Wednesday 21 May 2014

यंगीस्तान

आपल्या सर्वाना जीवन आनंदी, प्रसन्न आणि सुखदायी असावे असे वाटते. वेद,उपनिषदा  मधून या विषयी चर्चा उपलब्ध आहे.  डॉ राजेंद्र बर्वे ह्यांनी  त्याची चर्चा मनमोराचा पिसारा या सदरातून दिलेली आहे.खचितच आपणास उपयुक्त   वाटेल.   
 
मनमोराचा पिसारा:         युवास्यात      -डॉ. राजेंद्र बर्वे

 
युवास्यात् साधु युवा, अध्यायक:
आशिष्ठो, दृढीष्ठो वसिष्ठ:
तस्येयाम् पृथ्वी वित्तस्य पूर्ण स्यात
एको मनुष: आनंद:
अध्ययनशील,सरळ वृत्तीचा, आशावादी, सुदृढ , दृढनिश्चयी तरूणा साठीच पृथ्वी वरील संपती/समृद्धी आहे. या गुणांनीच जीवनात साफल्य , संतोष येतो. या सर्व गोष्टींनी माणूस तरुण होतो. त्याला मानवी जीवनातला आनंद लुटायला मिळतो
A young man should have character, should be studious, full of hope, determination and strength. For him all this earth should be full of riches.

उपनिषदामधील अनेक श्लोकांमध्ये मानवी जीवनामध्ये उद्दिष्ट काय? माणसानं का जगावं? 'माणूस' म्हणून आपण कोण, अशा गहन आणि गंभीर विषयावर चर्चा केली आहे.परंतु, हे सर्व विचार प्रत्यक्ष जीवनाकडे पाठ फिरवीत नाहीत. त्यामुळे या श्लोकांवर चिंतन करताना पोट भरल्यावर आरामखुर्चीत बसून तत्त्वज्ञान चघळावे अशा वृत्तीने त्यांचा विचार करता येत नाही. उलट आपलं जीवन अधिकाधिक 'अर्थ'पूर्ण कसं करावं? व्यक्ती आणि समष्टी या जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, याची जाणीव होते. प्रस्तुत श्लोकामध्ये समाजाचे आर्थिक जीवन, आनंदमय समाज आणि नेतृत्व यांचा अत्यंत सुंदर मिलाफ आढळतो. किंबहुना नेता कसा असावा हे सांगताना, समाज कसा असावा आणि नेत्याकडे कोणती जबाबदारी असावी, यावर नेमक्या शब्दात भाष्य केलेलं आहे.नेत्याची सहा प्रमुख लक्षणं इथे मांडलेली आहेत. नेत्यामध्ये तरुणाची ऊर्जा असावी. कारण अशा ऊर्जेशिवाय, 'पॅशन'शिवाय समाजामध्ये अभिसरण होत नाही. नेतृत्वाच्या जबाबदारीमध्ये निरलस परिश्रम करावे लागतात, त्यासाठी अखंड ऊर्जेची आवश्यकता असते. अशक्त, आजारी अथवा खंतावलेल्या पुढाऱ्याकडे पुरेशी शक्ती नसते.शक्तिमान असलेल्या व्यक्तीमध्ये अहंभाव निपजतो. आपल्या ताकदीचा गर्व निर्माण होतो. त्यामुळे असा शक्तिमान नेता सुस्वभावी असावा. त्याचं वागणं, बोलणं यातून सद्भावाचा पडताळा यावा.सद्वर्तनी, शक्तिमान नेता सुशिक्षित असावा. शिक्षणाच्या आधारे जगामधल्या घडामोडींचा अभ्यास करता येतो. विद्याभ्यासामुळे इतरांच्या अनुभवाच्या परिशीलनातून शहाणपणा अथवा प्रज्ञा जागृत होते.
सद्वर्तनी, सशक्त, सुविद्य नेत्यामध्ये आणखी तीन गुणांची जोपासना होणे गरजेचं असतं.अशा त्रिगुणसंपन्न नेत्याच्या मनात सदैव 'आशा' पल्लवित असली पाहिजे. आशादायी व्यक्ती प्रयत्नशील असते.समाजपरिवर्तनाकरिता समाजाला आशावादी करणं, हे नेत्याचं कार्य असतं. आशावादी समाज उद्यमशील असतो. ही आशा नेत्याच्या बोलण्यातून, वावरण्यातून समाजाला प्रतीत झाली की समाज विकासकार्याला कटिबद्ध होतो. आशावादी व्यक्ती कधीकधी आरंभशूर ठरतात. एखाद-दुसऱ्या अपयशानं, कळतनकळत घडलेल्या चुकांमुळे आशावादाचा फुगा फुटतो. आशावाद जिवंत ठेवण्यासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा ठरतो. दृढनिश्चयी स्वभावामुळे नेता हार मानत नाही आणि समाजविकासाकडे वाटचाल करीत राहातो.

असा गुणसंपन्न नेता, सुदृढ असावा. तो ठणठणीत असावा. त्यानं आपल्या शरीर वमनाची प्रकृती उत्तम ठेवावी. अशा नेत्याकडे समाजाने आपला अर्थव्यवहार सोपवावा. कारण समाजाच्या उन्नतीकरिता लागणाऱ्या 'वित्ता'चे व्यवस्थापन भोळसट आदर्शवादावर चालत नसतं, त्याला चतुर, चाणाक्ष आणि चतुरस्र व्यवस्थापन लागतं. अशारीतीने जो समाज आणि नेता वावरतो, तो सर्वत्र आनंदी, प्रसन्न आणि सुखदायी जीवन फुलवतो.

No comments:

Post a Comment