Sunday 10 February 2013

कुंभमेळा


 
कुंभपर्वनावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा जो मेळावा जमतो, त्यास कुंभमेळा म्हणतात. कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका आहे, ती अशी  समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. हे युद्ध बारा दिवस  निरंतर चालले. त्यात बारा ठिकाणी  अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने देव लोकांत आहेत. अमृत सिंचन  झालेली भूलोकातील चार स्थाने म्हणजे  हरिद्वारमधील  गंगा नदी, उज्जैनमधील क्षिप्रा नदी , नाशिकमधील गोदावरी नदीव प्रयाग येथील गंगा-यमुना - सरस्वती संगम. 
 अमृतमंथनावेळी ग्रहांची जी अवस्था होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येतं. प्रत्येक तीन वर्षानंतर एक असे बारा वर्षात चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर चार कुंभमेळ्याचे आयोजन होत असते. अर्धकुंभ मेळा प्रत्येक सहा वर्षात हरिद्वार आणि प्रयाग इथे भरतो तर पुर्णकुंभ बारा बारा वर्षाच्या अंतराने केवळ प्रयाग येथे भरतो. बारा पुर्णकुंभ मेळ्या नंतर महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येते.  म्हणजेच महाकुंभ योग१४४ वर्षांनी येतो.
 चारही ठिकाणचे कुंभयोग  पुढील प्रमाणे :
(१) प्रयागमकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी.   
(२) हरद्वार गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत. 
(३) नासिकगुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत.   
(४) उज्जयिनीसूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत.
प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यांपैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला पूर्णकुंभहे नाव आहे 
महाकुंभमेळ्याची सुरुवात  मकरसंक्रातीपासून (अलाहाबाद)प्रयागच्या गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या नद्याच्या त्रिवेणी संगंमावर झाली आणि मेळ्याची सांगता  महाशिवरात्रीला होईल.  

   
कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी विविध आखाड्यांतील साधूसंतांनी ठरवून घेतलेल्या क्रमाने स्वतःच्या आखाड्यातील सहसंत अन् शिष्य यांच्यासह स्नान करणे, याला पवित्र स्नान (शाही स्नान)म्हणतात.पवित्र स्नानाला जाण्यासाठी आखाड्यांतील साधूसंतांची शस्त्रांसह मिरवणूक निघते.  महाकुंभमेळ्यात साधु संत, योगी, ऋषी, मुनी, हठयोगी अशा अनेक योग्यांची मांदियाळी असते कुंभमेळ्याची परंपरा कित्येक वर्षांपासूनची आहे.याची सुरवात कधीपासून झाली याचीमाहिती उपलब्ध नाही.इतिहास  व  दस्तावेज   जपण्याची वृत्ती येथेही  दिसून येते. 
वर्षानुवर्षे या कुंभमेळ्याचे आयोजन होते आहे. हे आयोजन कोण करते? असा प्रश्न जेव्हा पं. मदनमोहन मालविय यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी उत्तर दिले, यांचे कुणीही एक व्यक्ती आयोजन करत नाही. त्या त्या वर्षीच्या पंचांगात कुंभमेळा कुठे होणार एवढे छापले की लोक स्वखर्चाने कुंभमेळ्यात सहभागी होतात. त्यासाठी वेगळ्या आयोजनाची गरज राहत नाही. अशा प्रकारे कुंभमेळ्याबाबतचे स्थान भारतीय जनमानसात निर्माण झालेले आहे. धार्मिक कर्म, संस्कार करण्यासाठी आणि धार्मिक श्रद्धाजागरण करण्यात या कुंभमेळ्याचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. यामुळे शतकानुशतके आपला समाज एका सूत्रात बांधून राहिला. अनेक संकटे, आक"मणे येऊनही इथल्या धर्मभावना अभेद्य राहिल्या आणि समाज एकात्मकरण्याचा त्यातूनच प्रयत्न झाला.

No comments:

Post a Comment