ते अनेक मार्ग सुचवतात. 
कुटुंबाची परसबाग , ज्या मंधून कुटुंबासाठी  ताजा व केमिकल मुक्त भाजीपाला पिकवता येईल. 
सौरऊर्जा हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर करता येईल. 
पावसाचे पाणी साठवणे व वापरणे.( Water Harvesting ).
काटकसर करा., To much and to Fast हे आजच्या जीवनव्यवस्थेचे सूत्र झालं आहे. यावर उपाय वस्तू आणि सोयी यांचा  कमी वापरा आणि वाचलेला वेळ जीवनानंद अनुभवण्यासाठी घालवा.  हवा,पाणी आणि अन्न या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजा. या सर्व गोष्टी झपाट्याने प्रदूषित होत आहेत. झाडे लावा, झाडे वाचवा , सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा , सायकल वापरा , पाणी अन्न याची नासाडी टाळा. 

अमंत्र अक्षरं नास्ती 
नास्ति मुलं अनौषध. 
अयोग्य पुरुष नास्ति 
योजकस्तत्र दुर्लभम. 
अक्षरांतून मंत्र शक्ती निर्माण होते , वनस्पतीची मुळातून औषधं बनवली जातात. प्रत्येक मनुष्यात गुण, योग्यता असते परंतु त्यांची पारख,नियोजन करणारे कमी आहेत. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत सृष्टी ची योजना आहे. ती जाणून घेऊन त्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करणे हाच सृष्टीधर्म.
 
श्रीयुत डॉ. अभय बंग यांनी या पुस्तकाला वैज्ञानिक धर्मग्रंथ म्हटलंय ,प्रत्येकाने वाचायला हवा!!