Tuesday 25 January 2022

नोइंग डुईंग आणि बिइंग !!

 मूळचे मुंबईचे,हार्वर्ड बिझनेस स्कुल, बोस्टन  चे डीन डॉ श्रीकांत दातार  यांची लोकमत दीपोत्सव २०२१ मध्ये देवेंद्र दर्डा / अपर्णा वेलणकर यांनी मुलाखत घेतली आहे. मुळातूनच वाचायला हवी.  खास करून तरुण मंडळींनी!  

मुलाखतीचं शीर्षक आहे. " नोइंग डुईंग आणि  बिइंग !!  मुलाखतीतील काही अंश. 




 दातार सरांनी त्याचं बालपण, आईवडील , आजोबांचे संस्कार याबरोबर शिक्षण, व्यवसाय क्षेत्रातील अनुभव सांगितले आहेत.   आयआयएम  अहमदाबाद विषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात. " तिथे जो कॅंपस मिळाला त्या कॅंपसचा मी आजन्म ऋणी आहे. कारण घडत्या वयात मला तिथे मिळालेले वातावरण! चैतन्याने सळसळणारे वर्ग, नवीन शिकण्याच्या - नव्या विचारांच्या वेडाने भारावलेले वातावरण, बुद्धीला सतत धार लावण्याची आव्हानं अंगावर फेकणारे शिक्षक आणि त्यांच्या अपेक्षांना आपण पुरं पडावं म्हणून झटणारे विद्यार्थी... 
अभ्यासातून निष्कर्षांना येणे. आपली मतं तयार करणं, भूमिका घेणे, इतरांसमोर प्रश्न-उपप्रश्नांचा सामना करून ती भूमिका पटवून देता येणं. कसं शिकावं यांची रीत-मर्म शिकणं ... हे मला त्या कॅंपसमध्ये भरभरून मिळालं"  ते पुढे म्हणतात. 
अह्मदाबादहून परतताच टाटा अडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये दाखल झालो. अतिशय तरुण वयात मला थेट रतन टाटांबरोबर काम करायला मिळालं. टाटा ग्रुप मध्ये काम करताना मॅनेजमेंटचा मानवी चेहरा अनुभवता आला. आजही जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती या यादीत  या माणसाचं नाव कधीही दिसत नाही, पण उद्योगक्षेत्रात असनूही समाजाचा आदराला अखंड पात्र ठरलेल्या उद्योगपतीमध्ये रतन टाटा सदैव अग्रस्थानी राहिलेले आहेत.  
त्याच वेळी स्टॅनफर्ड सारख्या ख्यातनाम विद्यापीठात शिष्यवृत्तीसह थेट प्रवेश मिळालेला पहिला भारतीय विद्यार्थी होतो. अमेरिकेतल्या विविध नामवंत विद्यापीठामध्ये काम करून १९९६ मध्ये ते हार्वर्ड मध्ये आले. २०२० मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या ११३ वर्ष्याच्या इतिहासातील अकरावा डीन म्हणून नियुक्ती झाली. यशाचं श्रेय ते आईवडिलांचे संस्कार , देवाची कृपा, नशिबाची साथ,लाभलेले उत्तम प्रोफेसर्स, अद्वितीय सहकारी आणि मनापासून केलेले कष्ट. 

त्यांनी आणि त्यांच्या दोन सहकारी मिळून एक संशोधक प्रकल्प केला. त्यावर एक पुस्तकही आहे. "रिथिंकींग एमबीए"  उद्योगांना राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर उद्योगाच्या भावी व्यवस्थापकानी नोईग आणि डुइंग यांच्या बरोबरिने बीइंग हे नवं कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. 
तुमच्यावर दिलेली जबाबदारी निभावण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत ज्ञान, रचना-व्यवस्था, फ़्रेमवर्क्स. सिध्दांत याची माहिती म्हणजे "नोइंग" कौशल्य. 
जे माहिती आहे त्या आधाराने अपेक्षित कृती करता येणे त्यासाठी क्षमता, कौशल्य असणं म्हणजे "डुईंग"!
हे बिइंग म्हणजे काय? मराठीत सत्व, स्वत्व! माणूस म्हणून संबंधित व्यक्तीची नीतिमूल्य-श्रद्धा-विचार काय आहेत ,वृत्ती कशी आहे, तिचा विश्वास कशावर आहे, बांधिलकी कशाशी आहे , तिच्या जगण्याचा हेतू काय, तिला आयुष्यात काय साध्य करायचं आहे, समकालीन जगाचं त्या व्यक्तीला किती भान आहे, त्याबद्दल तिची मतं काय  या सगळ्याचा समुच्चय म्हणजे "बिइंग" ! त्या व्यक्तीचं स्वत्व! नैतिक-अनैतिकांच्या धारणा, उचित-अनुचित या बाबतचा आग्रह, समवेतच्या माणसांशी वागण्याची-त्यांना वागवण्याची रीत, हेतू आणि दिशा, निःपक्षपाती बांधिलकी, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ नीतिकथांमधला एवेज नव्हे. नव्या व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी या सगळ्या गोष्टीची प्रत्येकाला गरज पडणार आहे. 
ते संशोधनाच्या आधारे सांगतात, चाकोरीबाहेरील विचार करण्याचं कौशल्य प्रयत्नांती अवगत करता येते. डिझाईन थिंकिंग म्हणजे विचार कसा करावा याची पूर्व सिद्ध अशी रचना. विचाराच्या विशिष्ट पाय-या ओलांडत पुढेपुढे गेलात,तर तुम्हांला अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नावर चाकोरीबाहेरचं उत्तर शोधात येऊ शकतं. 
हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या इमारतीत गांधीजींचं मोठं तैलचित्र लावलेलं आहे आणि त्याशेजारी गांधीजींनी सांगितलेल्या सात महापापची यादी लावलेली आहे. 
१ कर्म न करता संपत्ती 
२ विवेकाविना सुखोपभोग 
३ नैतिकतेविना व्यापार 
४ मानवतेविना विज्ञान 
५ शिलाविना ज्ञान 
६ त्यागाविना भक्ती 
७ तत्वविना राजकारण
नवीन तरुण वर्गाविषयी ते म्हणतात. 
नव्याने वर्क फोर्स मध्ये येणा-या तरुण मनुष्यबळाला केवळ नोकरी आणि पगार नको असेल. आपल्या जगण्याला काही अर्थ देऊ शकेल अशा आव्हानात्मक कामाचा शोध ही पिढी घेईल. आजचं जग जस आहे, तसं ते असता कामा नये असा त्यांचा आग्रह आहे. आणि हे कुणी दुसरं येऊन करणार नाही,ही जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार यांचंही भान त्यांना आहे. 
ही मुलं  बिइंगला महत्त्व देतील हे नक्की :. As per our talk forwarding.

Sunday 16 January 2022

एकटेपणाची शक्ती.

 

 

गौतमबुद्धाला विचारण्यात आलं  एकटं चालणं चांगलं की कुणाच्या सहवासात चालणं चांगलं ?

बुद्ध म्हणाले मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं चांगलं. मूर्खाशिवाय दुसरं कोण तुमच्याबरोबर चालणार नाही असंही त्यांना म्हणायचं असावं. 

आपल्याकडील काही प्रचलित गोष्टी सांगतो.  जेव्हा तुमाला  प्रवास छोटा आणि जलद करायचा असेल तर एकट्याने चाला. तुमचा प्रवास लांबचा असेल तेव्हा सोबतीने करा. परंतु तुमच्या सोबत कोण चालतं हे कधीही महत्वाचं! नेहमी सोबत असणे ही चांगली गोष्ट नाही. .खूपदा एकत्र राहणे त्रासदायक ठरू शकते. 

 या जगात आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. अगदी जुळे भावंडं सुद्धा. जर एकटं राहण्याचा अनुभव नसला तर एकत्रित राहणे त्रासदायक असू शकते. इतर प्राण्याची ओळख त्याच्या कृतीवरून ठरते. मनुष्य असा एक प्राणी आहे की तो कृतीशिवाय राहू  शकतो.आपलं फक्त अस्तित्व असू शकते.  आपली कृती विवेकपूर्ण आणि न्यायपूर्ण असू शकते. 

सामान्यतः जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा काही उद्दिष्ट , हेतू ठेवून कृती करतात. कधी कधी त्याला गर्दीचं स्वरूप येते.

एकटं असणे म्हणजे तुमचा स्व जपणे.  माणूस स्वतःला अनेक गोष्टीत विभागून घेतो स्वतःची ओळख हरवून घेतो आपल्या धर्मात तर  आत्मा, परमात्मा, अहंकार अश्या अनेक संकल्पना वापरतात. 

स्वयमेव असणे म्हणजे जे चांगलं असेल  ते  मी,माझं आहे. जर काही वाईट असलं तरी ते माझं आहे. दिवसाचे चोवीस तास तू उत्तम राहू शकतो का ?    
माणसा मध्ये चांगल्या आणि वाईटाची क्षमता पुरेपूर भरलेली असते. 
 माणूस  उत्क्रांतीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांनी ठरवलं तर तो एका ठिकाणी स्वस्थ बसू शकतो. कृतीविषयी निर्णय करू शकतो. जेव्हा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्याला  आम्ही म्हणतो. परंतु समूह, एक एकट्याचा बनला असतो. 

जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा त्याचं श्रेय घेण्यात सर्व पुढे असतात. वाईट गोष्टी घडतात तेव्हा कुणालातरी दोषी ठरवलं जातं. किंवा दैवाला दोष दिला जातो. 

जेव्हा ते चांगले असतात तेव्हा अभिमानाने चांगुलपणाचं श्रेय घेतात. जेव्हा काही चुकीचं , वाईट होते तेव्हा अपश्रेय इतरांना देतात. 

जर मला स्वतःला जाणीव झाली  की माझ्यात चांगुलपणाची क्षमता आहे. आणि दुस-या क्षणी  वाईट  वागण्याची तितकीच वृत्ती  आहे.तर हीच जाणीव हळूहळू वाईटपणा कमी करेल. 
 मी जसा चांगला आहे तसा वाईट ही मीच आहे. मीच यशस्वी आहे मीच अपयशी आहे. हे उमजून घ्यावं लागेल. 

आपलं व्यक्तिमत्व दुहेरी तर नाहीना. दुहेरी असणे हे आजारपण आहे.  माणूस एकांतात बसून स्वतःला बदलू शकतो, हा माणसाचा विशेषाधिकार आहे. तुम्ही जर ध्यास घेतला तर झटपट बदल घडवून आणू शकता. माणसाच्या उत्क्रांतीला मर्यादा नाही. एकत्र येण्या अगोदर जर एखाद्याने स्वतःसाठी वेळ काढून विचार करायला हवा जीवन कालच्या पेक्षा  कसं चांगलं असेल.   बहुतेक लोक त्यांच्या गरजांसाठी, गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात.  काही लोक आपली उद्दिष्ट  पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात आणि  काही लोक  खाण्यापिण्यासाठी  एकत्र येतात. एकटे राहू शकत नाहीत. हेही एकत्र न येण्याचं कारण असू शकेल.

ठराविक कालावधी नंतर प्रत्यकाने एक केलं पाहिजे.

२४ तासासाठी टीव्ही , फोन, वाचन या गोष्टीपासून मोकळं केलं पाहिजे आणि एकांतात खोलीत बसून. जाणीवपूर्वक मनाचा स्वभाव तपासाला पाहिजे.

मन कसं चंचल आहे हे  तुमच्या लक्षात येईल की

एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तेव्हा आपण माणूसपण हरवून बसतो.

 

जर तुमच्या स्वतः विषयी जाणिवा प्रगल्भ असतील तर तुमचं एकत्र येणे जीवन समृद्ध बनवेल. ह्याचाच अर्थ जाणीवपूर्वक एकत्र येणं. 


  (सदगुरु यांच्या व्हिडीओचे स्वैर भाषांतर , त्रुटी माझ्या हे सांगणे न लगे. )

Saturday 1 January 2022

नवं कोरं ताजेतवाने वर्ष

 

 

मला प्रश्न पडतात नवीन वर्ष म्हणजे नेमकं काय? त्याचा अर्थ काय?  जे पूर्णपणे नवीन कोरं ताजेतवाने आहे. या पूर्वी कधी घडले नाही.  

 

या सृष्टीत नवीन काही घडत नाही हे आपणास माहीत आहे,तरी आपण नवीन म्हणतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. खरोखर नवीन वर्ष आहे का ? की त्याच त्या जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो. त्याच जुन्या सवयी , त्याच जुन्या परंपरा , त्याच जुन्या रूढी गेली अनेक वर्ष पाळतो त्याच याही वर्षी पाळणार!

 पूर्वी कधी पाहिलं नाही, कधी केलं नाही असं तुम्ही करणार आहात का? हा महत्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही असं केलं,   येणा-या प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन कधीही पहिल्या नाहीत अश्या गोष्टी  करण्याचा प्रयत्न करणे  याचा अर्थ  मेंदूला पूर्वग्रहापासून , त्याच्या स्वभावापासून, श्रद्धापासून, मतमतांतरापासून मुक्त करणे  खुल्या मनाने सामोरे जाणे. 

 
आपलं जीवन उथळ आणि वरवरच आणि फारच कमी अर्थपूर्ण आहे. आपण हे सर्व बाजूला ठेवून खरोखर नवीन वर्ष सुरू करू शकतो का? तसं झालं तर जीवन  आमूलाग्र बदलेल. 
आपल्याला आवडो किंवा न आवडो, आपण जन्माला आलो आहोत, सुशिक्षित आहोत. तो अडथळा  बनू देऊ नका. 

आपण आपल्या जीवनाची संपूर्ण दिशा बदलू शकतो का? ते शक्य आहे का? की आपले विचार,  आपले जीवन अशा गोष्टींनी भरतो  ज्यामुळे संकुचित, निकृष्ट, निरर्थक जीवन जगतो  

 

सर्व गिरजाघर, मंदिरांमध्ये आणि उर्वरित जगात  - नवीन वर्ष्याची सुरवात , जुन्या पद्धतीने, परंपरेने, पूजाअर्चेने  सुरु आहे. आपण हे सर्व सोडून स्वच्छ को-या  पाटीवर नव्याने सुरुवात करू शकतो आणि त्यातून काय निर्माण होते ते  आपल्या अंतःकरणाने आणि मनाने पाहू शकतो का?

 

 

 

(1 जानेवारी 1985 मद्रास येथील  श्री  जे. कृष्णमूर्ती  पहिली प्रश्न-उत्तरा मधून. )