Sunday 16 April 2023

भारतवर्ष- यात्रेकरूंचा देश.

 

 

 


तीर्थक्षेत्रांची रंजक माहिती देणारे पुस्तक म्हणजे देवदत्त पटनायक लिखित “यात्रेकरूंचा देश भारतवर्षाची निर्मिती  “ सविता दामले यांनी अनुवाद केला असून मजुळ इंडिया नी प्रकाशित केलं आहे. भारतवर्ष पुराण काळापासून तीर्थयात्रे साठी प्रसिद्ध आहे. एकदा तरी काशीस जावे अशी    प्रत्येक भारतीयांची  इच्छा असायची म्हणूनच  ‘काशीस जावे,नित्य वदावे’ असं  वचन आपल्याकडे आहे. काशीला जाणं जमत नसेल तर निदान सारखं जायचंय, जायचंय असं सतत म्हणत तरी राहा असा त्याचा अर्थ. 

वृद्ध आई बाबांना कावडीत बसवून तीर्थयात्रा करणा-या श्रावणबाळाची गोष्ट घराघरातून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते.

आद्य शंकराचार्य परिव्राजक होते. उत्तर, दक्षिण , पूर्व,  पश्चिम  भ्रमण करून अनेक तीर्थस्थानाला भेटी दिल्या अनेक तीर्थक्षेत्रांना  पावित्र्य प्राप्त करून दिले. गंगोत्री, जमनोत्री,  बद्रीनाथ, केदारनाथ हि छोटी चारधाम यात्रा आखली. त्याचप्रमाणे मोठी चारधाम यात्राही आखली. पूर्वेस जगन्नाथ पुरी , दक्षिणेस रामेश्वर ,पश्चिमेस  द्वारका, उत्तरेस बद्रीनाथ.

या देशातील तीर्थकरुची परंपरा फार मोठी आहे जैन तीर्थकर , बुध्दभिक्षु ते आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद यांनी भारतभर तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन भारतवर्षाची थोरवी गौरविली ,वाढवली.

भारतवर्ष हे पारंपारिक नाव हिंदू , बौद आणि जैनांनी भारताला दिले. पुरातन इतिहासात भारतवर्ष हे जम्बुद्विपात वसलं होतं उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यत पसरलेला प्रदेश म्हणजे भरतखंड. भरत हा जम्बुद्विपाचा सर्वांत प्राचीन राजा होता, त्याची भूमी ती भरताची भूमी. तेच भरतवर्ष , भारतवर्ष. भरत हे एका मुनिच ही नाव होतं.  येथील तीर्थक्षेत्राला पुराणकालीन संदर्भ आहेत जसे सतीच्या देहाचे भाग ज्या ठिकाणी पडले ती ५१ शक्तीपीठ. शिव अदृश झाला व भक्तांच्या आवाहना नंतर ज्याला आरंभ नाही आणि अंतही नाही अशा संपूर्ण भारतातील बारा स्थानांवर अवतीर्ण झाला. ही स्थाने  बारा ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिध्द आहेत. जैन लोकांची श्रद्धा आहे कि, भरतवर्षात पसरलेल्या पर्वतमाथ्यांवर बसून तीर्थाकरानी विश्वाच्या अमर्याद शाश्वत ज्ञानाचा वेळोवेळी नव्याने शोध लावला. या सर्व ठिकाणे  नंतर जैनांची तीर्थस्थल  झाली. बुद्धाच्या महापरीनिर्वाणा नंतर त्यांच्या अस्थी भारतवर्षात ८४००० ठेवून स्तूप बांधले ही सर्व स्थळे नंतर तीर्थक्षेत्र झाली.

भारतभर अगणित तळी, सरोवरे,नद्या , संगम पसरलेले आहेत. ऋषीमुनी तप करायचे अशी असंख्य तीर्थक्षेत्र निर्माण झाली.   

  या पुस्तकामध्ये वैदिक युगा पासून ते राष्ट्रयुग अश्या ८ विभागात ३२ तीर्थक्षेत्राची  माहिती देण्यात आली आहे. वैदिक युगातील वाराणसी,वैष्णोदेवी,द्वारका  श्रमण युगातील रणकपुर, बोधगया पौराणिक युगातील पुरी,कोल्हापूर,तिरुपती उज्जैन  तात्रिक युगातील गुवाहटी, शारदा, इस्लाम युगातील उदवाडा, अमृतसर भक्तीयुगातील जेजुरी,पंढरपूर, बद्रीनाथ , युरोपीयन युगातील  कोलकोत्ता,वेलंकनी राष्ट्र युगातील आग्रा, शबरीमला इत्यादी तीर्थक्षेत्राची माहिती  देण्यात आली आहे.

प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्व नेमक्या शब्दात मांडले आहे. अभंगातून क्रांती घडवणारे पंढरपूर ग्रामीण महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो तीर्थकरू दिंडीने पंढरपूरला दरवर्षी येतात. यामध्ये माझी कर्तव्यपूर्ती होईपर्यंत इथ विटे वर उभा रहा हे सांगणारी पुंडलिकाची कथा येते. वाराणसी, काशीचे विशेष महत्व सांगताना म्हटलं आहे की हिमालयातून वाहत येणारी गंगा नदी दक्षिणेस जाऊन समुद्रास मिळावयाला हवी होती. परंतु गंगा नदी काशी येथे वळण घेते आणि उत्तर दिशेस वाहू लागते हे उलट दिशेला वाहणे आध्यात्मिकदृष्ट्या खूपच वैशिष्ट्यपूर्ण मानलं गेले. 

 मंदिरात, तीर्थक्षेत्री मिळणारे  धार्मिक,अध्यात्मिक किंवा कलात्मक अनुभव शाश्वत असणार आहेत. अशी  स्वत:लाच खात्री पटवून द्यायची असते, आपल्या मनाचं पोषण करायचं असतं. खरं तर हे अनुभव स्वत:च्या आत्म्यापर्यंत पोहचण्याची माध्यमंच  असतात.  

अश्या अनेक दंतकथा लोककथा , पुराणकथा मधून तीर्थक्षेत्राची महती वर्णन केली आहे, वाचायला हवं.

No comments:

Post a Comment