Friday 28 December 2012

रतन टाटा सर





 आज २८ डिसेंबर २०१२ टाटा ग्रुप चे अध्यक्ष सर रतन टाटा  यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांनीच केलेल्या नियमा प्रमाणे आज ते निवृत्त होत आहेत. टाटा उद्योग विश्वाचे वारस  म्हणून
श्री सायरस मेस्त्री  कडे सूत्र सोपवून.




दादाभाई नौरोजी यांना आपण भारतीय स्वातंत्र्याचे पितामह मानतो तसेच जमशेटजी टाटा हे भारतीय उद्योजकतेचे जनक मानले जातात. स्वामी विवेकानंद  शिकागोला जाताना सर  जमशेट्जी   टाटा सहप्रवासी होते. स्वामीजींनी टाटाना सागितले कि नुसते तंत्रज्ञान आयात न करता आपल्याकडील मनुष्यबळ कसे विकसित होईल या कडे लक्ष द्यायला हवे व आपले मित्र  म्हैसूरच्या महाराजांना जमशेदजींना हवे असलेले साहाय्य करण्यास सांगितले. त्यातून प्रेरणा घेऊन  म्हैसूर येथे जमशेदजींनी यांनी  ‘भारतीय विज्ञान अनुसंधान संस्था’  (Research Institute of Science for India) स्थापन केली. असं पूर्व संचित लाभलेला, टाटा समूह हा राष्ट्रासाठी समृध्दी निर्माण करणारा उद्योग समूह आहे.

144 वर्षांची प्रदीर्घ  परंपरा असणाऱ्या या उद्योगसमुहाचे नेतृत्व असे होते, आहे..
1868-1904 : जमशेटजी टाटा 
1904-1932 : सर दोराबजी टाटा
1932-1938 :
सर नौरोजी साफलाटावाला
1938-1991 :
जे.आर.डी. टाटा 
1991-2012 : 
रतन टाटा
2012 ,   : सायरस मेस्त्री 

रतन टाटा ह्यांनी १९६२ साली अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात स्थापत्यशास्त्रातील पदवी मिळवली. नवीन काहीतरी डिझाइन करायचे वेड त्यांना तेव्हापासूनच होते. आय.बी.एम.मध्ये नोकरी मिळत असूनही आजारी आजीसाठी रतन टाटा भारतात परतले. सुरवातीला टिस्को मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी केली ती अगदी थेट तेथील शॉप फ्लोअरवर! काही हजार कामगारांमधील एक कामगार बनून!  १९७१ साली टाटा समूहातील नेल्को कंपनीच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली. एकंदरीत वाईट परिस्थिती सुधारण्या पलीकडे होती. १९७७ मध्ये त्यांना एम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. ह्या कापड गिरणीची अवस्थाही वाईट होती. कुप्रसिद्ध कापड उद्योगातील संपाने एम्प्रेस मिल हि बंद पडली. १९८१ साली टाटा इंडस्ट्रीज त्यांच्याकडे आली. टाटा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी टाटा टेलिकॉम , केल्ट्रॉन , फायनान्स , हनीवेल , एलेक्सी अशा कंपन्यांची सुरुवात केली. १९८८ साली. सुमंत मुळगावकरांकडून त्यांनी  टेल्को ची सूत्रे घेतली. त्याच वेळी कामगाराचा मोठा संप झाला. कामगार नेते राजन नायर जोरात होते. रतन टाटांनी कामगारांना सागितले कि  तुम्ही माझ्या डोक्याला  गन  लावल  तर  तुम्ही चाप ओढू शकता किंवा गन खाली ठेवू शकता मी डोके हलवणार नाही. अश्या ठाम व मुत्सद्दीपणे त्यांनी संप मिटवला.
१९९१ साली त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. त्यावेळी जे आर डी च्या जुन्या सहका-या कडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. काही ठिकाणी विरोध झाला. पुढे यातील काही मंडळी निवृत्त झाली. त्यांनी संपूर्ण समूहात सुसूत्रता आणली. लोगो पासून कंपनीच्या नावापर्यंत सुलभता आणली जसे टेल्को चे टाटा मोटार्स झाले.
जागतिक स्तरावरील हॉटेल, टेटली,कोरस ह्या कंपन्या टाटा समूहात आणल्या. टाटा समूह आंतरराष्ट्रिय स्तरावर नेला. १९९१ साली रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले तेव्हा समूहाचे बाजारमूल्य ७९४३ हजार कोटी होते. आज ते ४,६२,००० हजार कोटी आहे. २१ वर्षात ५८ पटीने वाढले   यावरून त्यांच्या कामाचा झपाटा, प्रगतीचा वेग लक्षात येतो. उद्योगातील प्रगती, महसूल मधील वाढ या साठी टाटा उद्योग समूह ओळखला जात नाही. टाटा समूहाची ओळख आहे. राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणारा समूह, टाटा  म्हणजे सामाजिक बांधिलकी.  २६/११ ला ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कामगारांना , परिसरातील बळी पडलेल्या सगळ्यांना मदत केली. त्यांच्या घरी जाऊन रतन टाटांनी विचारपूस केली. टाटांनी आपल्या कार्यशैली तून जगभर आपल्या विषयी विश्वास निर्माण केला आहे. त्याचा अनुभव ब्रिटन मधील एक कंपनी घेताना आला. तेथील कामगारांनी मागणी केली कि आमची कंपनी टाटांनी घ्यावी. टाटा म्हणजे  विश्वासार्हता.
अशी मोठी परंपरा , इतिहास असणा-या टाटा समूहाचा वारसा श्री सायरस मेस्त्री कडे देताना  सर रतन टाटा सांगतात "'एखाद्याला आपल्या प्रभावाखाली ठेवणे मला योग्य वाटत नाही,'तुम्ही नेहमी 'स्वतःचे' असायला हवे. तुम्हाला स्वतःला काय वाटते ते नेहमी ऐका आणि तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा.'

आपल्या लाडक्या  कुत्र्यां बरोबर

2 comments:


  1. असामान्य उद्योगपती
    सुभाष रेगे
    Published: Sunday, January 6, 2013

    जगभरातील उद्योगजगतात रतन टाटा हे नाव आदराने घेतले जाते. वयाची ७५ वर्षे पूर्ण होताच त्यांनी डिसेंबरअखेरीस निवृत्ती पत्करली. त्यानिमित्ताने टाटा स्टीलमधून निवृत्त झालेले अधिकारी सुभाष रेगे यांनी व्यक्त केलेल्या भावना..
    भारतातील सगळ्यात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष व जगातील एक प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी १९९१ साली टाटा उद्योगसमूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व ती धुरा त्यांनी गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी खाली ठेवली. एरव्ही सर्व क्षेत्रांतील मोठी कर्तबगार मंडळी कधी पायउतार होणार हा आम्हाला प्रश्न पडतो. पण या रत्नपारखी उद्योजकाने तशी वेळच येऊ दिली नाही. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या उक्तीप्रमाणे टाटा साम्राज्याचे हे राजे उपभोगशून्य तर राहिलेच, पण ते स्वत:च्या मस्तीत, आनंदात व समाधानी वृत्तीने निवृत्त झाले! धन्य ते राजे व धन्य त्यांची प्रजा. म्हणून तर सर्व कामगार त्यांच्यात देव पाहत. टाटांनी आपल्या उद्योगाचा पाया (बेस) कसा सशक्त व निरोगी राहील हे पाहिले. नंतर त्यांनी 'टाटा ब्रॅण्ड' कसदार व दर्जेदार राहील याकडे लक्ष दिले. टाटांनी आपल्या उत्पादन गुणवत्तेत कधीही तडजोड केली नाही. त्यांचे उत्पादन म्हणजे गुणवत्तेत सवरेत्कृष्टच असले पाहिजे, हे त्यांनी आपल्या कंपनीतील उच्च अधिकारी ते शॉप फ्लोअरवरील कामगारांत बिंबवले होते. २१ वर्षांत त्यांनी आपले पोलादाचे जाळे ८५ देशांत पसरविले, ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे साध्य झाले ते त्यांच्या अंगी असलेल्या जिद्द, दूरदृष्टी, व्यावसायिक गुणवत्ता व जागतिक भान यांमुळे. टाटांचे व्यक्तिमत्त्व फारच साधे होते, हे त्यांच्या बॉम्बे हाऊसमधील कार्यालयात गेलेल्यांना समजून येते. उद्योगपती म्हणून त्यांनी कधीही बडेजाव केला नाही की स्वत:साठी उंच इमारत बांधली नाही. त्यांना देशातील गरीब जनतेबद्दल प्रेम तसेच आपल्या कंपनीतील कामगारांबद्दल आपुलकी होती. अशा या रत्नपारखी उद्योजकाने टाटा समूहाची पुढील जबाबदारी सायरस मिस्त्री या तरुणाकडे दिली ते योग्य आहे. रतन टाटा आता कंपनीचे मानद अध्यक्ष असतील. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

    ReplyDelete

  2. लेख
    प्रतिसाद : टाटा खऱ्या अर्थाने भारतरत्न!
    मुंबई
    Published: Sunday, January 6, 2013

    लोकरंग (२३ डिसेंबर)च्या अंकात संपादक गिरीश कुबेर आणि भानू काळे यांचे रतन टाटा यांच्याविषयीचे लेख वाचून वर्षांच्या अखेरीला जे निराशेचं मळभ दाटून आलेलं होतं ते दूर झालं. अगदी मोजक्या शब्दांमध्ये खऱ्या अर्थाने आजच्या घडीला एका महामानवाचं या लेखांतून शब्दचित्र रेखाटलंय. रतन टाटा यांच्या साधेपणाची नेहमी चर्चा होत असते. हा साधेपणा कुठून आला असेल? ही जगण्याची पद्धत त्यांनी कुठून आत्मसात केली असेल? काय कारणं आहेत उपभोगशून्य जगण्याची? आपण कधी त्याचा विचार करणार आहोत काय? त्यातून घेता आला तर काही धडा घेणार आहोत काय?
    'उपभोगशून्य स्वामी' असं टाटाचं सार्थ वर्णन संपादकांनी केलेलं आहे. समोर आदर्श नाहीत अशी हाकाटी केली जाते, पण आपल्यासमोर या श्रीमंत योग्याच्या रूपाने एक भव्यदिव्य शिखरच आहे. देशाची सर्वच क्षेत्रात झपाटय़ाने अधोगती होताना आपण पाहतो. त्यामुळे स्वत:च्या जगण्याने आणि अलौकिक कर्तृत्वाने या देशात मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणाऱ्यांचा आदर्श पुढे ठेवला तर देशाच्या पुनर्बाधणीसाठी त्याचा फायदाच होईल.
    रतन टाटा हे खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने खरं म्हणजे त्यांचा देशपातळीवर योग्य सन्मान व्हायला हवा, पण ती संधी घेण्याइतपत देशाचं नेतृत्व मोठं नाही याची आपल्याला जाणीव आहे. मात्र टाटांचं स्थान या देशातल्या लक्षावधी जनतेच्या हृदयात आहे.
    वसईतले माझे एक स्नेही वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी टीसीएसमधून निवृत्त झाले. त्यांच्या घरी वर्षभरानंतर जाण्याचा योग आला. त्यांच्या हॉलमध्ये देव्हारा आहे. त्यात येशू आणि मरियेच्या तसबिरी आहेत. त्यांच्या बाजूलाच रतन टाटांची भली मोठी तसबीर विराजमान झालेली आहे. जिवंत व्यक्तीची तसबीर ख्रिस्ती धर्मात देवदेवतांच्या जवळ ठेवायची पद्धत नाही, हे मी त्यांना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, 'रतन टाटा हे टाटा उद्योग समूहातल्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी देवाच्या ठिकाणी आहेत. या घराण्याने आम्हाला पद, प्रतिष्ठा आणि सन्मान दिला.' मी त्यांना विचारलं, 'तुम्ही टाटांना कधी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधला का?' यावर संपादकांनी मांडलेल्या मुद्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, 'मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं टाटांनी आम्हाला कधीच भासवू दिलं नाही.'
    माणूसपण हरवत असलेल्या काळात भानू काळे यांच्या लेखातलं एक वाक्य कोरून ठेवण्यासारखं आहे. टाटा म्हणतात, शेवटी आयुष्यात एकच आई असते तुम्हाला! आईच्या अखेरच्या आजारपणात करिअरचा विचार न करता तीन महिने हॉस्पीटलमध्ये राहणारे रतन टाटा खऱ्या अर्थाने आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
    - सायमन मार्टीन, वसई, मुंबई

    ReplyDelete