Saturday 18 December 2021

सृष्टीधर्म

 श्री कमलाकर साधले याचं सृष्टीधर्म हे एक सुंदर पुस्तक. शरीर, मन,  बुद्धी आणि परिसर यांची एक सूक्ष्म संरचना आहे.  त्यातून  सृष्टी  एक दिव्य जीवनसंगीत  प्रसवत असते.त्यातील शाश्वत आनंद अनुभवण्यासाठी "सृष्टीधर्म" प्रत्येकाने जाणून घेऊन पाळायला हवा. या पुस्तकाला डॉ अभय बंग यांची छोटीसी सुरेख प्रस्तावना आहे. ते म्हणतात   

"जो समाजाला धारण करतो तो धर्म ! म्हणजेच समाज टिकवण्याचा आधार असलेली सामाजिक कर्तव्य व नैतिक नियम म्हणजे धर्म. धर्म हा मूलतः नैतिक व कर्तव्यरूप आहे. सृष्टीधर्म म्हणजे सृष्टीला पवित्र मानून तिच्याप्रती आपली कर्तव्य उपासना भावनेने करणे. सृष्टीला पवित्र मानण्याचासाठी आधार प्रत्यक्ष ईशावास्योपनिषदात आहे " ईशावास्यम इदम सार्वम "सर्व सृष्टी ईश्वरमय आहे. मग सृष्टीच्या प्रति पवित्र भाव आलाच व तिच्या संरक्षणाचे कर्तव्यही आले हा आधुनिक धर्म सृष्टीधर्म !! म्हणूनच या पुस्तकाला वैज्ञानिक धर्मग्रंथ म्हणालो". 

सृष्टीच्या निर्मितीचे कारण सांगताना लेखक म्हणतात 
जडपदार्थ , मन , बुद्धी यातील कोणतेच सृष्टीच्या निर्मितीचे कारण नसून निर्भेळ आनंद हेच सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण होय, 
आत्म्याचा उत्कर्षाचा क्रम ही हेच दर्शवतो. 
आत्म्याच्या पंचकोषाचा क्रम असा आहे. अन्नमय कोष , प्राणमय कोष , विज्ञानमय कोष , मनोमय कोष  आणि आनंदमय कोष. एक एक कोष उलगडत शेवटी आनंदमय कोषापर्यंत पोहोचणे म्हणजे इहलोकीच्या जीवनाचे सार्थक होय. आनंदगर्भ हेच सृष्टीचे अस्सल रूप. 
आपल्या सृष्टितील, जीवनातील , पंचमहाभूताचे महत्व खुप मोठे आहे, त्याशिवाय जीवसृष्टीचं अस्तित्व अशक्य आहे. 
श्वास :   आपण सृष्टीतून सर्वप्रथम काय घेत असू तर श्वास आणि आयुष्य संपते तेव्हा शेवटचा श्वास घेतो. श्वासामार्गे प्राणवायू फुफ्फुसात प्रवेश करतो आणि रक्ताचा भाग भाग बनतो. शरीरातील सर्व घटकाला कार्य प्रवण करतो, आपल्या विचाराचा, सृजनात्मक कल्पनांना चालना देतो. अशी प्रचंड किमया श्वास सतत करत असतो. फुफ्फुसे शुद्ध नैसर्गिक हवेतच चांगलं काम करू शकतात. आज आपण हवा प्रदूषित करण्यात कोणतीच कसर सोडत नाही.   परिणामाला सामोरे जावं लागेल. 
 पाणी , आप :
आपोवा इदं सर्व विश्व भूतान्य आप:।
प्राणवा आप: पशव आपो अन्न आपो अमृत आप:।।
पाण्यामुळेच सर्व जीवसृष्टी भूतमात्रा आहे. पाणी , प्राण , अन्न , जीवन , अमृत आहे. 
शीतकाले उष्मच , उष्मकालेतु शीतलम !
जीवनात पाण्याचं खूप महत्व आहे.   जलस्रोतांची किती काळजी घेतो., नदी नाल्याची डबकी बनत चालली आहेत. जागे होणार आहोत का ? देवस्थानाला तीन गोष्टी महत्वाच्या बिंब म्हणजे मूर्ती , तीर्थ म्हणजे पाण्याचा शाश्वत स्रोत. आणि वृक्ष . आज आपल्या गंगा ,यमुना , गोदावरी नर्मदा , सिंधू कावेरी इत्यादी नद्यांच्या काय स्थिती आहे. 
अन्न :
अथो अन्नेनैव जीवन्ति !
अन्न भूतांना श्रेष्ठम !
येन ब्रह्मोपासते !!
अन्नाला  पुर्णब्रह्म म्हटलं आहे. 
अन्न न निद्यात । तदव्रतम ।
प्राणो वा अन्नम ।
शरीरमन्नादम ।
अन्न बहू कुर्वीत । तदव्रतम
अन्नाला नावं ठेवू नयेत. प्राण अन्नामुळे टिकून आहेत शरीर अन्नापासून बनलेले आहे. भरपूर अन्न पिकवण्याचे व्रत अंगिकारा. 
अन्न जशी शारीरिक गरज आहे तशीच भावनिकही.  खाणे हा एक सुखानुभव आहे. अन्न हेच औषध असं आयुर्वेद सांगते. पेरणी , कापणी व मळणी मोठे उत्सव असतात. 
काळाचं गणित, 
काळ आणि गती यांचा घनिष्ट संबंध आहे. काळ -काम-वेग याचा एक वेगळा आकृतिबंध जपण्याची गरज आहे. काळ म्हणजे बदल , सृष्टीतील शरीरातील बदल हे  सृष्टीच्या गतीनेच होणार. आपल्याला सृष्टीने दिनचर म्हणून बनविले आहे. पहाट ही लोभस चैतन्यमय वाटावी ही सृष्टीची योजना आहे. लवकर निजे, लवकर उठे त्यासि आरोग्य,ज्ञान,संपत्ती भेटे ही उक्ति आरोग्याच्या निकषावर खरी ठरते. सृष्टीचं कालचक्र असतं त्याला बायोलॉजिकल टाइम स्केल म्हणजे जैविक कालचौकट म्हणता येईल. त्याची दखल न घेतल्यास दुष्परिणाम भोगावे लागतात. अवेळी पाऊस , तापमानातील बदल इत्यादी त्याची उदाहरणं. 
शरीरधर्म 
शरीर, स्वयंचलित रचना आहे. देहाच्या किती गोष्टी आपल्या तंत्रानुसार चालतात? या शरीरावर आपली किती सत्ता चालते.  प्राणायाम, ध्यान, व्यायाम,आहार,आणि विहार याचं सृष्टीधर्माप्रमाणे पालन केल्यास शरीर, मन, बुद्धी संतुलित होऊ शकते. 
छोट्यास्या बीजात मोठा वटवृक्ष सामावलेला असतो ही जुनुकातील जादू , रचना, बीज एक चमत्कार आहे.  त्यात तपशीलवार जीवनसंहिता लिहली असते  
आपण जगण्यात इतके व्यग्र  झालो आहोत की सृष्टीच्या संवादयंत्रणेचे भानच हरपून गेलो आहोत. सृष्टीची एक संवादयंत्रणा आहे. सृष्टिघटकात   व्यक्त अव्यक्त रूपात , ध्वनी , रंग , रूप ,वास स्पर्श अश्या अनेक माध्यमातून सतत संवाद सुरु असतो. फळ, फणस  पक्व झाल्यावर सुगंध दरवळतो. रंग बदलतो यातून संवाद साधला जातो. हे एक उदाहरण.    
सृष्टीधर्म पाळायचा म्हणजे नक्की काय करायला हवं ?
सृष्टीतील घटकांची काही वैशिष्ट्य आहेत. त्यात आंतरसंबंध आहेत. त्या व्यवस्थेचा अविनाशी उपयोग करून आपल्या भौतिक आणि भावनिक गरजा भागवू शकू अशी नीती आणि  आचारसंहिता म्हणजे सृष्टीधर्म. 
आनंद हाच सृष्टीचा स्थायीभाव आहे.  त्यामुळे आनंदानुभव हाच जीवनाचा हेतू ठरतो. आनंदसाधकाच्या अस्तित्वासाठी हवा, अन्न , पाणी,ऊर्जा आणि अधिवास या भौतिक गरजा त्याच बरोबर प्रेमसंबंध, जीवनरस , ज्ञान-सृजन-आत्मानुभव याची भावोत्कटता अनुभवण्यासाठी युक्त आणि मुक्त अशा सुरक्षित अवकाशाची गरज आहे  . सृष्टीतील सर्व घटकांचा एकात्मिक विचार हा सृष्टीचा निजिध्यास आहे.

 सृष्टीधर्म हा एक धर्म आहे . धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे आपण कसे वागले पाहिजे हे सांगणारी आचारसंहिता. आपण जीवन कशा प्रकारे घालविले असता स्वतःच्या व इतरांच्या योगक्षेमाला धक्का लागणार नाही अशी जीवनसंहिता. 
व्यक्तीच्या विकासाची सुरवात आंतरिक चैतन्यकेंद्रातूनच होईल. आत्मिक शक्तीची जाणीव या चैतन्यकेंद्राच्या तेजाकडे घेऊन जाईल. आत्मविश्वास दृढ होईल आणि व्यक्ती सर्वशक्तिमान बनेल. शरीर,मन बुद्धी,कौशल्य हे व्यक्तिमत्वाचे चतुष्कोन आहेत. जगाला सुधारायला निघण्याआधी स्वतःमधील न्यूने, वाईटपणा, गैरसवयी निपटून काढल्या पाहिजेत. निसर्गाने जो दिनक्रम बनविलेला आहे त्यानुसार लवकर झोपणे, लवकर उठणे, व्यायामाच्या, खाण्यापिण्याच्या वेळा हे शरीर आणि दिनक्रम यांची लय साधणारी असते. शरीरपोषणासाठी योग्य आहार, अन्ननिर्मिती. वस्तूची विचारपूर्वक खरेदी , नीट वापरण्याची जागेवर ठेवण्याची, टापटिपीची सवय ,नासाडी टाळण्याची गरज ,स्वच्छतेची , काटकसरीची ,निरीक्षणाची या सर्व सवयी व्यक्तिमत्वाची मजबूत बांधणी करतात. 
अश्या सवयी आत्मसात केलेल्या आत्मनिर्भर व्यक्तीला आपले  कुटुंब स्वावलंबी व्यवस्थेत आणता येईल.. 
स्वावलंबी व आत्मनिर्भर व्यक्ती , कुटुंब व समाजासाठी ते अनेक मार्ग सुचवतात. 
कुटुंबाची परसबाग , ज्या मंधून कुटुंबासाठी  ताजा व केमिकल मुक्त भाजीपाला पिकवता येईल. 
सौरऊर्जा हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर करता येईल. 
पावसाचे पाणी साठवणे व वापरणे.( Water Harvesting ).
काटकसर करा., To much and to Fast हे आजच्या जीवनव्यवस्थेचे सूत्र झालं आहे. यावर उपाय वस्तू आणि सोयी यांचा  कमी वापरा आणि वाचलेला वेळ जीवनानंद अनुभवण्यासाठी घालवा.  हवा,पाणी आणि अन्न या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजा. या सर्व गोष्टी झपाट्याने प्रदूषित होत आहेत. झाडे लावा, झाडे वाचवा , सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा , सायकल वापरा , पाणी अन्न याची नासाडी टाळा. 

अमंत्र अक्षरं नास्ती 
नास्ति मुलं अनौषध. 
अयोग्य पुरुष नास्ति 
योजकस्तत्र दुर्लभम. 
अक्षरांतून मंत्र शक्ती निर्माण होते , वनस्पतीची मुळातून औषधं बनवली जातात. प्रत्येक मनुष्यात गुण, योग्यता असते परंतु त्यांची पारख,नियोजन करणारे कमी आहेत. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत सृष्टी ची योजना आहे. ती जाणून घेऊन त्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करणे हाच सृष्टीधर्म.
 
श्रीयुत डॉ. अभय बंग यांनी या पुस्तकाला वैज्ञानिक धर्मग्रंथ म्हटलंय ,प्रत्येकाने वाचायला हवा!!

Tuesday 26 October 2021

"कृतज्ञता"

 

कृतज्ञता

 मेलोडी बीटीची खालील वाक्य  प्रभावित करतात 

 

"कृतज्ञता जीवनात परिपूर्णता आणते. समाधानी बनवते, हव्यास सुटतो. नकाराचं होकारात रूपांतर करते. गोंधळ ,गडबडीत सुसूत्रता निर्माण करते. द्विधा अवस्था नाहीशी करून  लक्खपणा आणते,    साध्या जेवणाचं  रूपांतर   पंचपक्वांनाच्या  मेजवानी होऊन जाते. .घराला घरपण आणते. आणि आपपर भाव निघून आपलेपणा जोपासते. 

 

जीवनात कृतज्ञता नसेल तर स्वर्गाचा  नरक होऊन जाईल.   

जीवनात खूप विपुलता असेल परंतु   कृतज्ञता नसेल तर भरल्यापोटी ही तुम्हाला उपाशी आहोत असं वाटेल
कृतज्ञता नसेल तर

 कोणताही काम आनंद देणार नाही, कामाचं समाधान मिळणार नाही.  

प्रत्येक सहका-यात त्रुटी दिसतील, सर्व  मित्रांवर नाराजी असेल ,प्रत्येक घरातील चुका दिसतील.  प्रत्येक भेटवस्तूतील कमतरताच दिसेल. प्रत्येक कादंबरी मुद्रण  दोषांनी भरलेली दिसेल. कोणतीच गादी झोपण्यायोग्य वाटणार नाही. आणि कॉफीचा पेला नेहमीच फिक्का वाटेल. कृतज्ञतेशिवाय घेतलेला कोणताही निर्णय कायमचाच चुकीचा वाटेल. 


 कृतज्ञतेची जाणीव नसल्यास ,प्रत्येक गोष्टीविषयी तक्रारी असतील 

उन्हाळा गरम   खूप थंडी, संगीत म्हणजे धांगडधींगा सिनेमे म्हणजे वेळेचा अपव्यय व  किशोरवयीन मुलं नेहमीच उद्धट वाटतील.

 

कृतज्ञतेशिवाय वेगळ्या मताची ,वेगळ्या पंथाची माणसं तुम्हाला शत्रू वाटतील 

परिवारा विषयी कृतज्ञता नसेल तर   चुकीच्या कुटुंबात जन्माला आलो आहोत असं वाटत राहील. 

मिळणा-या , प्राप्त होणा-या गोष्टी विषयी कृतज्ञता नसेल तर. वेटर खूप वेळ घेतो , रस्त्यावरील प्रत्येक चालक मूर्ख आहे. गाडी चालवता येत नाही. गाडी बस मध्ये मिळालेली  खिडकी जवळीची जागा ही चुकीची वाटेल. 

 

 कृतज्ञते शिवाय जीवन यातनामय आहे. 

 

" कृतज्ञता "  ही जीवनात किमया घडवणारी किमयागार आहे. 

Thursday 14 October 2021

भावसंचित!

 दुर्गा भागवत म्हणजे मराठी वाङमय विश्वातील एक ठसठशीत नाममुद्रा चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या व्यासंगी लेखिका. त्यांच्या असंकलित आणि पूर्वप्रकाशित स्फुट साहित्याच्या तीन खंडातील एक    "भावसंचित".

भावसंचित मध्ये ललितलेख , व्यक्तिचित्रे , आत्मपर लेखनाचा समावेश आहे.  सीता रामाची कोण? आणि सीतेची ओळख असे दोन लेख यात आहेत. जे आपणास राम , सीता या विषयी नवीन दृष्टिकोन देतात. 
सीता म्हणते धर्मात सुखं  न सुखात सुखं !  अर्थ धर्मच सुख देतो, सुख सुख देत नाही.
लव कुश यांच्याशी युद्धानंतर श्री रामाला पुन्हा सीतेने अग्निदिव्य करावं असं वाटतं. सीता भूमिमातेला उदरात घेण्याची प्रार्थना करते आणि रामाकडे बघत , रामासमोर भूमीच्या उदरात प्रवेश करते.,  रामाची पत्नी रामाची राहिली नाही, भूमीची कन्या भूमीमय झाली. ती राममय झाली नाही म्हणून लेखिकेला प्रश्न पडतो सीता रामाची कोण होती ? सीतेचे  व्यक्तीमत्त्व जाणून घेण्यासाठी हे लेख वाचायला हवेत. 

दुर्गाबाईंचा सडेतोड, निर्भीडपणा आपण आणीबाणीच्या वेळी पहिला आहे तत्त्वासाठी परखडपणे मतं मांडणे हा त्याच्या स्वभाव होता हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकातील ऑल इंडिया रेडिओ उर्फ आकाशवाणी हे स्फुट,पत्र वाचायलाच हवं. पुस्तकाच्या शेवटी गांधीजींची ओळख हा लेख आहे तो दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर लख्ख प्रकाश टाकतो. एका कार्यक्रमात , कार्यकर्ता त्यांना विचारतो महात्माजींची ओळख करून घ्यायची का ? त्यांचं उत्तर चक्क नाही होतं. विचार करा !!
त्या पुढे म्हणतात गांधीजींची ओळख मनाला आहेच केव्हांही संवाद साधता येतो नि उत्तर ठाम व अचूक येते. त्यांचं मार्गदर्शन कधी थांबत नाही. 
या पुस्तकातील पत्रांचा निसटत्या आठवणी त्यातील आनंदीबाई व अहिल्याबाई होळकर या दोन परस्परविरोधी स्वभावाच्या स्रियांचा पत्रव्यवहार आणि घटना अनन्यसाधारण आहे.इथे आनंदीबाईंनी प्रसंगारूप प्रांजळ लिनपणा दाखवला आहे. अहिल्याबाईने कृतज्ञता बुद्धीने सहज आणि शानदारपणे दरबारात मालकिणीचा समादर केला. 
 मरणाविषयी दुर्गाबाई काय म्हणतात बघा. 
मी निसर्गशरण आहे, जीवनशरण आहे; तेव्हा मरणशरणता स्वीकारायला मला कसली आली आहे खंत? मरण तर सुख-दुःख पार करणारे नि नव्या पुनर्जीवनाला आमंत्रण देणारेच  आहे ना? 

Monday 4 October 2021

तरुण पिढीचे भवितव्य’!

 

तरुण पिढीचे भवितव्य’!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या   आमसभेत  दक्षिण कोरियाच्या ‘बीटीएस’ बँडच भाषण झालं आणि गीत सादर केले . त्यांच्या भाषणाचा विषय होता- ‘तरुण पिढीचे भवितव्य’! या बँडने केवळ भाषणच केले नाही, तर तिथे ते ‘नाचायला परवानगी हाय..’ हे गाणे गात मोठय़ा जोशात नाचलेदेखील! या  विषयी श्री माधव गाडगीळ यांचा लोकरंग मधील लेख. त्यातील हे गीत  

 

 

 

‘नाचायला परवानगी हाय’

 

भर ज्वानीच्या वादळामंदी

आमच्या दिलाचं वाजतंय ढोलकं

वाढतोय वाढतोय आवाज वाढतोय

तशी रातीची थंडी पण वाढतेय

तरी लयीच्या मागं, सुराच्या मागं,

धावतोय पळतोय जोशात

आता सपान भरतंय डोळ्यात, डोळ्यात

मग तुतारी फुंकतो आणिक सांगतो

आम्हाला नाचायचंय नाचायचंय

अन् नाचतो नाचतो बेभान बेभान

बनतो सोन्याचं अन् रंगतो नाचात बेदरकार बेदरकार

आम्हा ना काळजी कशाची

धडपडतो तरी उभे ठाकतो भक्कम पायावरी

आम्हा ना हताश कोणी करी

काही तरी येतं वाटेत आडवं

पण आम्ही नाही त्याला जुमानत

आम्ही नाही कोणाला इचारत

आमची लय कधी थांबणार नाय,

आम्ही कधी मागे फिरणार नाय

कुणाला काय दाखवायचं नाय आम्हाला आमची नशा पुरे

आता कशाला थांबायचं, आता तर आली आहे वेळ

आम्ही पुढे पुढे चालणार आणि बघत राहणार

पूर्वेला तांबडं फुटताना

मग चालणार चालणार, बोलत राहणार

आम्ही सोन्याचे बनलोय ना

कुणाला काय पण दाखवायचं नाय आम्हाला

आमची नशा पुरे

मग म्हनतो म्हनतो

आम्हाला नाचायचंय नाचायचंय

बनतो सोन्याचं अन् गातो नाचतो स्वच्छंदी स्वच्छंदी’

 

 

न हरलेल्या आणि न हरवलेल्या तरुणांना जाणून घेण्यासाठी मुळातूनच लेख वाचा लोकरंग ३/१०/२०२१ 

Thursday 17 June 2021

सद्धभावनांचं सायन्स

 

यावर्षीच्या अक्षर दिवाळी अंकात डॉ आनंद नाडकर्णी याचा सद्धभावनांचं सायन्स हा मेंदूची कार्यपध्द्ती समजावून सांगणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. आदिम,प्रगत , उन्नत  भावना म्हणजे काय? आणि भावना कशी विकसित होते हे सोप्प्या पद्धतीने सांगितले आहे. 

वाचे बरवे कवित्त्व 

कवित्त्वि बरवे रसिकत्त्व !

रसिकतत्वीही परतत्व  

स्पर्श जैसा !!

 

भाषे पेक्षा  सौंदर्य उलगडते ती  कविता , कवितेला ग्रहण करणारी रसिकता, रसिकतेला तत्त्वज्ञानाचा स्पर्श ही अनुभवाची चढती कमान 

मानवामध्ये आदिम आणि प्रगत या दोन भावनागटांची निर्मिती झाली. माणूस शारीरिक , सामाजिक दृष्टीने एका जागी वसू लागला. वेदउपनिषदाच्या काळात जगण्याची व्यवस्था निर्माण केली. बाह्यजगाचे आणि अंतःकरणाचा अभ्यास सुरु केला. मानवी अस्तित्वाचा अर्थ काय इथपासून शेती उत्पादन कसे वाढवायचे यावर समाज चिंतन करू लागला. याचाच अर्थ आदिम भावना वर प्रगत भावनांचा प्रभाव वाढू लागला. पण आदिम भावनांची अभिव्यक्तीही विविध प्रकारे होऊ लागली.  गटांमधील सत्तास्पर्धा साम्राज्यामधील संघर्षापर्यंत आली. शहाण्यामाणसाने  दुःखे , आनंद , वियोग या भावनांचा अभ्यास सुरु केला. या पार्श्वभूमीवर उन्नत भावना म्हणजे आत्मशोध आणि व्यक्तिविकासाकडे नेणा-या भावना तयार होऊ लागल्या. 

मुळात आदिम , प्रगत , उन्नत  भावना तयार कश्या होतात? मज्जापेशी ही शरीरातील अत्यंत कार्यक्षम पेशी. ज्ञानेंद्रिय ,कर्मेंद्रिय यांच्यापासून मज्जापेशी माहिती मिळवते. तिचे पृथ:करण करते जोडणी पुनर्जोडणी करते असे वारंवार होते तेव्हा पृथ:करणाची एक वहिवाट होते. (Neuronal Pathways) बाह्य आणि अंतर्गत अनुभवांना सामोरे जाणारी ही  यंत्रणा सतत विकासशील असते. ही यंत्रणा पुढे मागे तिची व्याप्ती कमी जास्त होत असते तिला मज्जालवचिकता म्हणतात. आदिम भावना आणि प्रगत भावनांचा वहिवाटा  तयार झाल्या. उन्नत भावनांचे प्रोग्रामिंग अलीकडचे  या भावनांचा जाणीवयुक्त सराव जास्त करावा लागतो. राग येणे ही आदिम भावना आपोआप होते. रागाचे नियंत्रण करायला प्रयत्न  करावे लागतात .   

आदिम ... प्रगत आणि उन्नत  भावनांचा प्रवास कसा होतो. अंधारात पडलेल्या लांब वस्तू मुळे आदिम भावना भय निर्माण करेल. प्रगत भावना त्या वस्तूवर प्रकाशझोत टाकून साप आहे की दोरखंड आहे याची खात्री करून घेईल. भयाचं मूल्यमापन , पृथ;करण करून त्यावर पर्याय काढण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होते  निर्भयता. ही प्रगत विचारी भावना. या साखळीतील उन्नत भावनेला म्हणतात अभय. म्हणजे भय निर्माण होण्याचं कारणच न राहणे..

निओकॉर्टिकल इमोशन्स (Neocortical Emotions ) संकुचित पणा पार करण्याबरोबर संतुलन आणणा-या भावना आहेत. विशाल आणि व्यापक असा अनुभव मानवाच्या दृष्टिकोनाला वेगळी खोली (depth) देणारा असतो. मानवाला जेव्हा अभय किंवा  आस्था अश्या माणसामाणसातील भेद मिटवणा-या भावना अनुभवाला येतात तेव्हा त्याचे फक्त माणसाबोरोबरचे नव्हे तर संपूर्ण निसर्गाबरोबरचे नातेसुध्दा अधिक बोलके होते. 

आदिम भावना न्यायाधीश होऊन निकाल देतात. इतरांना किंवा स्वतःला शिक्षा करतात. प्रगत भावना सर्व पूर्वग्रहांना ओळखतात,स्वीकारतात आणि जगण्याच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये त्यांची कमीतकमी बाधा येईल असे पाहतात. तर उन्नत भावना माणसाला सर्व  पूर्वग्रहांच्या पल्याड नेणा-या असतात. 

विज्ञानातील प्रगती मुळे मेंदूच्या  कार्याची माहिती  पूर्ण दिसू लागली आहे. शब्द आणि व्यक्तिगत अनुभवाच्या भावना रेखाटता येऊ लागल्या map काढता येऊ लागला.   consciousness is immaterial spirit not subject to physical law  

माणसांच्या मनामध्ये आस्था , सहानुकंपा , परभावप्रवेश आशा  भावना निर्माण होतात तेव्हा मेंदूत घडणा-या घडामोडी. 

1) Medical Perfrontal cortex : दुसऱ्याच्या दृष्टिकोनाबरोबर स्वतःचा दृष्टिकोन ताडून पाहणे 

2) Orbitofrontal Cortex : समोरच्या व्यक्तीचे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेणे त्याचप्रमाणे शारीरिक वेदना समजून घेणे (अनुकंपा )

 3) Inferior Front Gyrus: समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेणे.  

4) frontal Operculum : दुसऱ्याच्या वर्तनामागील हेतू समजून घेणे. 

5) Anterior insula : स्वतःच्या भावना - विचाराची जाण

6) Amygdala  :भावना आणि आठवणींची सांगड. 

7) parietal Areas समोरच्या व्यक्तीची भावना आणि कृतींमागील अर्थ समजून घेणे. समजलेला अर्थ स्वतःच्या शब्दात त्या व्यक्तीला सांगणे. याला म्हणतात पॅराफ्रेंजिग.  

8) Temporal  areas समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील भाव टिपणे 

9)Temporal Parietal areas  समोरच्या व्यक्तीच्या विचाराच्या प्रतिमा तयार करणे. 

दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला ठेवून दुसऱ्याच्या भावना ओळखून स्वीकारून पण त्यात वाहत न जाता वागणे म्हणजे आस्था. 

उन्नत भावनांचे संस्कार झाले तर मेंदू बदलतो हे सिद्ध होऊ लागले आहे. पण मेंदुलवचिकता हे दुधारी हत्यार आहे. अतिशय प्रतिगामी , आणि विघटनवादी विचारांचे संस्कार सुद्दा मज्जापेशी करून घेऊ शकते. 

मानवी मनाला स्वातंत्र्याची जशी आस आहे तशीच कुणाच्या तरी आधाराने , छत्रछायेत राहावी अशी धारणा आहे. 

मानवी मनाच्या  ह्याच गुणधर्माचा उपयोग करून  दहशतवादाचे संस्कार करताना खालील भावनां आणि विचारधारा रुजवण्याचे अभ्यासक्रम  दहशतवादी संघटने कडून आखले  जातात. तरुणाच्या मनावर खालील विचार बिंबवले जातात. 

१) विनाशाचे समर्थन : जो नाश घडणार   आहे तो अटळ नव्हे तर आवश्यक आहे. त्यासाठी स्वर्गप्राप्ती , जिहाद अशी स्वप्न दाखवली जातात. 

२) मारूनच मारू : समोरचे आपल्याला मारणारच आहेत तेव्हा मारून मरणे हाच पुरुषार्थ. 

३) शोषणाविरुद्ध लढा : आपण शोषित आहोत ही भावना निर्माण करणे

४) ध्रुवीकरण  : इतरांविषयीच्या द्वेष भावनेने एकत्रीकरण

५) कृतिशीलता हिंसक कृती शिवाय ध्येय साध्य होणार नाही अशी शिकवण 

 

 

कोणत्या भावनांना उन्नत भावना म्हणता येईल, बघा! 

१) आस्था

२) करुणा 

३) तन्मयता

४) समर्पण 

५) नम्रता 

६) कृतज्ञता 

७) निरपेक्ष त्याग 

८) निर्मळता 

९) क्षमा 

१०) निग्रह संयम

११) सहिष्णुता 

१२) कैवल्य

 

उन्नत भावनेचे सरळसाधे नाव आहे माणुसकी.

Sunday 16 May 2021

चल , घे भरारी !

श्री सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन    'अज्ञेय'   हिंदीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. त्यांना   १९७८चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. त्यांची एक प्रसिद्ध कविता.
 
उड़ चल हारिल  
 
उड़ चल हारिल लिये हाथ में
यही अकेला ओछा तिनका
 उषा जाग उठी प्राची में
 कैसी बाट भरोसा किन का!
 
शक्ति रहे तेरे हाथों में
 छूट न जाय यह चाह सृजन की
 शक्ति रहे तेरे हाथों में
 रुक न जाय यह गति जीवन की!
 
ऊपर ऊपर ऊपर ऊपर
 बढ़ा चीर चल दिग्मण्डल
 अनथक पंखों की चोटों से
 नभ में एक मचा दे हलचल!
 
तिनका तेरे हाथों में है
अमर एक रचना का साधन
तिनका तेरे पंजे में है
 विधना के प्राणों का स्पंदन!
 
काँप न यद्यपि दसों दिशा में
 तुझे शून्य नभ घेर रहा है
 रुक न यद्यपि उपहास जगत का
 तुझको पथ से हेर रहा है!
 
तू मिट्टी था किन्तु आज
 मिट्टी को तूने बाँध लिया है
 तू था सृष्टि किन्तु सृष्टा का
 गुर तूने पहचान लिया है!
 
मिट्टी निश्चय है यथार्थ पर
क्या जीवन केवल मिट्टी है?
तू मिट्टी पर मिट्टी से
उठने की इच्छा किसने दी है?
 
आज उसी ऊर्ध्वंग ज्वाल का
 तू है दुर्निवार हरकारा
 दृढ़ ध्वज दण्ड बना यह तिनका
 सूने पथ का एक सहारा!
 
मिट्टी से जो छीन लिया है
वह तज देना धर्म नहीं है
जीवन साधन की अवहेला
कर्मवीर का कर्म नहीं है!
 
तिनका पथ की धूल स्वयं तू
 है अनंत की पावन धूली
 किन्तु आज तूने नभ पथ में
 क्षण में बद्ध अमरता छू ली!
 
ऊषा जाग उठी प्राची में
 आवाहन यह नूतन दिन का
 उड़ चल हारिल लिये हाथ में
 एक अकेला पावन तिनका!
 
 दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याचा  संदेश  कवी  हारील पक्षाच्या माध्यमातून देतात. 
 
पूर्वेला पहाट उगवली आहे. तू कोणाची वाट बघू नको ,कुणाच्या भरवश्यावर थांबू नको.  तू उडान भर.  
तुझ्या हातात शक्ती आहे. नवं निर्माणाची संधी सोडू नको ,  जीवनाची गती थांबू देऊ नको. 
गगनमंडळ भेदत वर वर जा. अथक पंखाने आभाळ ढवळून काढ. 
अमर सृष्टीचं साधन तुझ्या बाहुत आहेत , जीवन स्पंदन तुझ्या मनगटात  आहेत. 
दशदिशांनी तुला घेरलं तरी घाबरू नको , जगाच्या उपहासामुळे आपल्या मार्गापासून ढळू नको.
तू माती होतास परंतु मातीला आकार दिला आहेस. तू सृष्टी चा एका भाग होतास परंतु तुझी ओळख निर्माण केली आहेस.  
माती वास्तविक स्थिर निश्चल आहे. जीवन काय फक्त माती, निश्चल, स्थिर आहे का ? माती मधून नवनिर्मिंती करण्याची इच्छा कोणी दिली?
 उज्वल प्रवासाचा तू अज्ञात धावपटू आहेस.  तुझी इच्छाशक्ती ध्वजदंड बनून एकाकी मार्गाचा आधार बनली आहे. 
माती पासून जे घेतलं आहे त्याचा त्याग करणे धर्माला धरून होणार नाही. जीवन साधनेची अवहेलना   कर्मवीर करत नसतो. . 
स्वतः धुळीचा कण आहेस परंतु भूमी पवित्र आणि अनंतकाळ  आहे. आज तू आकाश गाठलं आहेस,  क्षणात अमरत्वाला स्पर्श केला आहेस. 

पूर्वेला उष:काल  झाला आहे. नवीन दिवसाची सुरवात आहे. पवित्र  एकमेव ध्येय,इच्छा  घेऊन उडान भर. हारिल !   

प्रबोधनमाला 

  संजीवनी व्याख्यानमाला २०२१  
वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना संजीवनीच्या व्यासपीठावर आणायचं त्याचे विचार , अनुभव आपल्या लोकांना जाणून घ्यायची संधी उपलब्ध करायची आणि जीवन अधिक समृद्ध करण्याचं काम व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १९ वर्ष सुरु आहे.  "संजीवनी व्याख्यानमाला २०२१"  ची सुरवात  आधुनिक तंत्रज्ञान युग  आणि ते सर्व जीवन  व्यापून दशांगुळं राहणार याची जाणीव  करून देणारं. त्याला  सामोरे जाण्यासाठी लागणारी मानसिकता कशी असावी हे सांगणारं. .औद्योगिक  क्रांती ४ ची आव्हानं  "दूरगामी आणि मुलगामी"  डॉ. भूषण केळकर .. इंडस्ट्री 4.0 हि संकल्पना नेमकी काय आहे. याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे? याचा वेगवेगळ्या वयोगटावर कसा परिणाम होणार आहे?  याबद्दल विस्तृत विवेचन डॉ.भूषण केळकर यांनी केलं औद्योगिक क्रांती ४ ची आव्हानं दूरगामी तसेच मूलगामी आहेत. मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे यांनी व्यापून जाणार आहेत. सुरवातीला त्यांनी औद्योगिक  क्रांतीचा इतिहास सांगितला.  वाफेचे इंजिन, यंत्रमाग  पासून इंडस्ट्री १ ची सुरवात झाली. पुढे विद्युतऊर्जा  असेम्ब्लीलाईनच्या रुपाने इंडस्ट्री २ मध्ये रुपांतर झाले. सर्व ऑटोमेशन संगणकीकरणाने इंडस्ट्री ३ विकसित झाली आणि आता  २०११ पासून इंटरनेट, नेटवर्क, सायबरच्या माध्यमाने इंडस्ट्री ४  सुरु झाली. पहिले दोन टप्पे पार करायला शंभर वर्ष लागली. इंडस्ट्री ३ ते इंडस्ट्री ४ मध्ये रुपांतर होण्यास  ४० वर्षे लागली.  प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे. इंडस्ट्री ४ ला दहावर्षे होत असताना इंडस्ट्री ५ आकार घेत आहे.  इंडस्ट्री ४ मध्ये  रोबोट्स , क्लाऊड कॉम्पुटिंग, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्स, थ्रीडी प्रिंटिंग , कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादि एकूण ९ घटक आहेत. प्रत्येक तंत्रज्ञानात सर्वच्या सर्व घटक असतील असं नाही. यातील काही घटकांचा उपयोग असेल.  इंडस्ट्री ४ मुळे काही नोकऱ्या जाणार आहेत हे खरं असलं  तरी नवीन नोक-याही  निर्माण होणार आहेत. ज्यांचं  कौशल्य आज उपलब्ध नाही. अशी कौशल्य विकसित करायला हवीत.  भारतासारख्या तरुण देशाने या गोष्टी कडे लक्ष देऊन अशी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत. इंडस्ट्री ४ साठी खालील  कौशल्ये आपण शिकलो नाही तर नोकरी, व्यवसाय, आणि व्यक्तीगत जीवनात कुचकामी ठरु. जटिल समस्या सोडवण्याचं कौशल्य (compex problem solving) लोक,  टीम व्यवस्थापन (People Management) , सर्जनशीलता, (creativity)     संवाद कुशलता, (communicaiton) इतरांशी समन्वय,  (coordinating with others) भावनिक बुद्धिमत्ता, (Emotional intelligence)  सेवाभिमुखता (service orientation) इत्यादी.   वेगाने होणा-या बदलासाठी आपण तयार असायला पाहिजे. आपण एकसुरी, पुन्हा पुन्हा तेच काम इत्यादी क्षेत्रातून बाहेर पडायला हवे. डेटा अनालिसिस, वर्गीकरण अशा क्षेत्राकडे वळले पाहिजे. एकपेक्षा अधिक शाखेत प्राविण्य किंवा पदवी, डेटा विश्लेषण कौशल्य, सर्जनशीलता, संवादकौश्यल्य, सर्वागीण विकास , रचनात्मक विचार, कुठल्याही प्रकारचं प्रोग्रामिंग, फ्रेंच, जर्मन सारखी दुसरी भाषा, काम करता करता शिकणं, जनरल नॉलेज वाढवणे, सामाजिक भान जपणे, आणि स्वतःला नीट ओळखणे इत्यादी गोष्टी शिकायला हव्यात.  त्यासाठी कोर्सेस करायला हवेत.   प्रश्नोत्तरात श्रोत्यांनी नेमके प्रश्न विचारले.  सरांनी उदाहरणासहित समर्पक उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले. अथर्व नाईक यांच्या  क्वांटम कॉम्पुटिंग व न्यूरालिंक या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल प्रश्नाचे  डॉ. केळकर यांनी कौतुक केलं.  सरांनी तरुणांना दोन गोष्टी आवर्जून करायचा संदेश दिला.  १) करिअर क्लॉक  हे फ्री अँप आहे, ते डाउनलोड करा. याचा करिअर बिल्डिंग साठी उपयोग होईल. ही करिअर प्रोसेशनिंग सिस्टिम (CPS ) आहे. तुमच्याविषयी माहिती  सांगा. तुम्हाला नोकरीत का घ्यावं? तुमचं प्राविण्य कशात आहे, तुमचे वीकनेस काय आहेत. इत्यादी प्रश्नासाठी तयारी करण्यास मदत करेल. resume बनवण्यासाठी मदतगार ठरेल.  सर्वांगीण वाढ आणि अर्थपूर्ण करिअर घडवण्यासाठी मदत करेल. इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हेही दाखवेल. स्व: विषयी जागृती निर्माण करणा-या  अँपद्वारे . आपलं करिअर विकसित करा.  २) करिअर विकासासाठी व करिअर प्लॅनिंगसाठी नुफ्लेक्स टॅलेंट सोलुशनचे @neuflex.talent हे इंस्टाग्रामचे  a/c follow करण्याचा सल्ला दिला.  
दुसरं  व्याख्यान  दुर्दम्य ध्येयवाद, ईश्वरी निष्ठेने  आकार घेणारं  , सीमा नसलेले जग , आनंदवन भुवन.  ह्या वर विश्वास निर्माण करणारं. होतं.  १९९८ ते २०२१ काश्मीर सेवा यज्ञ !!! श्री .अधिक कदम . गेली २४ वर्ष मी कशिमर मध्ये आहे. हा समाज मुख्य प्रवाहात कसा येईल. कारगिल युद्धाच्या वेळी तिकडे होतो. गावच्या गावं विस्थापित झाली होती.त्याच्या पुनर्वसनात मदत कार्य केलं.   मुलं आतंकवादाकडे का वळली युनिसेफचा सर्वे करताना लक्षात आलं की कुपवाडा जिल्ह्यातच   हजारो मुलं अनाथ आहेत. अश्या मुलांना देश विरोधक तत्व आपल्या जाळ्यात ओढून घेतात. देशा विरोधात त्यांना तयार करतात  हेच चक्र गेली अनेक वर्ष सुरु आहे.  सर्व अंगानी समस्या होत्या. पाच सहा वर्ष अभ्यास केला. राजकीय पक्ष , सरकार काही करू शकतील असं वाटत नव्हतं. आपण मुलांसाठी काम करू या विशेषतः मुली साठी अशी एक अंतःप्रेरणा झाली त्याला अनेक महानुभावांचा आशीर्वाद मिळाला. मार्गदर्शन मिळालं त्यातून आपण मुली साठी काम करायचं  ठरवलं. काश्मीर मध्ये नकारात्मक शक्तीशी तोंड देण्यांत खूप ऊर्जा गेली. त्यामुळे इतक्या वर्षांत फक्त ७००-८०० मुलींना  स्वतःच्या पायावर उभं करून समाजात पाठवू शकलो. ११३ हुन जास्त मुलींची लग्न लावून दिली. यातील ७ मुलींना नंतर कळले की त्यांचा दीर अतिरेकी होते बॉर्डरलेस वर्ल्ड फॉउंडेशनच्या संस्कार मुळे या मुलींनी आपल्या सासरच्या मंडळींशी बोलून दिरांना  समजावून  समाजात परत आणलं. शरण यायला लावलं. हेच मोठं पारितोषक.  शंभर टक्के मुस्लिम समाजात राहू कसा शकलो , कारण ही माझी साधना आहे.  फौजेच्या पॅलटगन  मा-या मध्ये अनेक जण जखमी झाले  त्यातील  १३५० मुलांवर डोळ्याची शस्रक्रिया केली.  समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे. बॉर्डरलेस वर्ल्ड फॉउंडेशनच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या मुली , काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशात उच्चं शिक्षण घेणा-या मुली आपल्या कुटूंबात , समाजात जातील आणि संपूर्ण कुटुंबाला समाजाला मुख्य प्रवाहात घेऊन येतील.  
आणि तिसरं व्याख्यान   आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक ध्येयवाद याचा मिलाप करून समृद्धी कशी निर्माण करावी याचं मार्गदर्शन. केलं. डॉ अनिल काकोडकर विषय सिलेज" ग्रामीण समृद्धीसाठी ज्ञान सेतू. सिटी आणि व्हिलेज याना जोडून झालेले सिलेज..  संतुलित विकास साध्य करायचा असेल तर  ग्रामीण - शहर ही दरी मिटवणारा सेतू बांधायला हवा यातून ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो हा सिलेज या संकल्पनेमागील हेतू आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सक्षम करून त्यांना गावातच उपजिविकेची साधनं  उपलब्ध होतील अशी  व्यवस्था निर्माण करायला हवी. तरच शहराकडे जाणारे लोंढे थांबतील. नवीन ज्ञानयुगात शहरी भागात जसं औद्योगिक उत्पादन होते तसं ग्रामीण भागात होऊ शकतं. तंत्रज्ञान सुधारण्याची क्षमता सतत निर्माण करणे गरजेचं आहे‌. ग्रामीण भागात हायस्कूल कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करायला हव्यात. ग्रामीण भागातील संधीची ओळख संशोधन करण्याची जिद्द निर्माण करु शकलो तर तंत्रज्ञान सतत सुधारत राहील. उत्पादनावर मूल्यवृद्धी करून ज्ञानाचे जे मार्ग शहरात उपलब्ध आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध केले पाहिजेत.  शहरावरचा अतिरिक्त ताण कमी होईल. या सर्व संकल्पना प्रत्यक्षात कशा राबवता येतील हे आपल्यासमोर आव्हान आहे. ज्ञानसंस्थातून पुस्तकी ज्ञानाबरोबर ग्रामीण भागातील संधीचं सोनं करता येतील असे पाठ्यक्रम सुरु असलेल्या कामाच्या उदाहरणासह मांडली.

                                   


                                         व्याख्यानमाला २०२१ -   निवडक   प्रतिसाद 

 

तिन्ही व्याख्याने सामाजिक जाणिवेची, आधुनिक जगाची ओळख करून देणारी ,भविष्याचा वेध घेणारी,निस्वार्थ  बुध्दीने समाजासाठी व  देशासाठी कार्य करण्याची प्रोत्साहन देणारी ,विशेषतः तरुणांना मार्गदर्शन करणारी होती.घरबसल्या व्याख्यान ऐकण्याची संधी दिल्याबद्दल संजीवनी परिवाराचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.पुढील वाटचाली साठी संजीवनी परिवाराला शुभेच्छा.धन्यवाद!

श्री विश्वनाथ नाईक सोमाडी 

अप्रतिम व्याख्याने व तेवढ्याच ताकदीचे व्याख्याते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचे अनुभवव कार्य पाहता आपण किती छोटे आहोत याचा प्रत्यय येतो.

श्री सुभाष भट्टे , सत्पाळा.  

व्याख्यान हा आपला एक सुंदर उपक्रम आहे .दरवर्षी विषयांची विविधता व नाविन्यता ही याही वर्षी होती.केळकर सरांचे आधुनिक तंत्रज्ञान ,अधिक कदम यांचे अतुलनीय कार्य (खरं तर मराठी पाऊल पडते पुढे याचा सार्थ अभिमान वाटला).आणि अनिल काकोडकर यांचा ग्रामीण व शहरी सेतू सारेच विषय छान होते वक्ते ही छान बोलले आणि श्रोत्यांची उपस्थिती ही चांगली वाटली.

संजीवनी परिवाराचे आभार आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यरत राहण्याच्या तुमच्या मेहनतीला धन्यवाद!

सौ अनिता नाईक , वाघोली 

तीनही व्याख्याने उत्तम झाली. संजीवनी परिवाराने नेहमीप्रमाणेच विषय अनुरूप असे निवडले  होते . सद्यस्थिती वर्तमानआणि भविष्य यांची छान सांगड घातली गेली. तज्ञ व्याख्याते साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ,बरोबरच कृतीअसे होते. आधी केले आणि मग सांगितले, आदरणीय श्री. अधिक कदम सर तर समर्पित जीवनप्रवास करीत आहेत.त्यांचे अनुभव ऐकतच राहावे असे वाटत होते. एका वेगळ्या विश्वात आपण विहार करत होतो. इतक्या तरुण वयात त्यांनी ध्येयासक्तीचे परमोच्च  शिखर गाठलेले आहे . त्यांच्या कार्याला तोड नाही 👌त्रिवार सलाम👏👏👏🌹🌹🌹आपल्या संजीवनी परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼 पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍

सौ भारती नाईक, कोफराड 

 

फारच छान👌👌

पहिल्या व्याख्यानाची लिंक असेल तर पाठवा,काही वैयक्तिक कारणांमुळे जॅाइन करु शकलो नाही.

श्री आशिष नाईक , साकोरे 

संजीवनी परिवार,

 

आजच्या गुगल आणि यूट्यूब च्या जमान्यात व्याख्यान ही गोष्ट, म्हटलं तर कालबाह्य होत चालली आहे. परंतु योग्य विषय व त्यावरील वक्ता तसेच व्याख्यानाच्या निमित्ताने एकत्र येणे यातून बोधप्रद अशा अनेक गोष्टी मिळू शकतात. सामाजिक संपर्क वाढल्याने विविध घटकांचे एक नेटवर्क तयार होते आणि सामाजिक बांधिलकीही वाढते. ही गोष्ट युट्युब वर एकट्याने वक्त्याला ऐकणं किंवा बघणं यातून साध्य होऊ शकत नाही. एक तासाचे व्याख्यान म्हणजे साधारण हे 200 पानं वाचून मिळेल एवढे ज्ञान असा एक ठोकताळा. संजीवनी परिवार गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या भागात बोलावून बुद्धिजीवी वर्गाची भूक भागवण्याचं उत्तम कार्य करते आहे. त्याबद्दल तुमचे कौतुक.

यावर्षीची पहिली दोन व्याख्याने मला ऐकता आली तर काही व्यक्तिगत अडचणीमुळे डॉक्टर अनिल काकोडकर यांचं व्याख्यान मला जॉईन करता आलं नाही. आयटी उद्योगात दहा एक वर्ष काम केल्यामुळे इंडस्ट्री 4.0 या विषयातील घडामोडींबद्दल मला माहिती होती. डॉक्टर भूषण केळकर यांनी हा विषय सामान्यांसाठी बऱ्यापैकी सोपा करून सांगितला. त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर वेगळे मत असू शकतं. त्यादिवशी आयटी इंडस्ट्री मधले अनेक तरुणही सदर व्याख्यानाला जॉईन झाले होते. मला असं वाटतं अशा व्याख्यानांनंतर काहीतरी प्रक्रिया सुरू व्हायला हवी. तरुणांना या विषयी काय वाटतं, होऊ घातलेला बदल किती वास्तव आणि किती फुगा, या बदलातून आपल्या तरुणांसाठी काय नवीन संधी असू शकतात या विषयी मंथन सुरू व्हायला हवे. मला खात्री आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना अजून जास्त माहिती असेल. ती माहिती action मध्ये कशी convert होईल यावर whatsapp ग्रुपवर का होईना पण चर्चासत्रे व्हायला हवीत. व्यक्तिगत पातळीवर मला ब्लॉक चेन तंत्रज्ञानाबद्दल शिकण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. या व्याख्यानानंतर मी IIT कानपूर च्या Professor ची एक lecture series बघण्यास सुरुवात केली.

 

अधिक कदम यांचं कार्य अदभुत आहे. पेलेट गनच्या छऱ्यातून आंधळे झालेल्या 1270 मुलांना परत दृष्टी मिळवून देणं काय, काश्मीर सारख्या धगधगत्या प्रदेशात 300 अनाथ मुलींचं हॉस्टेल काय.. राष्ट्र, धर्म, राजकारण या सर्व सीमा ओलांडून ते जे कार्य करतात त्याबाबत व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्यासारख्या माणसाकडून स्फूर्ती घेऊन आपण निदान आपल्या गोतावळ्यातील, समाजातील काहींच्या व्यथा कमी करता येतील तर प्रयत्न करावेत इतकेच.

 

तुम्ही फुल टॉस दिल्याने माझी प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे लांबली आहे...जित्याची खोड...😊

 

श्री  राजेश नाईक, बोळींज,

 ०३.०५.२०२१.

खरोखरच खूप छान होती सगळी व्याख्याने .

डॅा . केळकर यांनी झपाट्याने बदलत असणारे तंत्रज्ञान युगासोबत आपण कसे स्वतःला त्याबरोबरीने समृध्द करतो हे खूप छान सांगितले .

श्री. अधिक कदम यांच्या बद्दल अभिप्राय देणे म्हणजे जणू काजव्याने सु्र्याची बरोबरी करणे ... शब्दच अपुरे पडतील .

डॅा. काकोडकर यांनी सांगितलेली “सिलेज “ ही संकल्पना खुपच भावली मनाला, या संकल्पनेला अनुसरुन आपण आपल्या परिसरात काही करु शकतो का असा विचार मी करीत आहे .

संजीवनी परिवाराचे खूप खूप धन्यवाद!

श्री  मंगेश नाईक, गास.

पहीले दोन्ही व्याखान अतिशय सुरेख अभिप्राय अगोदर दिला आहे

शेवटच (कालच) काही ऐकु शकलो नाही 🙏क्षमस्व 🙏

श्री विलास  नाईक, भीटारे.  

व्याख्यानं खुपच छान झाली ,काही अपेक्षा तरी कळवा, धन्यवाद!

श्री राजाभाऊ नाईक, वावळी. 

 

Aapanch tini lectures che marm atishay changalya bhashet  sangitale aahe. Yapalikade aanakhi Kay sangnar. Practically first lecture aapalya students na beneficial aahe. Ya fieldshi update asalelya Atharva sarkhya yuvakachya madatine  puna ekada recorded lecture students na aikavayala harkat nahi.About second lecture, it is on Deshprem. Aapala jiv dhokyat ghaloon Kashmir sarkhya thikani Ashram or school chalvanarya Adhik  Kadam na Salam. About third lecture Dr Kakodkar --Aapalya mandalina kiti benefit gheta yeil he aatach sangane kathin.

 श्री वसंत जोशी , भुईगांव. 

 

पहिल्या व्याख्यानातील तंत्रज्ञानामुळे नोकरी/उद्योग व्यवसायवर होणार म्हणून निर्माण झालेला प्रश्न तिसऱ्या व्याख्यानाने नवतरुणांना उद्योग/व्यवसायासाठीचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आहे . तसेच दुसऱ्या व्याख्यानात ईश्वरनिष्ठां/परस्पर विश्वासाचे मार्गदर्शन आहे असे मला वाटते.

श्री यशवंत पाटील,उमराळे

पहिले व तिसरे व्याख्यान एक मेकांना पूरक असे होते व तरुण पिढीला चांगले  मार्गदर्शन मिळाले असे वाटते. दुसरे व्याख्यान खरोखरच अचंबतीत करणारे व एखादी व्यक्ती व संस्था किती  अविश्वसनीय असे कार्य करू शकते याचे दर्शन झाले. अश्या कार्याला आपण सर्वांनी जे काही शक्य आहे जसे की आर्थिक  मदत तसेच अधिक कदमांनी सांगितले तसे त्या संस्थेतील विद्यार्थांना आपल्या इथे उच्च शिक्षणासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.

संजीवनी परिवार ने ह्या वर्षी देखील कारोना च्या महामरित खूप सुंदर अशी व्याख्यान माला यशस्वी पणे आयोजित केली त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार. 💐🙏🙏🙏

श्री मनोज नाईक, कोफराड. 

Good morning 🌹🙏

आपल्या संजीवनी परिवारचे आभार

सर्वच विषय छान होते वक्ते सुद्धा  परीपुर्ण अभ्यासु होते 👌

श्री जयेश नाईक, वटार.

खूपच छान. ह्या कोरोना  काळात यशस्वी पणे आयोजन केल्या बद्दल संजीवनी परिवाराचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐

श्री संजू  नाईक, वटार. 

सर्व व्याख्यानाचे परीक्षण योग्य शब्दात केले आहे धन्यवाद!

श्री अनंत पाटील , भुईगांव. 

तिन्ही व्याख्याने अप्रतिम झाली.  

श्री भगवान नाईक, सोमाडी.