Monday 13 February 2023

साधं सरळ जीवन!

 

आपण रोज बघतो, जग फार गुंतागुंतीचं आहे.  जीवन काही साधं, सरळ राहिलं नाही , रोजची धाकाधाकी , गडबड, गोधळ , तोंडमिळवणी करताना उडणारी तारांबळ हे सर्व पाहता जीवन साधं सरळ कसं जगता येईल? हेच सांगतात शुनम्यो मसुनो प्रख्यात बौध्द संन्याशी आपल्या  “झेन -साधं सरळ जीवन जगण्याची कला” (ZEN- The Art of Simple Living) या प्रसिध्द पुस्तकातून. एका वाक्यात ते सारांश सागतात. “ थोडसं थांबून विचार करा आणि रोजच्या सवयीत, दृष्टीकोनात बदल करून प्रसन्नता अनुभवा. “

रोजच्या आयुष्यातील छोट्या बदलातून प्रसन्नतेची अनुभूती येऊ शकते. त्याचं बरोबर आंतरिक शांती आणि स्थैर्याचा अनुभव येऊ शकतो. त्यासाठी झेन ज्ञानप्रणालीवर आधारित शंभर दिवसासाठी, छोटेछोटे शंभर नियम पाळण्याचा सल्ला देतात.

पुस्तकात चार विभाग केले आहेत,

१)     ‘स्व’ ला  उर्जाभारीत (Energetic) करण्याचे मार्ग : आपल्या सवयीत सूक्ष्म बदल करण्याचा प्रयत्न करा असं सुचवले आहे. छोट्या छोट्या सवयी बदला. जश्या की

·       पंधरा मिनिटं लवकर उठा,

·       तुमचं टेबल स्वच्छ ठेवा,

·       पादत्राणे काढाल तेव्हा ती रांगेत ठेवा,

·       खाण्याची आबाळ करू नका ,

·       खात असताना प्रत्येक घासानंतर क्षणभर थांबा,

·       तुमचे आवडते शब्द कोणते हे शोधा,

·       शाकाहारी खाण्याचे लाभ लक्षात ठेवा,

·       दीर्घ श्वास घ्या ,

·       सावकाश श्वासोश्वास करा,

·       हात जोडा.

रोजच्या जीवनात अश्या सवयी जपा ज्यामुळे जगण्यात उत्साह संचारेल. प्रत्येक सवयीचा अनुभव घ्या. शाकाहारी खाण्याचे लाभ सांगताना ते  म्हणतात. अन्नामुळे मन आणि शरीर निर्मितीत हातभार लागतो. निव्वळ शाकाहारी भोजन घेण्याने तुमचं मन शांत आणि स्थिर होतं. मांसाहार संपूर्ण त्याग करणे तुम्हाला कदाचित शक्य होणार नाही परंतु एखादा दिवस निव्वळ शाकाहारावर राहून पहा अनुभव घ्या !!

हात जोडा ह्या सवयी बद्दल सांगतात. उजवा तळहात तुमच्या व्यतिरिक्त इतर सर्वांचे प्रतिनिधित्व करतो. डावा तळहात तुमचं प्रतिनिधित्व करतो. हे दोन्ही तळहात एकत्र आणून आपण ते एकवटतो.  त्यातून विनम्रता प्रकट होते, या कृतीतून आदर दाखवला जातो. आपल्या मनात कृतज्ञतेची भावना जागते.  अश्या छोट्या छोट्या ३० सवयी आपल्या जीवनात उत्साह संचारण्यात मदत करतील.

२)     आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करण्याचे मार्ग : दृष्टी तसी सृष्टी म्हटलं जाते. आपला दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करा. जग बदलेल. 

·       आपल्या कामाचा आनंद घ्या ,

·       इतरांना दोष देऊ नका,

·       स्वतः चा आब राखा,

·       स्वतःचे डोके वापरून विचार करा,

·       मत नक्की करू नका,

·       बदलाची दखल घ्या,

·       स्वतःवर विश्वास ठेवा,

·       सक्रिय व्हा.

स्वतः वर विश्वास ठेवा सांगताना म्हणतात आपल्या सा-यांच्यात क्षमता आहेत. या बाहेर कशा आणायच्या इतकाच प्रश्न असतो. स्वतःकडून स्वर्वोत्तम ते द्या.

अश्या प्रकारचे ३० दृष्टीकोन सुचवले आहेत ज्यातून आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण होईल.

३)     गोंधळ आणि चिंता दूर सारण्याचे मार्ग : या विभागात  इतरांशी वागण्याच्या पद्धतीती बदल करण्याचे २० मार्ग सुचवले आहेत.

·       दुस-यांच्या गुणावर लक्ष केंद्रित करा ,

·       जे जसं आहे तसं बघा ,

·       हानी किवा लाभ या स्वरुपात विचार करू नका,

·       कोणाला तरी आनंदी करा ,

·       तुमच्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीला दाद द्या.

यातील एक मार्ग म्हणजे जीवनातील  तीन विषं दूर करा. हाव, क्रोध आणि अज्ञान ही तीन विषं आहेत. हाव कधीच पूर्ण होत नाही , क्रोधामुळे लहानशा गोष्टीपायी संताप होतो. अज्ञान ही तर मूर्खताच असते. तारतम्य आणि ज्ञान आपल्या कडे नसते. जीवनात शांती हवी असेल तर या तिन्ही गोष्टी टाळा.

४)     दिवस सर्वोत्तम करण्याचे मार्ग : दिवस सर्वोत्तम करण्यासाठी प्रत्येक क्षण लक्षपूर्वक जगा. त्यासाठी २० मार्ग सांगितले आहेत.

·       चांगलं आणि वाईट अशी विभागणी करू नका ,

·       प्रत्येक दिवसाप्रती कृतज्ञ रहा,

·       नेहमी केवळ एकच मार्ग असतो असं नाही,

·       ऋतुमधील बदलाची दखल घ्या,

·       जीवन सार्थकी लावा.

·        

बुद्धत्व शिकवतं की , जीवनकालाच्या लांबी बरून आयुष्याचं मूल्यं ठरत नसते. आपण जीवन कसं व्यतीत करतो हे महत्वाचं आहे.

जगावं कसं याचं मनन करत असताना मरावं कसं यांचही मनन आपण करायला हवं. “डोळ्याची पापणी लवते न लवते तोच “ हा क्षण वाया न जाऊ देण्यासाठी आपण सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत.

रोजचं जीवन अधिक प्रसन्न,समृध्द, परिणामकारक करण्यासाठी पुस्तक वाचायला हवं. जीवनाचं अंग बनवायला हवं.