मातृह्स्तेन भोजनम आणि मातृमुखेन शिक्षणम झाले कि हिंदुस्तानची प्रभा एकदम फाकेल व चारीबाजूला ज्ञान पसरवू शकू. केवळ मुलांना शिकवून चालायचे नाही मुलीनाही शिकविले पाहिजे. मुलींना मुलां पेक्षा जास्त शिकविले पाहिजे. वरील विचार वाचल्यानंतर आपणा पैकी खूप लोकांना देऊळ चित्रपटातील नाना पाटेकरचा संवाद आठवेल ज्यांच्या दोन मुलीं कॉन्व्हेंट मध्ये शिकतात त्यांना तुम्ही मुलींच्या शिक्षणा विषयी सांगता आहात. आज मुलींचं शिक्षण खूप वाढलंय परंतु विनोबांना अजून काही अपेक्षित होतं. सांगतात बायांना मुले वाढवायची असतात. स्रिया मुलांना वाढविणार म्हणजे राष्ट्राला वाढविणार. त्यामुळे ज्ञानाची किल्ली त्यांच्याच जवळ पाहिजे.लहान मुलांना जे शिक्षण द्यायचे ते आईच देऊ शकते. मुले शाळेत जातात परंतु त्यांच्या कंठात ज्ञान काहीच नसते. लहानपणी किमान दहाहजार कविता/पद्य / श्लोक पाठ असायला हवेत.सहा वर्षापासून सुरवात केली ,रोज एक श्लोक पाठ करायचा ठरविले तर होईल. अलीकडच्या काळातील अभिनेत्री , सूत्र संचालिका सुहासिनी मुळगावकर यांनी एक आठवण सांगितली होती कि कॉलेजला असताना वडील रोज गीतेतील श्लोक बेस्टच्या तिकिटाच्या मागे लिहून द्यायचे, बस येई पर्यंत मी तो पाठ करत असे,यातून कॉलेज संपेपर्यत माझी भगवतगीता पाठ झाली.
विनोबाच्या आईचे पाठांतर खूप होते. त्यांना कानडी व मराठी भजने , अभंग पाठ होते घरी काम करीत असताना त्या ते म्हणत असत त्यातून मुलांचेही शिक्षण होत असे. विनोबांना ५० हजाराहून अधिक अभंग, श्लोक भजने पाठ होती.
हल्लीच्या शिक्षण पद्धतीमुळे जीवनाचे दोन तुकडे पडतात. आयुष्याची पहिली पंचवीस वर्षे जगण्याच्या भानगडीत न पडता नुसते शिक्षण घ्यावे, आणि नंतर शिक्षण गुंडाळून ठेवून मरेपर्यंत जगावे. बुध्द भगवानांनी म्हटले आहे कि रोज स्नानाने जसे शरीर स्वच्छ होते त्याप्रमाणे रोज अध्ययन केले तर मन स्वच्छ होते व राहते. विनोबांनी विध्यार्थ्याची चार कर्तव्ये सांगितली आहेत. विध्यार्थ्यानी बुद्धि अत्यंत स्वतंत्र ठेवावी, स्वत: वर स्वत;चा ताबा राखावा. (देह, मन बुद्धि,वाणी ह्यावर ताबा), त्यांनी निरंतर सेवापरायण राहिले पाहिजे, त्यांनी नेहमी सावधान राहिले पाहिजे,म्हणजे सावध चित्त नवनवीन गोष्टीचे अध्ययन ,तटस्थ बुद्धि ने अभ्यास.
कर्तव्याप्रमाणेच शिक्षणाचे तीन मुख्य विषय विनोबांनी प्रतिपादले आहेत. योग , उद्योग , व सहयोग. योग म्हणजे शरीर , चित्त, इंद्रिये ,मन वाणी,यावर प्रभुत्त्व मिळविणे (Self Awareness / Development ). उद्योग म्हणजे व्यावसायिक शिक्षण (Professional Competency) , सहयोग म्हणजे समाजाशास्र , मानसशास्र इत्यादी सर्वकाही. सहयोग मध्ये गुण ग्राहकता महत्वाची. श्री दीपक घैसास यांनी व्याख्यांना दरम्यात सांगितलेली ससा व कासव यांच्या स्पर्धेची गोष्ट आठवते, जमिनीवर सश्याच्या शक्तीचा वापर करायचा तर नदी पार करताना कासवाच्या शक्तीचा उपयोग करायचा. स्पर्धेत कोणा एकाचा जय न होता दोघांचा विजय हेच Collaboration म्हणजेच सहयोग.
आधार व जिज्ञासू साठी पुस्तक " विनोबाचे शिक्षण विचार"
No comments:
Post a Comment